
Sustainable Farming Experiments : कोऱ्हाळे बुद्रुक येथील रवींद्र एकनाथ मोरे यांच्याकडे एकूण १०.५ एकर शेती असून, ती थोपटेवाडी शिवारात आहे. त्यांची दोन मुले सागर आणि सूरज हे शेतीत उतरले असून, संपूर्ण शेतीचा भार पेलतात. त्यात प्रामुख्याने ऊस, गहू, खपली गहू आणि सोयाबीन अशी पिके घेतात. ऊस हे पीक वर्षादीड वर्षातून एकदाच उत्पन्न देणारे नगदी पीक आहे.
ठिबकवरील ऊस पिकामध्ये सोयाबीनसारख्या आंतरपिकाची जोड देण्याचा प्रयोग त्यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. त्याची लागवड ही टोकण पद्धतीने केल्यामुळे एकरी साडेतीन किलो बियाणे लागले. एकरी वीस हजारांमध्येच सुमारे १८ क्विंटल उत्पादन मिळाले. त्याला दरही चांगला मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढला. या वर्षी त्यांनी सलग पद्धतीने दोन एकर क्षेत्रावर सोयाबीनची टोकण केली होती.
...असे केले लागवडीचे नियोजन
सेंद्रिय खताच्या उपलब्धतेसाठी स्वतःच एक टन गांडूळ खत घरगुती तयार केले. त्यामुळे बाहेरून विकत घेण्याच्या तुलनेमध्ये त्याचा खर्च अत्यंत कमी आला.
नांगरट केल्यानंतर साडेतीन फुटांची गादीवाफे तयार करून घेतला.
या सरीवर १ टन गांडूळ खत, सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो, ट्रायकोडर्मा १ किलो, सोयाबीन गटाचे रायझोबिअम जिवाणू संवर्धक २ किलो या प्रमाणे तयार केलेले मिश्रण टाकून घेतले.
नंतर ठिबक सिंचनाच्या लॅटरल्स अंथरून घेतल्या.
सोयाबीनची चांगली उगवण व्हावी यासाठी पहिल्यांदा रासायनिक बीजप्रक्रिया करून घेतली.
बीज प्रक्रियेनंतर ड्रीपर जवळ तीन ओळींमध्ये नऊ इंचावर टोकण पद्धतीने सोयीबीनची लागवड केली.
लागवडीनंतर लगेच तणनाशकाची फवारणी करून घेतली.
...असे केले खत व्यवस्थापन
लागवडीनंतर १९-१९-१९ खतांची २ किलो प्रति एकर प्रमाणे पाच दिवसांच्या अंतराने दोन वेळा दिले.
यानंतर १२ -६१-० या विद्राव्य खताची दोन किलो प्रति एकर प्रमाणे रोटेशन पद्धतीने दिले.
फुलकळीच्या पिकाची पालाश खतांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या अवस्थेत १३-४०-१३, १३-०-४५ या खतांची प्रति एकरी ३ किलो या प्रमाणे मात्रा दिली.
यानंतर शेंगा लागणीच्या अवस्थेत ०- ५२ -३४ या खतांची ४-५ दिवसांच्या अंतराने २ वेळा मात्रा दिली.
शेंगा पक्वतेच्या अवस्थेत ०-०-५० एकरी ४ किलो या प्रमाणे एकदाच मात्रा दिली.
अत्यंत काटेकोरपणे व वेळच्या वेळी केलेल्या या खत व्यवस्थापनामुळे उत्पादनात वाढ मिळण्यास मदत झाली. यासाठी १२ हजार रुपये प्रति एकरी खर्च आला.
हंगामात केवळ तीनच फवारण्या
दरम्यानच्या काळात २०, ३५ आणि ६० व्या दिवसांच्या टप्प्यांमध्ये कीडनाशक आणि पोषक घटकांची फवारणी केली. संपूर्ण हंगामात तीन फवारण्या करण्यात आल्या. यामध्ये ३५ व्या दिवशी म्हणजेच फुलकळी लागण्याच्या अवस्थेतील महत्त्वाची फवारणी होती. तर शेवटची फवारणी ड्रोनद्वारे केल्यामुळे चालताना होणारे झाडांचे व शेंगाचे नुकसान कमी झाले. त्याचा फायदा उत्पादनासाठी मिळाल्याचे मोरे सांगतात. फवारणीसाठी सहा हजार रुपये प्रति एकर इतका खर्च झाला.
