
Modern Farming Methods:
शेतकरी नियोजन । पीक : भात
शेतकरी : राजेश परशुराम तावडे
गाव : नाधवडे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण जमीन : ९ एकर
भात लागवड : २ एकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाधवडे (ता. वैभववाडी) येथे राजेश तावडे यांची ९ एकर शेतजमीन आहे. यातील सात एकरांत आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी लागवड आहे. तर दोन एकरांमध्ये खरीप हंगामात भात लागवड केली जाते. साधारणपणे १० गुंठे क्षेत्रात पांरपरिक भात बियाण्यांची, तर उर्वरित क्षेत्रात रत्नागिरी आठ या वाणाची लागवड केली जाते.
भात लागवडीमध्ये रोप निर्मितीपासून पुनर्लागवड ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणाचा पर्याय अवलंबिला आहे. बेडवर भात रोपांची निर्मिती, नांगरणीकरिता पॉवर टिलर, भात पुनर्लागवडीकरिता लागवड यंत्र, तण काढण्यासाठी कोळपणी, कापणी यंत्र आणि मळणी यंत्राचा वापर केला जातो. सध्या भात रोपवाटिकेचे काम पूर्ण झाले आहे. पुनर्लागवड यंत्राद्वारे भात रोपांची लागवड केली जाईल, असे राजेश तावडे यांनी सांगितले.
रोपवाटिका नियोजन
बेडवर भात रोपवाटिका तयार केली जाते. त्यासाठी मे महिन्यात माती आणि शेण समप्रमाणात घेऊन लहान चाळणीने चाळून घेतले जाते.
यंत्राद्वारे भात लावणी करण्यासाठी विशिष्ट आकाराच्या साचामध्ये भात बियाणे पेरले जाते.
भात रोपांसाठी बेडची आखणी केली जाते. प्लॅस्टिक पेपर अंथरून त्यावर साधारण ३ बाय ४ फूट लांबी रुंदीचे बेड तयार केले जातात. त्यावर चाळून घेतलेली माती आणि शेण यांचे मिश्रण करून अर्धा इंच जाडीने पसरविण्यात येते. असे एकूण २१ बेड तयार केले जातात.
पेरणीपूर्वी बियाण्यास मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया केली जाते. त्यासाठी बियाणे २४ तास पाण्यात भिजत ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घेतले जाते. वजनाने हलके, किडके, पाण्यावर तरंगणारे बियाणे बाजूला काढले जाते. त्यानंतर बियाणे पुन्हा २४ तास गोणपाटात ठेवले जाते.
मिठाच्या पाण्याचा प्रक्रिया केल्यानंतर बियाणे बेडवर पसरविण्यात येते. बेडवर बियाणे पसरवून ठेवल्यानंतर त्यावर मातीचा हलका थर दिला जातो. मातीचा थर देताना बियाणे दिसणार नाही इतकीच माती पसरविली जाते.
मे महिन्यात नियोजित लागवड क्षेत्रामध्ये चांगले कुजलेले शेणखत २ ट्रॉली प्रमाणे पसरले जाते. त्यानंतर या संपूर्ण क्षेत्राची दोन वेळा पॉवर ट्रिलरच्या मदतीने चांगली नांगरणी केली जाते.
१० जून दरम्यान भात बियाण्याची पेरणी केली आहे. ही रोपे साधारणपणे २५ जूनच्या दरम्यान पुनर्लागवडीसाठी तयार होतील.
पुनर्लागवड नियोजन
भात रोपवाटिकेतील रोपे साधारणपणे १५ ते १६ दिवसांनी लागवडीयोग्य होतात. त्या वेळी साचातून रोपांचे बेड अलगद मातीसह निघून येतात. रोप पुनर्लागवडीपूर्वी जमिनीची मशागत वेळेत पूर्ण केली जाते.
भात लागवड यंत्राद्वारे एसआरआय पद्धतीने केली जाते. त्यामुळे प्लॅस्टिक पेपरवर तयार केलेल्या रोपांची लागवड सोपी होते. या पद्धतीने तयार केलेल्या रोपे सहजपणे उचलता येतात.
राइस ट्रान्स्प्लान्टर यंत्रामध्ये एका वेळी रोपांचे चार बेड व्यवस्थित ठेवून लावणी केली जाते. दोन रोपांमध्ये आडवे १ फूट, तर उभ्या रोपांमध्ये सात ते आठ इंच अंतर राखले जाते. साधारण दोन ते तीन काडीने लागवड केली जाते. त्यानुसार मशिनमध्ये ॲडजेस्टमध्ये केली जाते.
पुनर्लागवडीच्या वेळी १५ः१५ः१५ हे रासायनिक खत दिले जाते. त्यानंतर यंत्राद्वारे लागवड केली जाते.
दोन एकरांत पुनर्लागवडीची कामे साधारण २ ते ३ दिवसांत पूर्ण होतात. सिंचनासाठी विहिरीतील पाण्याची सोय असल्याने पुनर्लागवडीत खंड पडत नाही. त्यामुळे पावसाची तीव्रता कमी असली तरी लागवड करणे शक्य होते. राइस ट्रान्स्प्लान्टर यंत्राद्वारे संपूर्ण लागवड करत असल्यामुळे मजुरी खर्चात मोठी बचत होते.
पुर्नलागवडीनंतर १५ दिवसांनी यंत्राद्वारे कोळपणी केली जाते. कोळपणीनंतर युरिया खताची पहिली मात्रा दिली जाते. त्यानंतर १५ ते २० दिवसांनी पुन्हा युरिया खताची मात्रा दिली जाते.
रोप लागवडीनंतर २० दिवसांनी युरिया खताची पहिली मात्रा दिला जाते. त्यानंतर महिन्याभराच्या अंतराने दुसरी मात्रा दिली जाते.
- राजेश तावडे, ९४०४४५०००२
(शब्दांकन : एकनाथ पवार)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.