Maharashtra CM Oath : 'आज शपथ घेत आहात, अभिनंदन!, पण पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून मराठवाड्याचा विकास करा' : अंबादास दानवे यांची मागणी
Pune News : राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. दरम्यान ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरकार येण्याआधीच दबावतंत्र वापरत विरोधक म्हणून आमच्या काही मागण्या आहेत, असे म्हटले आहे. त्यांनी महायुतीने पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून मराठवाड्याचा विकास करावा, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत कोणत्याच पक्षाला किंवा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. मात्र यंदा महायुतीला २३० जागा मिळाल्या. ज्यात भाजप -१३२, शिंदेसेना-५७ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या आहेत. यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असून आज शपथविधी होणार आहे.
एकीकडे महायुतीच्या खात्यात मित्रपक्षांसह अपक्ष आमदार असे २३७ सदस्य संख्या झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या पदरात फक्त ५० जागा आल्या आहेत. यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट-२०, काँग्रेस-१६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रसेचे १० आमदार आहेत. यंदा विरोधातील मविआतील कोणत्याही पक्षाकडे विरोधीपक्ष नेता नियुक्त करण्याची संख्या नाही. यामुळे यंदा विधी मंडळात विरोधीपक्ष नेत्याचा चेहरा दिसणार नाही.
दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शपथविधी आधीच महायुतीकडे मागण्या मांडल्या आहेत. दानवे यांनी, देशाचे ग्रोथ इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेत आहेत. त्यांचे अभिनंदन!, पण विरोधी पक्ष म्हणून मराठवाड्यासाठी काही माफक अपेक्षा त्यांच्याकडून असतील. पक्षभेद, द्वेष बाजूला ठेवून ते मराठवाड्याचा विकास करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
दानवे यांनी, जायकवाडी धरणाच्या कालव्यांची जलवहन क्षमता निम्म्यापेक्षा खाली गेली आहे. या कालव्यांचे पुनरुज्जीवन करून पाण्याची गळती शून्यावर आणत नासाडी रोखावी. पाटबंधारे विभागात रिक्त असलेल्या पदांची सरळ भरती करून मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर- नगर- पुणे ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग केवळ कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात यावा. संभाजीनगर- नगर- पुणे या विद्यमान मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी दुमजली रस्तेनिर्मिती करावी. जालना-नांदेड दरम्यान ऍक्सेस कंट्रोल्ड महामार्ग निर्मितीच्या कामाचा आरंभ आणि त्याचे लोकार्पण विद्युतगतीने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त दानवे यांनी यावेळी केली आहे.
तर ऑरिक- बिडकीनच्या दुसऱ्या टप्प्याचे भूमी अधिग्रहण आणि किमान दीड लाख कोटींची गुंतवणूक मराठवाड्यासाठी देताना छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. महायुतीच्या आणि आपण दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 'तीन महिन्यात' शहरवासीयांना दररोज पाणी देता येईल असे नियोजन करावे. अन्यथा आंदोलनांच्या मालिकेला सरकारला सामोरे जावे लागेल असाही इशारा दानवे यांनी दिला आहे.
मराठवाड्यात बोटावर मोजण्याइतकी शहरे उरली आहेत जिथे नागरिकांना दरदिवशी पाणी मिळते. मराठवाड्यातील तमाम शहरांच्या पाणीप्रश्नांवर तातडीने उपायोजना हव्यात आणि कालबाह्य पाणीपुरवठा योजना बाद करून नागरिकांना दरदिवशी पाणी देण्याची तजवीज करावी. पर्यटकांची वाढती संख्या पाहता छत्रपती संभाजीनगरला उदयपूर, बोधगया आदी ठिकाणांशी जोडण्याकरिता विमानांची अधिक उड्डाणे देण्यात यावीत, असेही दानवे यांनी म्हटले आहे.
तसेच घृष्णेश्वर, परळी आणि औंढा नागनाथ ही ज्योतिर्लिंगे महाराष्ट्राचाच भाग असून देशातील अन्य ज्योतिर्लिंग मंदिरांच्या धर्तीवर इथेही विशेष निधी देऊन विकासकामे हाती घ्यावीत. तर विदर्भातील 'मिहान'च्या शिष्टमंडळाने मराठवाड्यातील उद्योजकांना प्रलोभने देऊ नयेत, अशा मागण्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केल्या आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.