Fish Farming : पुनर्वसनग्रस्ताला मिळाला मत्सशेतीतून मोठा आधार

Fisheries : सातारा जिल्ह्यात तारळी धरणामुळे मोहन पन्हाळकर यांना पुनर्वसित व्हावे लागले. मात्र संकट हीच संधी मानून त्यांनी धरणात तिलापिया माशांचे संगोपन सुरू केले.
Fish Farming
Fish FarmingAgrowon

Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यात मुरूड (ता. पाटण) येथे तारळी धरण असून, त्याची ५.८५ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. पाटण व सातारा तालुक्यातील अनेक गावांचे त्यामुळे पुनर्वसन झाले. गणेशवाडी (ता. सातारा) गावाच्या बाजूला असलेले करंजोशी त्यापैकी गाव आहे. मोहन मारुती पन्हाळकर हे येथील पुनर्वसनग्रस्त शेतकरी आहेत. गणेशवाडी परिसरात चार एकर व धरण उभारणीत शिल्लक दोन एकर अशी सहा एकर त्यांची शेती आहे.

मोहन जुने पदविकाधारक अभियंता आहेत. मुंबई येथे नोकरी करून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते गावी आले. त्याच काळात गावचे पुनर्वसन झाले होते. येथे त्यांनी शेती सुरू केली. मात्र पाणी नसल्याने ती कोरडवाहू होती. त्यात सोयाबीन, रब्बी ज्वारी ही प्रमुख पिके होती. अशा वेळी शेतीला पूरक व्यवसायाचा मुख्य आधार देणे गरजेचे आहे असे त्यांना वाटले.

त्या वेळी तारळी धरणात शासनाने तिलापिया माशांची शेती सुरू केली होती. धरणातील स्वच्छ व चवदार पाण्यामुळे माशांना चांगली चव होती. असे ताजे मासे मिळत असल्याने पर्यटकांच्या संख्येत येथे वाढ होत होती. मोहन यांच्या पाहण्यात ही सर्व स्थिती येत होती. साहजिकच ज्या धरणामुळे आपल्याला पुनर्वसित व्हावे लागले तीच संधी त्यांना खुणावू लागली.

Fish Farming
Fish Farming : मत्स्य उत्पादक संस्था,कंपन्यांना व्यवसाय संधी

पिंजरा पद्धतीने मत्सशेती

दरम्यान, महाराष्ट्र राज्य मत्स्यविकास महामंडळाकडून शेतकऱ्यांनी ही मत्स्यशेती करावी अशी जाहिरात प्रसिद्ध केली. यात प्रकल्पग्रस्तांसाठी प्राधान्य देण्यात आले. मोहन यांनी हे टेंडर भरले. त्यांना त्यासाठी परवानगीही मिळाली. पिंजरा पद्धतीने ही मस्त्यशेती करावयाची असल्याने खर्च जास्त होता.

त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राचे २५ लाख रुपये कर्ज व स्वतःकडील रक्कम असा सुमारे ६० लाखांचा २४ पिंजऱ्यांचा प्रकल्प मोहन यांनी उभा केला. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठांतर्गत महाविद्यालय व बारामती कृषी विज्ञान केंद्र येथे रीतसर प्रशिक्षण घेतले. आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून तिलापियाची एक लाख मत्स्यबीजे तसेच खाद्यही आणले. वाहतुकीसह सर्व मिळून आठ लाख रुपये खर्च आला.

Fish Farming
Fish Farming : आता मत्स्यपालकांना मिळणार किसान क्रेडिट कार्डवर कर्ज

...अशी आहे पिंजऱ्यातील मत्स्यशेती

-तिलापियासह पंगासियस माशाचीही होते शेती. लाल व काळे तिलापिया असे दोन रंग.

-धरणाच्या मधोमध २४ पिंजरे. त्यात मासे संकलन व वजनासाठी छोटेखानी शेड.

बाहेरील बाजूसही कार्यालयीन शेड.

-या मत्स्यपालन प्रकल्पात जाण्या- येण्यासाठी बोट खरेदी केली आहे. त्या माध्यमातून माशांची वाहतूक.

-पिंजऱ्यातील जाळीच्या साह्याने मासे पकडले जातात. मोठे मासे वेगळे करून लहान मासे पुन्हा पाण्यात सोडले जातात.

-प्रति पिंजऱ्यात पाच हजार पिले असे प्रमाण.

-एक किलो वजनाचा मासा होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो. त्यांनतर होते विक्री.

-सुरुवातीच्या काळात वर्षभरात दोन्ही मासे मिळून मिळाले सहा टन उत्पादन.

मुरूड व जागेवरून १५० रुपये प्रति किलो दराने केली विक्री.

-व्यवसायाचा अंदाज व अनुभव येऊ लागला तशी व्यवस्थापनात झाली सुधारणा.

-आज सात वर्षे पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकारच्या नीलक्रांती योजनेतून प्रकल्पाला ४० टक्के अनुदान मिळाले आहे.

-दर सहा महिन्यांनी ३० ते ४० हजार मत्स्यबीज आणून ते प्रकल्पात सोडले जाते.

-दिवसातून तीन वेळा माशांना खाद्य. पहिल्या दोन महिन्यांपर्यंत ते पावडर स्वरूपात. आकार व वजनानुसार त्यात बदल. प्रथिने, जीवनसत्त्वे, यांचा पुरेसा वापर. गरजेनुसार खाद्यातून औषधोपचार.

-तीन महिन्यांनी आकारानुसार माशांची विभागणी. यामुळे चांगली वाढ होण्यास मदत होते.

विक्री व अर्थकारण

वर्षभरात एकूण चार टनांपर्यंत उत्पादन मिळते. त्यातील तिलापियाचे उत्पादन तीन टनांपर्यंत असते. एकूण व्यवस्थापन तसेच धरणातील वाहत्या व स्वच्छ पाण्यामुळे माशांची चव उत्तम मिळते. त्यामुळे मोहन यांच्याकडील माशांना चांगली मागणी असते. प्रकल्पातून तसेच मुरूड येथूनही विक्री होते. प्रति किलो तिलापिया २५० रुपये दर मिळतो. तर पंगासियस माशाला मोठ्या हॉटेलमधून मागणी असते. दर २०० रुपये असतो.

धरणालगत मोहन यांनी छोटेखानी ए-१ नावाने अडीच वर्षांपासून हॉटेल सुरू केले आहे. पत्नी वनिता त्याची जबाबदारी पाहतात. ग्राहकांच्या मागणीनुसार मासे फ्राय करणे, सूप, रस्सा, ग्रेव्ही आदी बनवून दिल्या जातात. त्यासाठी किलोला ३०० रुपये दर आकारला जातो. भात, भाकरी सेवाही देण्यात येते.

सातारासह, सांगली, कोल्हापूर येथून ग्राहक येथे आवर्जून येत असतात. मत्स्यबीज दरवर्षी एक लाख रुपये, दहा टन खाद्यासाठी पाच लाख रुपये, मजुरी व अन्य असा एकूण आठ लाखांपर्यंत खर्च येतो. बँकेचे व्याज, हप्ता जाऊन वर्षाला तीस टक्क्यांपर्यंत नफा होतो. व्यवसायात मुलगा चेतन, मुलगी हेमलत्ता घाडगे यांचीही गरजेनुसार मदत होते.

मोहन पन्हाळकर, ८८९८००११११

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com