
अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः गेल्या महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने मागील पंधरा दिवसांपासून पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत. कोकणातील ठाणे, पालघर जिल्ह्यांतील पाच गावे आणि १६ वाड्यांना नऊ टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात झाली आहे.
येत्या काळात पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करावा लागणार आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीतही वाढ झाली होती. तसेच पाणीटंचाईपासून सुटका झाल्याचे सर्वांना वाटत होते.
मात्र काही ठिकाणी कमी झालेला पाऊस व अधिक पाण्याचा उपसा यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाईचे संकट उभे राहू लागले आहे.
गेल्या महिन्यापासून उन्हाच्या झळा वाढल्याने पाणीटंचाईची समस्या गावात व वाड्यावस्त्यांवर वाढू लागली आहे. नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा व्हावा म्हणून शासनाच्या माध्यमातून दरवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो.
यंदाही टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, २३ जानेवारीच्या दरम्यान पालघरमध्ये पहिला टँकर सुरू झाला आहे.
त्यानंतर हळूहळू टँकरच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. सध्या पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर विभागांत पाणीटंचाई नसली, तरी ठाणे विभागात पाणीटंचाईस सुरुवात झाली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यातील रत्नागिरी, पालघर आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांतील नऊ गावे आणि पाच वाड्यांवर सात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टँकरच्या संख्येत वाढ दोन टँकरने वाढ झाली असून, सध्या नऊ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात व कोकणात पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बहुतांशी धरणे भरून भूजल पातळीत वाढ झाली होती. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पाणीटंचाई सुरू झाली आहे. ठाणे विभागात पाणीटंचाईने चांगलेच डोके वर काढले आहे.
ठाणे, पालघर जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र होत असून, या ठाणे जिल्ह्यातील दोन गावे आणि ६ वाड्यावस्त्यांवर तीन टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये पालघर जिल्ह्यातील तीन गावे दहा वाड्यावस्त्यांवर सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.
मराठवाडा, विदर्भातही टँकरची शक्यता
सध्या राज्यात टप्प्याटप्प्याने टँकरच्या संख्येत वाढ होत आहे. मागील काही वर्षांत मराठवाड्यात पाणीटंचाई चांगलीच वाढत होती.
परंतु गेल्या दोन वर्षांपासून मराठवाडा, विदर्भाच्या बहुतांश भागांत चांगला पाऊस होत असल्याने पाणीटंचाई कमी होण्यास मदत झाली आहे.
येत्या काही दिवसांत या भागात देखील टँकर सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी आतापासून पाण्याचा जपून वापर करण्याची गरज असून, भूगर्भातील पाण्याचा कमी उपसा करण्याची गरज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.