Cotton Crop Disease
Cotton Crop Disease Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Crop Damage : ‘आकस्मिक मर’ने कापूस उत्पादक हैराण

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात सुरुवातीच्या काळात सतत पाऊस (Heavy Rain), त्यानंतर पावसाची दीर्घ उघडीप, नंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे कपाशीत पातेगळ (Cotton Leaf Fall), फुलगळ, आकस्मिक मरचा प्रादुर्भाव (Wilt Disease Outbreak Cotton) झाला आहे. आकस्मिक मरमुळे शेतामधील झाडे अचानक जागेवरच सुकत आहेत. पातेगळीचे प्रमाण कमालीचे असल्याने कापूस उत्पादक (Cotton Farmer) कमालीचा हैराण झाला आहे.

यंदा मराठवाड्यात १३ लाख ७३ हजार ५२१ हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली आहे. प्रारंभीच्या पावसाने कपाशीची वाढ खुंटली, तण वाढले, खत व्यवसस्थापन, आंतरमशागत, फवारणीचे नियोजन कोलमडल्याने कपाशीवर वाढीच्या अवस्थेतच संकट आले. काही काळ उघडिपीच्या उष्णतेनंतर आलेल्या सततच्या पावसाने पुन्हा एकदा कपाशीत फुलगळ, पातेगळ आणि ‘आकस्मिक मर’चा प्रादुर्भाव वाढला आहे.

हलक्‍या जमिनीत ‘आकस्मिक मर’चे प्रमाण २ ते ५ टक्के, मध्यम ते भारी जमिनीत १० ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. पातेगळीचे प्रमाण काही ठिकाणी ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत असल्याने कापूस उत्पादक हतबल झाले आहेत. आधी सततचा पाऊस व त्यानंतर पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा व त्यानंतर पुन्हा अति पावसाचा कपाशीच्या पिकावर मोठा परिणाम झाल्याचे शेतकरी सांगतात.

आकस्मिक मरचे आजघडीला पाहता यासाठी पोषक स्थिती कायम व शिफारशीत उपाययोजना न केल्यास ‘आकस्मिक मर’ वाढू शकते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ीर्घकाळ पाण्याचा ताण पडल्यानंतर जमिनीचे तापमान वाढलेले असते. अशावेळी सिंचन दिल्यास अथवा मोठे पाऊस पडल्यास झाडाला धक्का बसून अचानक झाड सुकते, झाडाची पाने गळतात. त्यामुळे उत्पादनात मोठे नुकसान होऊ शकते, अशी माहिती परभणीतील कृषी विद्यापीठाच्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. जी. डी. गडदे, डॉ. डी. डी. पटाईत व कापूस संशोधन केंद्र नांदेडचे डॉ. ए. डी. पांडागळे यांनी दिली.

‘करपा’ व ‘दहिया’चाही प्रादुर्भाव

आकस्मिक मर प्रमाणेच औरंगाबाद जिल्ह्यातील तज्ज्ञांच्या पीक पाहणीत कपाशी पिकात ‘करपा’ व ‘दहिया’चा प्रादुर्भाव आढळून आला आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात लागवड झालेल्या व आज घडीला दाटलेल्या कपाशीत करपा व दहियाचा प्रादुर्भाव पाच ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत आहे. वातावरणातील आर्द्रता वाढत गेल्यास हे प्रमाण वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नसल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. किशोर झाडे म्हणाले. खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी म्हणाले, की ‘थ्रीप्स’चा प्रादुर्भाव जिल्ह्यात आढळला असून, आकस्मिक मरचे प्रमाण लक्षणीय आहे.

यंदा सात एकर कपाशीची लागवड केली. पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन, तरीही कपाशीत आकस्मिक मर येवून जवळपास २ एकर क्षेत्राला त्याचा फटका बसला. तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय करतो आहे. परंतु अजून त्यामध्ये यश आले नाही.
सागर राजपूत, कापूस उत्पादक, औरंगपूर, जि. औरंगाबाद
कपाशीवर यंदा सुरुवातीपासून आतापर्यंत संकटेच सुरू आहेत. शिवारातील कपाशीवर आताच्या घडीला पातेगळ व आकस्मिक मर मोठ्या प्रमाणात आहे. साधारणत: १० टक्‍क्‍यांपर्यंत आकस्मिक मर आणि ३० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत पातेगळ होते आहे. -
उद्धवराव खेडेकर, शिवनी, जि. जालना
प्रदीर्घ उघडिपीनंतर आलेल्या पावसाने पातेगळ मोठ्या प्रमाणात होते आहे. तिचे प्रमाण जवळपास ४० ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत आहे.
सदाशिव गिते, कापूस उत्पादक, देवगाव, ता.पैठण. जि. औरंगाबाद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT