
Agriculture Success Story : सातारा जिल्ह्यातील शेंद्रेलगत शिवाजीनगर (ता. सातारा) हे छोटेसे गाव आहे. येथील द्वारकाबाई येदू देशमुख या ९४ वर्षे वयाच्या आजी प्रसिद्ध आहेत. त्याच कुटुंबप्रमुख आहेत. एकेकाळी अवघी पाच एकर कोरडवाहू जमीन या कुटुंबाकडे होती. मात्र काही कारणाने ती गहाण पडली होती. ती सोडवून घेण्यासाठी आजीनेच पुढाकार घेतला. हाती टिकाव घेऊन विहीर खोदण्यास सुरुवात केली होती.
सदाशिव, तानाजी, शिवाजी, अधिकराव, मनोहर, आनंद अशी आपली सहाही मुले शिकली पाहिजेत हे स्वप्न द्वारकाबाईंनी त्या काळात पाहिले होते. आज हे सहाही बंधू आपापल्या क्षेत्रात यशस्वी काम करीत आहेत. सदाशिव यांनी सातवी शिक्षणानंतर मुंबईत काम करून सावकारी कर्ज फेडले. शेतजमीन सोडविली. भावाच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले.
आज सर्वात थोरले सदाशिव, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाचे अनुक्रमे शिवाजी व अधिकराव शेतीची जबाबदारी पाहतात.पाचव्या क्रमांकाचे मनोहर व सहाव्या क्रमांकाचे आनंद माध्यमिक शिक्षक आहेत. दुसऱ्या क्रमांकाचे तानाजी शिक्षक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. मालन, शोभा, छाया, उज्ज्वला, वनिता, रूपाली या आजीच्या सुना कुटुंबाचा मोठा आधार आहेत.
हाताची पाचही बोटे सारखी नसतात ही जाणीव कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आहे. तरीही सर्वांनी समन्वयातून आपले कुटुंब एकत्र ठेवलेआहे. पारदर्शक आर्थिक व्यवहार ही सर्वांनीच आपली मुख्य जबाबदारी मानली आहे.
शेतीतील किंवा घरातील मोठे किंवा महत्त्वाचे निर्णय एकत्रपणे घेतले जातात. घरातील महिला- पुरुषांमधील सुसंवाद कायम जपला जातो. यामुळे सदस्यांना व्यक्त होणे सोपे जाते. आजीपासून नातसुनेपर्यंत नात्यातील गोडवा टिकून आहे. सर्वांत मोठ्या सूनबाईंनी आज सत्तरी पार केली असून त्यांच्याही अनुभवाचा उपयोग नव्या पिढीला होत आहे.
देशमुख कुटुंबाने कष्ट व एकीच्या जोरावर पाच एकरांवरून २० एकरांपर्यंत आपली शेती विस्तारली आहे. शेतीची जबाबदारी पाहणाऱ्या तिघा देशमुख बंधूंनी आपापल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. यात यांत्रिकीकरण, प्रशासकीय कामे, आर्थिक व्यवहार अधिकराव पाहतात. सदाशिव वडीलकीच्या नात्याने मार्गदर्शन करण्याबरोबर जनावरांचे संगोपन करतात. सर्व शेती बागायत केली असून, सर्वत्र ठिबक सिंचनाचा वापर केला जातो. बागायतीसाठी पाच कृषिपंप बसविण्यात आले आहेत. सिंचन विभागाचे सर्व नियोजन शिवाजीरावांकडे असते. अर्थात एकूण शेतीतील निर्णय सर्व जण मिळूनच घेतात.
ऊस, आले व भाजीपाला ही प्रमुख पिके घेतली जातात. सर्वाधिक ऊस असतो. त्याचे एकरी ८० टनांपर्यंत उत्पादन घेतले जाते. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा अधिक ऊस उत्पादनासंबंधीचा पुरस्कार देशमुख कुटुंबाने मिळवला आहे. बाजारपेठेतील क्षेत्र, दर आदींचा अभ्यास करून आल्याचे क्षेत्र कमी-जास्त केले जाते. दोन हंगामांत हिरवी मिरची असते. बांधावर तसेच शेतात शंभरहून अधिक फळझाडांची लागवड केली आहे.
यात आंबा, पेरू, पपई, चिकू, जांभूळ आदीचा समावेश आहे. गोठ्यात तीन म्हशी असून घरची गरज भागवून उर्वरित दुधाची विक्री केली जाते. कुटुंब अनेक वर्षांपासून कांदा रोपनिर्मिती करते. आज या रोपवाटिका व्यवसायात हातखंडा तयार केला आहे. त्यातून २० एकरांहून अधिक कांदा लागवड करणे सोपे झाले आहे. अनेक वर्षांचा अनुभव व दर्जा यामुळे परिसरातील शेतकऱ्यांत या रोपांविषयी विश्वासाहर्ता तयार झाली आहे.
एकेकाळी सावकारी कर्ज फेडण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबाने कष्टाच्या जोरावर चित्र बदले आहे. १५ एकर शेती खरेदीकरून त्यात व्यावसायिक पीक पद्धतीचा आदर्श तयार केला आहे. मजूरटंचाई लक्षात घेऊन ट्रॅक्टरसह फवारणी यंत्र, पॉवर टिलर व आवश्यक अन्य सर्व अवजारे-यंत्रे खरेदी केली आहेत. त्यातून वेळ व पैशांचीही बचत होत आहे. शेतीकामांसाठी दोन बैल आहेत. पाचहून अधिक चारचाकी वाहने व पुणे, सातारा, पाचगणी येथे घरे आहेत.
कुटुंबाच्या पुढच्या पिढीची प्रगती आदर्श विचारांमधूनत सुरू सुरू आहे. सर्व सदस्य निर्वसनी असून आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. कुटुंबात तीन शिक्षक असल्याने पुढील पिढीला दिशा व मार्गदर्शन मिळाले आहे. नव्या पिढीत सहा मुले व चार मुली आहेत. यात रूपेश शिक्षक, वैष्णवी, अमृता, आदित्य, आश्विन हे अभियांत्रिकी, नीलेश पोलिस खाते तर प्रवीण खासगी कंपनीत कार्यरत आहेत. आदेश यांनी
एमबीए केले आहे. कुटुंबात लग्न होऊन नीता व एकता या उच्चशिक्षित सुना हाताखाली आल्या आहेत. शौर्य, रुद्र व विराज ही कुटुंबात तीन नातवंडे आहेत. नव्या पिढीतील जी मुले नोकरी, शिक्षणासाठी पुणे येथे वास्तव्यास आहेत त्यांना लागणारा ज्वारी, गहू, तांदूळ, शेंगा, भाजीपाला, फऴे असा सर्व शेतीमाल घरच्या शेतातूनच पाठवला जातो.
अखंड ऊर्जेचा स्रोत बनून राहिलेल्या द्वारकाआजींनी २०१९ मध्ये कोल्हापूर जिल्ह्यात पूरग्रस्तांची कुटुंबातील सदस्यांसोबत भेट घेतली. त्यांना मायेचा आधार दिला होता. शिरोळ (जि. कोल्हापूर) येथे श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर पूरग्रस्तानी सोय करण्यात आली होती. तेथे देशमुख कुटुंबीयांनी दोन हजार लोकांच्या जेवणाची सोय करत शंभरवर महिलांना साड्याचे वाटप केले होते. आजींनी स्वातंत्र्य संग्राम पाहिला असून, त्या वेळी लोकप्रिय झालेली देशभक्तीपर गाणी आज वयाच्या ९४ व्या वर्षी त्या न चुकता गाऊ शकतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.