
चांगली वैरण (Fodder) ही उत्तम दूध उत्पादनाची गुरुकिल्ली आहे, कारण दुभत्या जनावरांवर होणाऱ्या एकूण खर्चापैकी ६५ टक्के खर्च हा आहारावर होतो. हा खर्च कमी करण्यासाठी पुरेसा हिरवा आणि कोरडा चारा उपयोगी ठरतो. पण सध्या देशात हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झालाय. केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाने देलेल्या माहितीनूसार देशातील चारा उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झालीय. त्यामुळे दुग्धव्यावसायिकांना चारा टंचाईचा सामना करावा लागतोय. भारतीय चारा संशोधन संस्थेने दिलेल्या आकडेवारीनूसार देशात हिरवा चारा ११ .२४ टक्के, कोरडा चारा २३.४ टक्के आणि सुमारे २८ .९ टक्के खनिज मिश्रणाची कमतरता आहे. वाढते शहरीकरण, कुरणांची घटती उत्पादकता, दर्जेदार चारा बियाण्यांची कमतरता, व्यावसायिक पीक लागवडीचे वाढते क्षेत्र तसेच एकाच प्रकारची पिके घेतल्यामुळे देशात चाऱ्याचे उत्पादन कमी होत आहे. चाराटंचाईमुळे चाऱ्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळे दुधउत्पादक शेतकरी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
देशातील चाऱ्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारे आणि भागधारकांसोबत नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्याची परिस्थिती नियंत्रणात असली तरी चाऱ्याच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे अशी माहिती सहभागी राज्यांनी दिली.
शासनातर्फे चारा उत्पादन आणि चारा विकासासाठी राष्ट्रीय पशुधन मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत जास्त उत्पादन देणाऱ्या चारा वाणांच्या बीजोत्पादनासाठी चारा पिकाला नगदी पीक म्हणून प्रोत्साहन दिले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत चारा पिकाखालील क्षेत्र वाढविणे तसेच चारा पीक लागवडीत विविधता आणणे यासाठी आर्थिक मदत केली जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या पुढाकाराने झाशीस्थित इंडियन ग्रासलँड अँड फॉडर रिसर्च इंस्टिट्यूटने २० राज्यांसाठी तयार केलेल्या चारा संसाधन योजनाही अंमलबजावणीसाठी राज्यांना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील पशुपालकांनाही दरवर्षी चारा टंचाईचा सामना करावा लागतो. महाराष्ट्रातील ऊसशेतीमुळे चारा लागवडीचे क्षेत्र कमी झालेले आहे. उसाचे क्षेत्र २० टक्क्यांनी कमी करुन त्याठिकाणी चारा पिकाची लागवड केली तर चारा टंचाई वर तोडगा निघू शकतो. आपल्याकडे जनावरांना चारा म्हणून अनेक पशुपालक उसाचे वाढे देतात. चारा लागवडीचे क्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे हे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जनावरांना संतुलित आहार देत असताना सर्व खाद्य घटकांचे योग्य प्रमाण महत्त्वाचे असते. आपल्याकडे पशुपालक त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या चाऱ्यानूसार जनावरांच्या आहारात बदल करत असतात. पावसाळ्यात हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. तर उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची टंचाई असते. आहारात अतिरिक्त प्रमाणात हिरव्या चाऱ्याचा समावेश केल्यास, जनावरांना पोटफुगीसारखे आजार होतात तर, कोरडा चारा जास्त दिल्यामुळे जनावरांना उरमोडीसाखे आजार होतात. त्यामुळे समतोल आहाराच्या दृष्टीने हिरव्या आणि कोरड्या चाऱ्यांचे योग्य प्रमाण असावे लागते. पंजाब मधील बहुतांश पशुपालक मुरघास बनवतात. त्यामुळे तिथे जनवरांना बारमाही मुरघास स्वरुपात चारा उपलब्ध असतो. खरीप हंगामात हिरव्या चाऱ्यापासून जास्तीत जास्त मुरघास बनवून ठेवावा. फेब्रुवारी ते जूनपर्यंत उपलब्ध असणाऱ्या कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर करावा. मुरघास आणि चारा प्रक्रियेमुळे निश्चितच कमी चाऱ्यात जनावरांचे संगोपन करणे सोयीस्कर होते. याशिवाय जनावरांना चारा म्हणून उसाचे वाढे न देता बाजरी, ज्वारी, मका यासारख्या चारा पिकासोबतच बरसीम, ल्युसर्ण, ओट या द्विदलवर्गीय चाऱ्याची लागवड करावी. पशुपालकांनी आपल्या शेतीत जनावरांच्या संख्येनूसार चारा लागवडीसाठी राखीव क्षेत्र ठेवावे. त्यामुळे चाऱ्यावर होणारा खर्च तसेच टंचाई चा सामना करावा लागणार नाही. अशी माहिती पशुतज्ज्ञ डॉ. दिनेश भोसले यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.