Akola News : साधारणपणे महिनाभराच्या खंडानंतर पाऊस झाला. काही ठिकाणी समाधानकारक, तर कुठे अद्यापही पावसाचे प्रमाण कमी राहले. अशा वातावरणात आता कपाशीच्या पिकात पातेगळ प्रचंड प्रमाणात होत आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
मोठ्या खंडानंतर पाऊस झाल्याने पिकांचे नुकसान झालेले आहे. कपाशीच्या झाडांवर लागलेल्या पात्यांची गळ वाढली. सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या अखेरीस व काहींनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात कपाशीची लागवड केलेली आहे. या हंगामात अशा प्रकारची लागवड वाढली होती.
पाऊस पडण्याआधी पेरणी केलेल्या या बागायती क्षेत्रातील कपाशीचे पीक सध्या फूल व फळधारणेच्या अवस्थेत आहे. पीक बहरावर असतानाच गेल्या आठवड्यात ४ दिवस पाऊस झाला. यामुळे एकीकडे पिकाला दिलासा मिळाल्याचे समाधान असतानाच दुसरीकडे पात्यागळ सुरू झाली.
मोठ्या खंडानंतर पाऊस पडल्याने हवामानात एकदम बदल झाला. जमिनीतील उष्णतामान वाढलेल्या स्थितीत झालेला या पावसाने गारवा तयार केला. याचा फटका पिकाला बसला. पातेगळीमुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे.
यंदा कपाशीवर काही ठिकाणी गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता. त्यानंतर आता ही गळती चिंता वाढवत आहे. कृषी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज शेतकरी व्यक्त करीत आहेत.
पावसाचा खंड व त्यानंतर एकदम पाऊस आला. त्यामुळे नैसर्गिकरीत्या ही गळ आहे. यासाठी घाबरण्याची गरज नाही. तरीही शेतकऱ्यांनी नॅप्थिल ॲसेटिक ॲसिड या वनस्पती वाढ नियंत्रकाची ४ मिलि १० लिटर पाण्यात फवारणी केली, तर फायदा होऊ शकतो.- डॉ. संजय काकडे, कापूस कृषी विद्यावेत्ता, ‘पंदेकृवि’, अकोला
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.