सर्वाधिक शेंगाची संख्या
सामान्यतः सोयाबीन झाडावर सरासरी १५० ते १७५ शेंगा लागतात. मात्र उत्तम व्यवस्थापनामुळे मोरे यांना प्रति झाड २५० पेक्षा अधिक (सर्वाधिक ३०० ते ३२५) शेंगा मिळाल्या.
आघारकर संशोधन संस्थेचे मार्गदर्शन
सागर यांचे मित्र श्रीकांत गायकवाड आणि आघारकर संशोधन संस्थेच्या बारामती कार्यालयातील संशोधकांनी विविध पिकामध्ये मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केल्याचे मोरे यांनी सांगितले. मोरे यांनी गेल्या वर्षी ठिबक सिंचनावर गव्हाची लागवड केली होती. त्यातही एकरी पंधरा रुपये उत्पादनखर्चामध्ये एकरी ३० क्विंटल गहू उत्पादन घेतले होते. त्याला दर ३० रुपये प्रति किलो मिळाला. या हंगामात ठिबक सिंचनावर खपली गव्हाची लागवड केली आहे.
वर्षभरात ऊस ३५० टन धरला तरी ८ ते १० लाख रु. आणि अन्य हंगामी पिकातून चार ते पाच इतके लाख रु. मिळतात.
या उत्पन्नातून वडील रविंद्र, आई सौ. शशिकला, काकी राधिका, सागर, त्यांची पत्नी सौ. कोमल, सूरज, त्यांची पत्नी सौ. प्रिया व एकूण सहा मुले असे साधारण १३ माणसांचे एकत्रित कुटुंब आहे. या सर्व कुटुंबाचा एकत्रित खर्च सहा ते सात लाख रु. होतो.
मुलांच्या शिक्षणाचा खर्च एक ते सव्वा लाख रुपये होतो.
दरवर्षी शिल्लक उत्पन्नापैकी पुढील वर्षाच्या पिकांचा खर्च वगळून शिल्लक रकमेपैकी काही हिस्सा हा बॅंकेच्या मुदत ठेवीमध्ये ठेवला जातो. आजोबापासून अशा शिल्लक ठेवी व बचतीमधूनच फलटण तालुक्यात ताथवडा गावी २२ एकर शेती २०११ मध्ये खरेदी करता आली.
आजोबा कै. एकनाथअप्पा यांच्या मते, शेतीतील गुंतवणूक कधीच वाया जात नाही. त्यामुळे आम्ही कुटुंबीयांनी जास्तीत जास्त शेती खरेदी करणे व विकसित करणे याचेच ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.
वडील रवींद्र मोरे आजही सांगतात, की आम्ही खिशात एखादी भाकरी घेऊन शेतात राबत आलो. आता तुम्हा मुलांसाठी शेतीमध्ये सर्व सुविधा करून दिल्या आहेत. त्याने कष्ट कमी झाले असले, तरी शेताकडेच आपले सारे लक्ष असू द्या. कोणतेही पीक अयशस्वी झाले किंवा दर मिळाला नाही, तर नाराज होऊ नका. मुलांनो, आपल्या काळ्या आईची ओटी भरली असे समजा आणि जोमाने कामाला लागा. या वावराला देव माना. पाया पडूनच शेतात शिरा. मग तो पावल्याशिवाय राहणार नाही. ओंजळभर पाऊस दिला, तर कवळाभर पीक काढू. मातीत अंकुर निघाला, तर कुबेरालाही भीक वाढू!
...असे आहे अर्थकारण
साध्या पद्धतीने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन पिकात एकरी १२ ते १४ क्विंटल उत्पादन मिळते. उसामध्ये घेतलेल्या आंतरपिकात उसाची मुबलक खते आणि पाणी यामुळे मोरे यांना १८ क्विंटल उत्पादन मिळाले. या वर्षी सलग सोयाबीनचे २२ क्विंटल उत्पादन घेण्यात यश आले आहे. टोकण पद्धतीमुळे बियांचा, खतांचा आणि फवारण्यांचा खर्च बऱ्यापैकी वाचला.
सलग केलेल्या सोयाबीन लागवडीमध्ये खते व फवारणीच्या खर्चात थोडी वाढ झाली तरी घरीच तयार केलेल्या गांडूळ खताचा वापर केला. त्यामुळे एकरी ४ क्विंटलने उत्पादन वाढविण्यात मोरे यांनी यश आले. या पद्धतीत त्यांना एकरी २२ हजार रुपये खर्च आला, तर ८० हजार रु. निव्वळ नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.
- सूरज रवींद्र मोरे, ९८२३९४९४९३
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.