
Mumbai News: मुंबईत टिळक भवनाबाहेर कॉंग्रेस पक्षाने आज (ता.८) निवडणूक आयोगाविरोधात रास्ता रोको आंदोलन केले. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रास्ता रोकोत सर्व तालुका आणि ब्लॉक अध्यक्ष सहभागी झाले. आंदोलकांनी बोगस मतदान, ईव्हीएम मध्ये गडबड आणि निवडणुकीतील अनियमिततेचे आरोप करत सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी केली.
राहुल गांधी यांनीही यापूर्वी निवडणूक आयोगावर भाजपाच्या दबावाखाली काम केल्याचा आरोप केला होता. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून आयोगावर पारदर्शकतेसाठी दबाव वाढला आहे.काल (ता.७) कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. त्यांनी म्हटले की, निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात अनियमितता केली आहे.
विशेषत: बोगस मतदान आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन मध्ये गडबड झाल्याचा त्यांचा दावा आहे. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला या आरोपांचे स्पष्टीकरण देण्याची आणि निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी केली. त्यांनी असा आरोपही केला की, निवडणूक आयोग भाजपाच्या दबावाखाली काम करत आहे आणि सामान्य जनतेच्या मतांचा अपमान करत आहे.
या पार्श्वभूमीवर आज कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी टिळक भवनाबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी महाराष्ट्रातील निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी निवडणूक आयोगाने सामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप केला आणि भाजपाच्या नेत्यांना निवडणूक आयोगाच्या चुका झाकण्यासाठी पुढे येत असल्याचा दावा केला.
आंदोलकांनी “सीसीटीव्ही दाखवा, लोकशाही वाचवा” अशा घोषणा देत निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी लावून धरली. आंदोलकांनी असा दावा केला की, बोगस ईव्हीएमच्या जोरावर सध्याचे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे आता मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. याशिवाय, निवडणुकीच्या काळात लाखो मतदार कसे वाढले, याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.
कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आंदोलनादरम्यान सांगितले, “निवडणुकीत मतांची चोरी झाली आहे. देशाचा चौकीदारच चोर आहे, हे आज सिद्ध झाले आहे. आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही रस्ता सोडणार नाही.” कॉंग्रेसचे सर्व तालुकाध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष मागील दोन दिवसांपासून मुंबईत प्रशिक्षणासाठी आले होते, आणि ते सर्वजण आज या आंदोलनात उतरले.
आंदोलकांनी निवडणूक आयोगावर आरोप करताना म्हटले की, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याने लोकशाही धोक्यात आली आहे. त्यांनी निवडणूक आयोगाला आव्हान देताना म्हटले की, जर आयोगाला आपली प्रक्रिया पारदर्शक वाटत असेल, तर त्यांनी निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे. या आंदोलनाने मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, निवडणूक आयोगावर दबाव वाढला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.