Zilla Parishad Agrowon
ताज्या बातम्या

ZP Election : निवडणूक तहकूब ठेवण्याचा अधिकार आहे?

जिल्हा परिषदेतील सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या जागा निवडीने अथवा स्वीकृतीने भरण्याचा विषय तहकूब ठेवण्यात आल्याने महाविकास आघाडीचे १६ सदस्य प्रशासनासह सत्ताधारी भाजपवर भडकले.

Team Agrowon

धुळे ः जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) सर्वसाधारण सभेत विषय समित्यांच्या जागा निवडीने अथवा स्वीकृतीने भरण्याचा विषय तहकूब ठेवण्यात आल्याने महाविकास आघाडीचे १६ सदस्य प्रशासनासह सत्ताधारी भाजपवर भडकले.

त्यांनी सभागृहात, नंतर सीईओंच्या दालनात ठिय्या आंदोलन करत सभा तहकूब करता येते, निवडणूक नव्हे, असा मुद्दा आक्रमकपणे रेटत सत्ताधाऱ्यांसह भाजपचा निषेध केला. या मुद्द्याच्या अनुषंगाने सभेतील सर्वंकष चर्चा, निर्णयाचे वस्तुनिष्ठ इतिवृत्त सोमवारी किंवा मंगळवारी दिले जाईल, अशी ग्वाही सीईओ बुवनेश्‍वरी एस. यांनी दिल्यावर आंदोलक सदस्यांनी प्रशासनाचा सायंकाळी पाचनंतर पिच्छा सोडला.

येथील जिल्हा परिषदेत शुक्रवारी (ता. १८) दुपारी अडीचला सभा सुरू झाली. अजेंड्यावर विषय क्रमांक २१ मध्ये विषय समित्यांच्या जागा निवडीने अथवा स्वीकृतीने भरण्याचा मुद्दा होता. याविषयी आघाडीच्या प्रमुख सदस्यांनी चर्चा घडवून आणली. ती गांभीर्याने घेतली गेली नाही. त्यामुळे विरोधी १६ सदस्य भडकले.

त्यांनी निवडणूक प्रक्रिया राबविली नाही, तर सभागृहात ठिय्या आंदोलन करू, असा इशारा दिला; परंतु सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर चर्चा झाल्यावर विषय समित्यांच्या जागा निवडीचा विषय तहकूब ठेवला. या निर्णयाने आगीत तेल ओतल्यासारखे झाल्याने सभेनंतर विरोधी आघाडीच्या १६ सदस्यांनी सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले.

सोळा आंदोलकांकडून हट्ट

आघाडीचे प्रमुख सदस्य तथा आंदोलक पोपटराव सोनवणे, किरण पाटील, ललित वारुडे, शानाभाऊ सोनवणे, धीरज अहिरे आदींनी सीईओ बुवनेश्‍वरी एस., सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी तथा सर्वसाधारण सभेचे सचिव ए. जे. तडवी यांना धारेवर धरले. या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी अश्‍विनी पवार यांनी विषय क्रमांक २१ तहकूब ठेवण्याचा निर्णय घेतला आणि निवडणूक घेतली

असती तर प्रशासनाची पूर्ण तयारी होती, अशी भूमिका मांडली. हीच भूमिका आणि निवडणूक तहकूब करण्यामागची कारणे श्री. तडवी यांनी लेखी स्वरूपात द्यावीत, असा हट्ट आंदोलकांनी धरला. त्यामुळे अधिकाऱ्यांची कोंडी झाली. त्यावर सीईओंनी निवडणुकीच्या अनुषंगाने सभागृहातील सर्वंकष चर्चा आणि तहकुबीच्या निर्णयाविषयी वस्तुनिष्ठ इतिवृत्त सोमवारी किंवा मंगळवारी दिले जाईल, अशी ग्वाही देऊन आंदोलकांचा पिच्छा सोडविला.

निवडणुकीतील वादाचे मूळ कारण...

स्थायी समितीच्या तीन, कृषी चार, समाजकल्याण, बांधकाम, महिला व बालकल्याण समितीची प्रत्येकी एक, तर वित्त, आरोग्य समितीच्या प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. यासंबंधी निवडणूक कार्यक्रम सुरू असून, एकूण १४ जागांसाठी १७ इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत.

त्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा ते दुपारी साडेबारापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणे, नंतर छाननी होती. यात १७ अर्ज वैध ठरले. बहुचर्चित स्थायी समितीच्या तीन जागांसाठी सहा अर्ज आले. यात भाजपकडून तुषार रंधे, कुसुम निकम, संग्राम पाटील, तर आघाडीकडून किरण पाटील, मोतनबाई पाटील, सुनीता सोनवणे यांचा समावेश आहे.

आघाडीला दोन जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा असताना नंतर आघाडीने एकमेव किरण पाटील यांना संधी देण्याचा निर्णय घेतला; परंतु आघाडीचा समावेश न करता स्थायी समितीत भाजपचेच तीन सदस्य असावेत या कारणामुळे निवडणूक तहकूब ठेवण्यात आली व वादाची ठिणगी पडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manjara Dam: ‘नॅचरल’च्या वतीने मांजरा धरणातील पाण्याचे जलपूजन

Bioenergy Award: विस्मा तर्फे ‘श्री गुरुदत्त’ला उत्कृष्ट बायोएनर्जी उत्पादक पुरस्कार

Solar Energy Project: सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार: अध्यक्ष मानसिंगराव नाईक

Animal Feed : चारा-पाण्याचा प्रश्न खानदेशात सुटण्याचे संकेत

Cotton Crop Disease: लाखेगाव, अलीपुरातील कपाशी पिकावर ‘मर’ रोगाचा फटका

SCROLL FOR NEXT