
आळंदी, जि. पुणे ः संत ज्ञानेश्वर महाराजांच्या (saint Dnaneshwar) संजीवन समाधी (Sanjewwan Samadhi) दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात मंगळवारी (ता. २२) आळंदीत झाला. संत नामदेव महाराजांच्या वंशजांच्या कीर्तनात माउलींच्या समाधी प्रसंगाच्या कथनात अवघी आळंदी गहिवरून गेली. माउली नामाचा अखंड घोष करीत हजारो भाविकांनी माउलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून नतमस्तक झाले.
मुख्य गाभाऱ्यातील समाधी गाभारा पुजाऱ्यांत ब्रह्मवृंदांनी मंत्रघोषात समाधी सजविली. चांदीचे सिंहासन, सोनेरी छत्रचामर, अत्तर आणि चंदनाचा दर्प समाधीभोवती दरवळत होता. गाभाऱ्यातील आकर्षक फुलांची आरास, तुळशीच्या हाराने सजविलेली समाधी आणि समाधीपुढे स्थानापन्न केलेल्या संत नामदेवांच्या पादुका या मनमोहक दृश्याने भारावलेले वारकरी माउलीनामाचा अखंड गजर करत होते.
दरम्यान, कार्तिक वद्य त्रयोदशी असल्याने शहरात सर्वत्र फडांमधून माउलींच्या समाधी प्रसंगाचे कीर्तन चालू होते. प्रदक्षिणा रस्त्यावरून भाविकांची गर्दी होती. देऊळवाड्यातही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळी आठच्या सुमारास महाद्वारात हैबतबाबांच्या वतीने कीर्तन, तर दहा वाजता वीणा मंडपात नामदेव महाराजांचे सोळावे वंशज केशव महाराज नामदास यांचे कीर्तन सुरू होते.
पोलिस प्रशासनातील कर्मचारीही कीर्तनात दंग झाले होते. समाधीची वेळ जवळ येऊन ठेपली होती. एवढ्यात समाधी प्रसंगाच्या रंगल्या कीर्तनातच वीणा मंडपातील नामदास महाराजांनी संत नामदेव महाराजांच्या पादुका हातात घेऊन समाधीजवळ नेऊन ठीक सव्वाबारा वाजता स्थानापन्न केल्या.
या वेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अॅड. विकास ढगे, डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी पादुकांची विधिवत पूजा केली. या वेळी खासदार संजय जाधव, बाळासाहेब आरफळकर, बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार यांच्यासह नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी, मानकरी, सेवेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
दरम्यानच्या काळात सेवेकऱ्यांनी भाविकांच्या हातात तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांच्या पाकळ्या दिल्या. माउलींचा समाधी प्रसंग जवळ येऊन ठेपला होता. भाविक दंग झाले होते. वीणा मंडपातील माधव नामदास महाराजांनी आपल्या कीर्तनातून ‘नामा म्हणे आतां लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ,’ असे सांगताच उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. सातशे वर्षांपूर्वीच्या समाधी प्रसंगाच्या आठवणीने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.
नामदेव महाराजांच्या पादुकांच्या पूजनानंतर दुपारी साडेबारा वाजता भाविकांनी घंटानाद करून हातातील तुळशीच्या मंजिऱ्या आणि फुलांची मुक्त उधळण करत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’ आणि माउलीनामाचा धावा केला. त्यानंतर आरती झाल्यावर विश्वस्तांच्या हस्ते नामदास कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर महाराजांच्या पादुका डोक्यावर घेत नामदास महाराजांनी मंदिर प्रदक्षिणा केली. त्यानंतर समाधी दिनाची सांगता झाली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.