Coconut Farming
Coconut Farming Agrowon
ताज्या बातम्या

Coconut Farming : राज्यात ३० हजार हेक्‍टरवर विस्तारले नारळ क्षेत्र

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

नागपूर ः महाराष्ट्रात अपारंपरिक क्षेत्रात नारळ लागवडीला (Coconut Cultivation) प्रोत्साहन देण्यासाठी नारळ विकास मंडळाने (Coconut Development Board) पुढाकार घेतला आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद, नगरसह राज्यात नारळाखालील क्षेत्र ३० हजार हेक्‍टरपर्यंत विस्तारल्याची माहिती मंडळाचे वरिष्ठ क्षेत्रीय अधिकारी शरद आगलावे यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली.

शरद आगलावे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोची हे मंडळाचे मुख्यालय आहे. त्यासोबतच बंगळूर, चेन्नई, गुवाहाटी सोबतच देशाच्या सहा राज्यांत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, अंदमान निकोबार, कोलकाता, भुवनेश्‍वर व गुजरातचा समावेश आहे.

अपारंपरिक क्षेत्रात नारळ लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न मंडळ करीत आहे. समुद्रतटीय भागातच नारळ होतो, हा समज दूर करण्यासाठी समुद्रसपाटीपासून बऱ्याच उंचीवर असलेल्या आसाम परिसरात नारळ लागवड करण्यात आली आहे.

आसाम कृषी विद्यापीठाने त्याकरिता स्वतंत्र नारळ संशोधन केंद्र स्थापन केले आहे. महाराष्ट्रात नारळ लागवड वाढावी याकरिता पालघर येथे १०० एकरांवर संशोधन केंद्र आहे. देश-विदेशांतील १६ वाणांची लागवड या ठिकाणी करण्यात आली आहे. रत्नागिरीच्या भाटे येथे प्रादेशिक संशोधन केंद्र असून, त्या ठिकाणावरून बियाणे आणत त्यापासून पालघरला रोप तयार केली जातात व ती शेतकऱ्यांना विकण्यात येतात.

छत्तीसगड राज्यातही मंडळाचा फार्म असून, तिथे पण रोपे उपलब्ध करून दिली जातात. शासकीय फार्मवरून उंच वाढणाऱ्या रोपाचे दर ७०, तर ठेंगू वाणासाठी ९५ रुपये असा आहे. बानावली तसेच यातून निवड पद्धतीने विकसित प्रताप हे दोन वाण महाराष्ट्राकरिता शिफारशीत आहेत. पाट आणि ठिबकच्या पाण्यावर देखील हे पीक घेता येते. प्रत्येक महिन्याला याला फुलधारणा होते.

त्यानुसार बारा फुले येत असली, तरी त्यातील ८ ते ९ सेट होतात व त्यापासून फळे मिळतात. नारळ उत्पादकतेच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा असा मंडळाचा उद्देश आहे. त्याच कारणामुळे अपारंपरिक क्षेत्रातही नारळाला प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद येथे शिंदे नामक शेतकऱ्याकडे २००, तर नगर जिल्ह्यात चांदा येथे शिंगणापूरजवळ तुपे नामक शेतकऱ्याने सात एकरांवर नारळ लागवड केली आहे. राज्यात सुमारे ३० हजार हेक्‍टरवर नारळ लागवड आहे.

९२ देशांत होतो नारळ

सद्यःस्थितीत ९२ देशांत नारळाचे उत्पादन होते. परंतु आशिया खंडातील इंडोनेशिया, फिलिपिन्स, भारत आणि श्रीलंका हे देश उत्पादकतेत आघाडीवर आहेत. भारतात सध्या उंच वाढणाऱ्या जातीपासून लागवडीनंतर सहाव्या वर्षांपासून ८२ वर्षांपर्यंत उत्पादन मिळते. ठेंगणे वाण ४० ते ५० वर्षांचे राहते व याला चौथ्या वर्षांपासून फळे मिळतात. उंच वाढणाऱ्या वाणापासून शहाळे, खोबरे, ऑइल, तसेच चिप्स व इतर उपपदार्थ मिळतात. करवंटी पावडरलाही जागतिक स्तरावर मागणी आहे

राज्याची नारळ लागवड स्थिती (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)

औरंगाबाद ः ५०

बीड ः ३

भंडारा ः १

कोल्हापूर ः ४११

लातूर ः ५

नाशिक ः ४०

पालघर ः १,६३०

पुणे ः ४६९

रायगड ः २,३३७

रत्नागिरी ः ५,०३०

सातारा ः २६४

सिंधुदुर्ग ः २०,०६४

ठाणे ः ०

एकूण ः ३०,३२४

समुद्रतटीय भागातच नारळ होतो हा गैरसमज आहे. त्यामुळेच नारळ विकास मंडळ अपारंपरिक क्षेत्रात नारळ लागवडीला प्रोत्साहन देत आहे. महाराष्ट्रात सध्या ३० हजार हेक्‍टरवर नारळ असून, औरंगाबाद, नगर जिल्ह्यांत हे क्षेत्र विस्तारत आहे.

- शरद आगलावे,

वरिष्ठ क्षेत्र अधिकारी, नारळ विकास मंडळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT