
Gujrat News: भारताची कृषी व्यवस्था झपाट्याने बदलत आहे. शेतीचे चित्र बदलण्यासाठी पुढाकार घेऊन नवी धोरणे आणली जात आहेत. नव्या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात क्रांती येत असून भारत लवकरच विद्राव्य खत उत्पादनात आघाडीवर येईल’, असे प्रतिपादन गुजरातचे कृषी व ग्रामविकास मंत्री राघवजीभाई पटेल यांनी केले.
सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशन (एसएफआईए) यांच्या वतीने गुरुवारी (ता. ३) गांधीनगर येथील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन सेंटर येथे आयोजित ‘सोम्स–२०२५’ यांच्या वतीने ‘कृषी उद्योजकता’ या संकल्पनेवर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उद्घाटनप्रसंगी मंत्री पटेल बोलत होते.
या वेळी सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीब चक्रवर्ती, राष्ट्रीय सचिव विनोद गोयल, राष्ट्रीय कोशाध्यक्ष, महाराष्ट्र अध्यक्ष बाळासाहेब ठोंबरे आदींसह कृषी संशोधक, धोरणकर्ते, यासह कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठे यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. पटेल म्हणाले, की कृषी क्षेत्राच्या विकासाची जबाबदारी सर्व घटकांवर आहे. येणाऱ्या काळात मानवी आरोग्य व शेतीचे आरोग्य ही जपावे लागणार आहे. रासायनिक खतांचा वाढता वापर नियंत्रित करण्यासाठी नवीन विद्राव्य खतांचा पर्याय शेतकऱ्याने स्वीकारावा.
या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रांचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. रामटेके, विदर्भ इंडस्ट्रीज असोशिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुद्धे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे, कृषी उद्योजक डॉ. स्वप्नील बच्छाव आदी मान्यवर उपस्थित होते.
‘ॲग्रोवन’च्या कृषी पत्रकारांचा गौरव
यंदाच्या वर्षापासून सोल्युबल फर्टिलायझर इंडस्ट्री असोसिएशनतर्फे मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजी या चार भाषांत राष्ट्रीय कृषी पुरस्कार सुरू केले आहेत. त्यामध्ये मराठी भाषा मुद्रित गटासाठी ‘ॲग्रोवन’चे नाशिक प्रतिनिधी मुकुंद पिंगळे हे विजेते तर अकोला प्रतिनिधी गोपाल हागे हे उपविजेते ठरले. तर मराठी भाषा डिजिटल माध्यमासाठी ‘ॲग्रोवन’ डिजिटलचे धनंजय सानप यांना पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार निवड समितीमध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहसंचालक डॉ. कल्याण कुमार सिन्हा, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. सुहास बुद्धे यांनी काम पाहिले.
कृषी पत्रकारितेला पाठबळ देण्याची गरज
कृषी क्षेत्रात शेतकरी, संशोधक, धोरणकर्ते व उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणण्याचे काम कृषी पत्रकारितेच्या माध्यमातून होते. कृषी विकासाच्या नव्या संकल्पना या माध्यमातून उमगतात. त्यातूनच कृषी क्षेत्राचे चित्र खऱ्या अर्थाने बदलत आहे. यातून कृषी विस्तार व समस्यांवर वाचा फोडण्याचे काम होत आहे. त्यामुळे कृषी पत्रकारितेला पाठबळ देण्याची गरज आहे, असे राजीब चक्रवर्ती यांनी आवर्जून सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.