
पंढरपूर, जि. सोलापूर ः ‘‘कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी (Sane Guruji) दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले. त्या काळात सनातनी व्यवस्थेविरुद्ध (Sanatani System) ते मजबुतीने उभे राहिले. त्यासाठी मोठी चळवळ उभी केली. ही चळवण, आंदोलन विसरता येण्यासारखे नाही,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.
साने गुरुजींनी विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना उघडे व्हावेत, यासाठी तनपुरे महाराज मठात केलेल्या उपोषणाला ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त तनपुरे महाराज मठात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे महाराज पुण्यतिथी निमित्त झाला.
या सोहळ्यात पवार यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मंचावर बद्रीनाथ तनपुरे महाराज, आमदार बबनराव शिंदे, पन्नालाल सुराणा, राजाभाऊ अवसक, माधव कारंडे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संभाजी दहातोंडे श्रदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा होता. विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा देव असूनही त्यामध्ये लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे गुरुजींनी त्या वेळच्या मुंबई सरकारकडे पत्र लिहून मागणी केली. विठ्ठल देवस्थानच्या पंच कमिटीकडे पत्रे लिहून आवाहन केले की सर्व माणसे देवाची लेकरे आहेत.
या लेकरांना मंदिरात प्रवेश मिळावा. यासाठी शेवटी गुरुजींनी १ मे ते १० मे या काळात पंढरपुरात उपोषण केले. संत तनपुरे मठात साकारलेले साने गुरुजींचे स्मारक या चळवळीची महती सांगणारे ठरेल. तनपुरे महाराज यांनीही समतेचा विचार सातत्याने जपला. ते लोकांच्या अंतरंगात आहेत.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.