
Beed News : पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने यंदाच्या पावसावर अलनिनोचा प्रभाव असल्याचे भाकित करीत दुष्काळीस्थितीचे संकेत दिले होते. जून महिन्यात वरुणराजाने उशिरा हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पडलेल्या पावसावर खरीप पिकांची पेरणी उरकून कपाशीची लागवडही केली होती. जुलै महिन्यात मराठवाडा वगळता संपूर्ण देशासह महाराष्ट्रात पावसाची धो धो बरसात होत असताना मराठवाड्यातील शेतकरी मात्र रिमझिम पावसावरच समाधान मनात होता.
ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या दिवसापासून मात्र पावसाने बीड जिल्ह्यावर वक्रदृष्टी केली. मागील २२ दिवसांपासून सतत पावसाचा खंड पडला असून, या काळात केवळ १८.६ मिलिमीटर एवढाच पाऊस पडला. पुढे दिवसेंदिवस दररोज पडणारे ऊन, सोसाट्याचा वारा यामुळे जमिनीतील ओल संपल्याने खरिपातील कमी कालावधीची सोयाबीन, मुग, बाजरी, उडीद यासारखी पिके सुकू लागली तर, कपाशीही पाण्याअभावी पिवळी पडली.
माळरानावरील पिकांनी चक्क माना टाकल्या असून हातची जाणारी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्नही तोकडे पडत आहेत. परिणामी शेतकरी चिंताग्रस्त आहे. दुसरीकडे भर पावसाळ्यात जिल्ह्यातील प्रकल्पातील पाणीसाठा मृतावस्थेत गेला असून अनेक भूगर्भातील पाणीपातळीही खालावल्याने अनेक गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. प्रकल्पातील सद्यःस्थितीत असलेला पाणीसाठा आरक्षित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. पिके हातची जात असल्याने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी सर्वस्तरातून होऊ लागली आहे.
मागील २२ दिवसांत बीड जिल्ह्यातील २३ मंडलांत १५ मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यात राजुरी, पिंपळनेर, पेंडगाव, आष्टी, अमळनेर, धामणगाव, पिंपळा, मदळमोही, जातेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवाकी, अंबाजोगाई, लोखंडी, केज, हनुमंत, विडा, बनसारोळा, मोहखेद, वडवणी, शिरूर या मंडळाचा समावेश आहे. तर ऑगस्ट महिन्यातील मागील सततच्या २२ दिवसांत जिल्ह्यातील गेवराई ९.९ टक्के, तर धारूर तालुक्यात ९.४ टक्के एवढा पाऊस पडला असून, सर्वाधिक शिरूरकासार (१७.६ टक्के) आणि पाटोदा तालुक्यात (१५.६ टक्के) पाऊस पडला आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत पडलेला पाऊस हा वार्षिक सरासरीच्या केवळ ४५ टक्के पडला आहे, ऑगस्ट महिन्याची एकूण सरासरी १३८ मिलिमीटर असताना बुधवार (ता.२३) केवळ १८.६ मिलिमीटर एवढाच पडला असून तो केवळ १३ टक्के आहे.
जिल्ह्यात यंदा ९७ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली असून बाजरी, कपाशी, सोयाबीन, मुग, तूर, उडीद आदी प्रमुख पिकांच्या पेरणीचे क्षेत्र सात लाख ६६ हजार हेक्टरांहून अधिक आहे. जिल्ह्यातील ६३ महसूल मंडळांपैकी ४१ महसूल मंडळांत १५ ते २२ दिवसांचा पावसाचा खंड झाला असल्याने पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.