Banana Agrowon
ताज्या बातम्या

Banana Cucumber Mosaic : ‘कुकुंबर मोझॅक’मुळे केळी बागा काढून फेकल्या

खानदेशात कुकुंबर मोझॅक विषाणू (सीएमव्ही) मुळे सुमारे चार हजार हेक्टरवरील केळी बागा काढून फेकाव्या लागल्या आहेत. यात कोट्यवधींची हानी झाली आहे.

Chandrakant Jadhav

जळगाव ः खानदेशात कुकुंबर मोझॅक विषाणू (Cucumber Mosaic Virus) (सीएमव्ही) मुळे सुमारे चार हजार हेक्टरवरील केळी बागा (Banana Orchard Remove) काढून फेकाव्या लागल्या आहेत. यात कोट्यवधींची हानी झाली आहे.

जुलै व ऑगस्टमध्ये लागवडीच्या केळी बागांत हा विषाणू अधिक होता. या बाबत ‘अॅग्रोवन’ने मुख्य पान एकवर ठळकपणे वृत्त प्रसिद्ध करताच नाशिक स्थित केंद्रीय एकात्मिक कीड व्यवस्थापन संस्थेच्या तीन शास्त्रज्ञांनी जिल्ह्यात पाहणी केली. त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रालाही या समस्येची माहिती देण्यात आली आहे. तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठासही ‘सीएमव्ही’बाबत सविस्तर अहवाल सादर करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, मुक्ताईनगर व जामनेर तालुक्यात ‘सीएमव्ही’ अधिक आहे. रावेरात अधिकचे नुकसान झाले आहे. तसेच जळगाव, चोपडा आदी भागात अत्यल्प प्रमाण किंवा अपवादानेच ‘सीएमव्ही’ची समस्या आहे. धुळ्यातील शिरपूर भाग ‘सीएमव्ही’मुक्त मानला जात आहे.

तसेच नंदुरबारातील अक्कलकुवा, तळोदा व शहादा येथेही अत्यल्प किंवा अपवादानेच ‘सीएमव्ही’ आहे. तेथेही फारसे नुकसान नाही. परंतु रावेर, यावल, मुक्ताईनगरात मोठी हानी झाली आहे.

मागील १५ ते २० दिवसांत तब्बल चार हजार हेक्टरवरील ‘सीएमव्ही’ग्रस्तकेळी बागा काढून फेकाव्या लागल्या आहेत. या यात एकरी किमान ३० ते ३२ हजार रुपये एवढा खर्च या केळी बागांवर झाला होता. त्यात १५ रुपयांचे केळीचे रोप, खते, विद्राव्य खते, मजुरी, मशागत आदी खर्च आहे.

या बागा काढून त्यात नव्याने लागवड करण्याची वेळ आली आहे. हा नवा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तीन तालुक्यांतच किमान ३०० कोटींचे नुकसान झाले आहे. शिवाय या बागांना पुढे कसे भविष्य राहील, त्यावर ‘सीएमव्ही’ येईल, की नाही, ही चिंताही शेतकऱ्यांसमोर आहे. यामुळे केळी उत्पादक मेटाकुटीस आले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा झाला, पण घोषणा नाहीच

मुख्यमंत्र्यांचा मुक्ताईनगरात नुकताच दौरा झाला. मोठी सभा झाली. पण ‘सीएमव्ही’संबंधी कुठलीही ठोस घोषणा झाली नाही. ‘सीएमव्ही’देखील नैसर्गिक समस्या आहे. यामुळे स्वतंत्र पॅकेज जाहीर व्हायला हवे. ‘सीएमव्ही’ संसर्गाच्या काळात केळी बागांना फळ पीकविमा योजनेचेही संरक्षण नाही.

ही फळ पीकविमा योजना नोव्हेंबर ते जुलै या नऊ महिन्यांसाठी केळी पिकासंबंधी राबविली जाते. ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर यादरम्यान केळी पिकाला विमा संरक्षणही नाही आणि याच काळात मागील चार वर्षे ‘सीएमव्ही’ केळीवर थैमान घालत आहे, यामुळेदेखील समस्या तयार झाल्या आहेत. तसेच जळगाव जिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत. यापैकी कुणीही ‘सीएमव्ही’ग्रस्त बागांची पाहणी, शेतकऱ्यांना दिलासा देण्याची कार्यवाहीदेखील केलेली नाही.

मागील वर्षी माझी निम्मे बाग ‘सीएमव्ही’मुळे काढावी लागली. यंदा पूर्ण १० हजार केळी बाग काढण्याची वेळ आली आहे. ‘सीएमव्ही’बाबत शासनाकडून कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. पंचनामेदेखील केलेले नाहीत. एकरी किमान ३२ हजार रुपये खर्च वाया गेला. त्यात ‘सीएमव्ही’ग्रस्त बाग काढून रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पुनर्लागवडीची सर्कसची करावी लागत आहे. यात आणखी खर्च वाढला आहे.
विशाल महाजन, केळी उत्पादक, नायगाव, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT