Indian Agriculture
Indian Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Ecosystem : शेती ही मानवनिर्मित परिसर संस्था

निलेश हेडा

Indian Agriculture : परिसर विज्ञान जीवनाचं शास्त्र आहे. हे शास्त्र सांगत की माणससकट कोणताही सजीव हा एकटा नाही. तो एका फार मोठ्या नैसर्गिक व्यवस्थेचा छोटासा भाग आहे. जॉन डाने नावाचा लेखक लिहितो, “माणूस समुद्रातल्या बेटांसारखा सुटासुटा मुळीच नाही, तो उपखंडाचा एक भाग आहे.”

परिस्थितीकी शास्त्र सांगते आपण सारे जीव एका अशा बृहद् व्यवस्थेचा भाग असतो ज्याला परिसंस्था म्हटल्या जाते. परिसंस्थेत अनेकानेक जीव एकमेकांशी, आसपासच्या अजैविक घटकांशी संबंध ठेऊन जगत असतात. आपण निसर्गापासून वेगळे आहोत हा दुराभिमान शेवटी माणसाला केवळ मनस्तापच देतो.

ब्रिटीश संशोधक जेम्स लव्हलॉक याने १९७० च्या दशकात गाईया सिद्धांत मांडला. हा सिद्धांत हाआपल्या प्राचीन भारतीय ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेचाच आधुनिक अविष्कार आहे. प्राचीन ग्रीक पुराणांमध्ये गाईया नावाची देवता होती, जिला वसुंधरा म्हटल्या जातं.

गाईया सिद्धांत म्हणजे सबंध सजीव सृष्टीच्या नाते-संबंधाचा, परस्परावलंबन तत्वाचा, आधुनिक वैज्ञानिक सिद्धांत. पृथ्वीवरील सर्व सजीव एकमेकांशी जोडलेले आहेत कारण त्या सर्वांना स्पर्श करणारे पृथ्वीचे वातावरण, त्यांना जीवन देणारे पाणी आणि सूर्याची ऊर्जा हे स्त्रोत समान आहेत.

पृथ्वीवर जीवनाची सुरुवात ३.५ अब्ज वर्षांआधी झाली असावी, असे विज्ञान मानते. सुरुवातीचे जीव अगदीच साधे आणि सारखे दिसणारे होते. पण उत्क्रांती होता होता आजची विविधतेने नटलेली पृथ्वी आपल्याला दिसते.

त्यासाठी पृथ्वीला ३.५ अब्ज वर्षांची अविरत मेहनत करावी लागली. सहजीवन आणि परस्पर सहकार्य या दोन गोष्टींतून पृथ्वीवर विविधतेने नटलेली सृष्टी साकार झाली आहे. पेशीचा आकार तो केवढा? अगदी डोळ्यांनी दिसणार नाही इतपत छोटा. तरीसुद्धा पेशीच्या आत ज्या क्रिया चालतात त्या परस्पर सहकार्याचं एक उत्तम उदाहरण ठरावं अशा आहेत.

उत्क्रांती शास्त्रात को-इव्होल्यूशन नावाची सज्ञा आहे. याचा अर्थ होतो दोन जीवांची सोबत सोबत झालेली उत्क्रांती. फुलांचे सुंदर रंग का आहेत? कारण त्यांना परागीकरणासाठी फुलपाखरांना आकर्षित करायचं असतं. म्हणजेच सपुष्प वनस्पतींच्या उत्क्रांतीसोबतच किटकांची सुद्धा समृद्ध अशी जीवसृष्टी उत्क्रांत झाली.

शेती ही सुद्धा एक मानवनिर्मित परिसर संस्था आहे. विविध पिके, त्यावरील किटक, त्या किटकांवर अवलंबून असलेले अन्य किटक, जमिनीतले जिवाणू अशा सर्व घटकांपासून बनलेल्या व्यवस्थेत गेल्या काही दशकांत मात्र आपण प्रचंड बदल केलेत.

किटकनाशकांच्या अवाजवी वापराने शेतीला नुकसानदायक किटकांबरोबरच शेतीवर अवलंबून असणाऱ्या विविध प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी यांचाही फडशा पाडला. शेतीत नांदणारी संपूर्ण अन्न साखळीच आपण विस्कळीत करुन टाकली. व्यवस्थेला खिळ घातली.

निसर्ग शास्त्राची मदत घेऊन आणि निसर्गाला समजून घेऊन आता मानवामानवातील परस्पर संबंधाचा फेरविचार करण्याची गरज आहे. केवळ सहभागीतेनेच विकास करता येऊ शकतो. भाषेच्या, जातीच्या, धर्माच्या नावाने विभाजन करुन काहीही साध्य होणार नाही.

|निसर्गातील सहजीवन, सहभागीता, परस्पर सहकार्य, गाईया सिद्धांत, सह-उत्क्रांती या बाबी समाजशास्त्रांनी व एकूणच मानवजातीने समजून घेतले आणि त्यानुसार जर आपले मार्ग ठरवले तर एक सशक्त आणि युद्ध विरहीत मानवतेचा जन्म आपण घडवून आणू शकतो. त्यासाठी आपल्याला फार दूर जाण्याची गरज नाही. सशक्त असा निसर्ग नावाचा शिक्षक आपल्या आसपास पसरलेला आहेच.

(लेखक जैवविविधतेचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT