
Sindhudurg News : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २५) जोरदार पुनरागमन झाले. कधी ऊन, तर कधी हलक्या सरी असे असलेले वातावरण देखील पूर्णतः बदलून गेले.
संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले असून, पावसाची रिपरिप सर्वत्र सुरू आहे. वातावरणात गारवादेखील निर्माण झाला आहे. या पावसामुळे पिकावरील संकट टळले आहे.
जिल्ह्यात १६ ऑगस्टला दमदार सरी कोसळल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. पहाटे दाट धुके, त्यानंतर कधी कडक ऊन, तर काही भागांत हलक्या सरी असेच चित्र गेल्या आठ दिवसांपासून होते. काही भागांत अजिबात पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे भरड जमिनीतील भात, नाचणी, भुईमूग यांसह विविध पिके धोक्यात आली होती.
काही भागातील नाचणीच्या रोपांनी पावसाअभावी मान टाकण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २५) सायंकाळपासूनच पावसाळी वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सायंकाळी जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाच्या दमदार सरी कोसळल्या. त्यानंतर शनिवारी (ता. २६) पहाटेपासून जिल्ह्यात सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले.
अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरू झाली. त्यामुळे जवळपास महिनाभरानंतर शेतमळ्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यात सर्वत्र पावसाच्या सरी बरसत आहेत. दमदार पावसामुळे जिल्ह्यात पिकांवर आलेले संकट तूर्तास टळले आहे. पावसामुळे हवेत गारवादेखील निर्माण झाला आहे.
आणखी दोन दिवस पडण्याचा अंदाज
जिल्ह्यात शनिवारी (ता. २६) सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यानंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.