
Global Warming Impact : नुकतेच सरलेले २०२४ हे आतापर्यंतचे सर्वांत उष्ण ठरले आहे. जागतिक हवामान संस्थेने ही घोषणा केली आहे. २०१५ पासून ते २०२४ पर्यंत प्रत्येक वर्ष हे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरत आहे. यावरून तापमान वाढ सातत्याने होत असली, तरी सर्व जगाचे या समस्येकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे, हेच स्पष्ट होते. तापमान वाढ आणि त्या आनुषंगिक हवामान बदल हा आता भविष्यातील धोका राहिला नसून संपूर्ण जग सध्या याचे दुष्परिणाम भोगत आहे.
मागील दशकभरात जेवढ्या तापमान वाढ, हवामान बदल या समस्यांना अनुसरून जागतिक परिषदा झाल्या त्यामध्ये याबाबत सर्वांनी चिंता व्यक्त केली, निर्वाणीचे इशारेही दिले, यावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन थेट कृतीची गरज असल्याचेही जगभरातील नेत्यांकडून बोलले गेले. परंतु प्रत्यक्षात तापमान वाढ कमी करण्यासाठी योग्य अशी पावले मात्र कोणत्याही देश उचलत नसल्याचे दिसून येते.
वर्ष २०२४ च्या सुरुवातीलाच जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीचा पर्यावरणीय समतोल ढासळत असून, स्वतःचा बचाव करण्यासाठी मानव जातीच्या हातामध्ये फक्त दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला होता.
हा इशारा देऊन वर्ष उलटले आहे. या इशाऱ्यानुसार आपल्याकडे आता वर्षभराचाच काळ आहे. प्रश्न पृथ्वीला वाचविण्याचा असल्यामुळे एका देशाने तापमान वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करून भागणार नाही, तर संपूर्ण जगाला यासाठी एकत्र यावे लागणार आहे.
तापमान वाढीमुळे पृथ्वी, समुद्र, व बर्फाच्छादित प्रदेश यावर परिणाम होत असून त्याचा परिणाम वादळी पाऊस, अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे, अनिश्चित पाऊसमान, वादळी वारे, उष्णलहर, गारपीट, शीतलहर, पावसाचे खंड, मातीची धूप व दुष्काळाने वाळवंट पसरत जात आहे. हवेच्या तापमानापेक्षा जमिनीचे तापमान नेहमीच अधिक राहत असल्याने जमिनीत सेंद्रिय कर्ब कमी होऊन सुपीकता कमी होत आहे. पाणीसाठे आक्रशिले जात असून त्यांचे दूषित होण्याचे प्रमाण वाढले आहे. पिकांवर कीड-रोगांची तीव्रता वाढत आहे.
पिकांच्या चयापचय क्रियेत बदल होत आहे, प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावत आहे. हे असेच चालू राहिले तर पुढील दोन अडीच दशकांत जागतिक अन्न उत्पादन १९ टक्क्यांनी घटण्याची शक्यता पॉट्सडॅम इन्स्टिट्यूट ऑफ क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च यासंस्थेचे संशोधक मॅक्झीमिलन कोट्झ आणि लिओनी वेन्झ यांनी संशोधन अन् अभ्यासाअंती वर्तविली आहे.
अशाप्रकारच्या अन्न उत्पादनातील घटीने भूक, आर्थिक व सामाजिक स्थैर्याची चिंता जगभर वाढत जाणार आहे. पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरील तापमान फारच गतीने वाढत असून त्यामुळे बर्फ वितळून शास्त्रज्ञांच्या अनुमानांनुसार २१०० पर्यंत समुद्र पातळी १.६ ते ६.६ फूट वाढणार आहे. समुद्र तटावरील काही देश व शहरे, मालदिवसारखे देश बुडण्याची शक्यता वर्तवली आहे.
निसर्गाची सर्व कार्यपद्धती बिघडल्याने काय भयंकर घडेल, याचा अंदाजही न बांधू शकणाऱ्या जगात आपण प्रवेश केला असल्याने जागतिक आरोग्य संघटनेसह इतर ७६ मोठ्या आरोग्य संघटनांनी गतवर्षीपासून जागतिक आरोग्य आणीबाणी’ जाहीर केली आहे. यापेक्षा अजून कोणत्या भीषण परिणामांची आपण वाट पाहत आहोत.
त्यामुळे तापमान वाढीच्या अनुषंगाने सर्वांत वाईट आपत्ती टाळण्यासाठी आता मात्र विलंब करून चालणार नाही, जगभरातील नेत्यांनी तापमान वाढ रोखण्यासाठी आता थेट कृती केली पाहिजे, असा इशारा संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस ॲतोनियो गुतेरेस यांनी दिला आहे. तापमान वाढीची कारणे स्पष्ट आहेत, गरज आहे ती गरीब-श्रीमंत, लहान-मोठे देश हा भेद विसरून एकत्र येऊन उपाययोजना करण्याची! हे आत्ता केले नाही तर विनाशापासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.