
बुलडाणा ः राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक (Soybean Cotton Farmer) शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली आहे. या मागण्यांबाबत त्यांनी देशाचे पंतप्रधान, केंद्रीय वाणिज्यमंत्री, तसेच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन पाठवले आहे.
तुपकर म्हटले, ‘‘या वर्षी निसर्गाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. राज्यातील ५० टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक असून, कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. देशाच्या सोयाबीनच्या उत्पादनात ४० टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. यावर्षी सोयाबीन आणि कापसाचा उत्पादन खर्च वाढला असून त्या तुलनेत भाव कमी आहे.
यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. सोयाबीनचा प्रतिक्विंटल भाव ८७०० व कापसाला १२ हजार ३०० रुपये स्थिर राहावा. यासाठी केंद्र सरकारने तत्काळ धोरण आखावे. सोयापेंड व कापूस तसेच सूत निर्यातीला प्रोत्साहन द्यावे.
मागील वर्षी आयात केलेल्या ५ लाख टन सोयापेंडला डिसेंबरपर्यंत दिलेली मुदतवाढ रद्द करावी. सोयापेंड आयात करणार नाही हे केंद्राने जाहीर करावे. यंदा १५ लाख टन सोयापेंड निर्यात करावी. सोयाबीनच्या वायदे बाजारावरील बंदी उठवावी. खाद्य तेलावरील आयात शुल्क ३० टक्के करावे. कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवावे. सोयाबीनवरील जीएसटी रद्द करावी. जीएम सोयाबीनच्या लागवडीस परवानगी द्यावी,’’ आदी मागण्या केल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.