
Nagpur News : गेल्या महिनाभरापासून उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात सर्वदूर हजेरी लावली आहे. परिणामी, कापूस, सोयाबीन, तूर उत्पादकांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
विदर्भाच्या काही भागांत २२, तर काही भागांत ३० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. सध्या सोयाबीनचे पीक काही भागांत फुलावर, तर काही भागांत शेंगांवर आहे. अशावेळी पिकांना पाण्याची गरज असते. कपाशीचे पीकही फूल तर काही भागात बोंड भरण्याच्या अवस्थेत आहे.
पीकवाढीच्या अवस्थेत पाण्याची गरज असताना पावसाने खंड दिल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. कोरड्या दुष्काळाची मागणी विदर्भातील सर्वच जिल्ह्यातून होत होती. आता मात्र दोन दिवसांपासून कमी, अधिक प्रमाणात पाऊस बरसत असल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे.
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७६.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर वर्धा जिल्ह्यात ५२.२, ब्रह्मपुरी ३०.४, अमरावती ३०, गोंदिया २०.४, गडचिरोली १२.६, बुलडाणा ५, यवतमाळ ३.२, वाशीम २, अकोला १.१ मिमी याप्रमाणे पावसाची नोंद करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी पावसाने खंड दिल्याने त्याचा उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.