
Kolhapur News : गेल्या दोन महिन्यांपासून सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी भागात भात रोपांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे भात रोपे टाकण्याची कामे अर्धवट झाली आहेत. याचा फटका रोप लागणीला बसत आहे.
भाताचे क्षेत्र असलेल्या पश्चिम भागातील शेतकरी रोपांची दारोदारी फिरत असल्याचे अनपेक्षित चित्र दिसत आहे. वेळेत रोपलागण न झाल्यास याचा फटका भाताच्या लागवडीबरोबर उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भात लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टरवर भात लागवड होते. एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या सुमारे १८.८० टक्के क्षेत्र भाताखाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना आणि चांगला पाऊस यामुळे भात लागवडीसाठी हे अनुकूल क्षेत्र आहे. विशेषतः जिल्ह्यातील पश्चिम भागातील तालुके जसे की गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा यांसारख्या तालुक्यांमध्ये भात लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
जिल्ह्याचे भात हे खरिपाचे प्रमुख पीक आहे. रोप लावणी साधारणपणे जून-जुलै महिन्यांत सुरू होते. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला तरव्याची (रोपवाटिकेची) पेरणी करून जुलै महिन्यात भात रोपांची लावणी केली जाते. चांगला पाऊस झाल्यानंतर लावणीच्या कामाला वेग येतो. १५ जुलैपर्यंत भाताची लावणी पूर्ण करण्याचा सल्ला दिला जातो. पंधरा मे पासून सतत पाऊस सुरू आहे.
साधारणतः मे च्या अखेरीस रोप लावणीसाठी तरू टाकले जातात. जुलै महिन्यात तरू लागवडीसाठी उपलब्ध होतात. सतत पडणाऱ्या पावसामुळे भाताच्या रोपे खराब होत आहेत. यामुळे लावणीसाठी रोपांची उपलब्धता कमी होत आहे.
अनेक ठिकाणी भात संशोधन केंद्रातून शेतकऱ्यांना रोपे दिली जात आहे. पण तिथे ठराविक वाणच उपलब्ध असल्याने हवा असणाऱ्या भाताची रोपे मिळविण्यात अडचणी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांनी रोपे टाकली आहेत, त्यांची दोन ते तीन आठवड्यांची भात रोपे झाली आहेत.
यंदा मॉन्सूनचे आगमन लवकर झाल्यामुळे शेतकऱ्यांना भात पेरणीसाठी संधीच मिळाली नाही. ज्यांनी पेरणी केली ती पेरणीही अतिपावसामुळे पेरणी वाया गेली आहे. अनेक शिवारातून पावसाचे पाणी साचल्याने तेथे भातरोपांची लागण केल्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी भातरोप लागणीवर भर दिला आहे.
त्यातून भातरोपांची मागणी वाढली आहे. मुळात रोपांची टंचाई असल्याने शेतकऱ्यांना रोपांसाठी गावोगावी फिरण्याची वेळ आली आहे. कितीही किंमत मोजायला शेतकरी तयार असताना रोपे मिळत नाहीत. अशी परिस्थिती झाली आहे. त्यातून चढ्या भावाने रोपे मिळवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू लागले आहेत; पण रोपे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे.
सोशल मीडियातून चौकशी
पश्चिम भागातील अनेक शेतकऱ्यांनी रोपांच्या चौकशीसाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. शेतकऱ्यांकडून अनेक ग्रुपमध्ये आपल्याला हव्या त्या वाणांची चौकशी होत असल्याचे चित्र आहे. ज्यांच्याकडे रोपे उपलब्ध आहेत त्यांच्याकडून अपेक्षित माहितीची देवाणघेवाण सुरू आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.