डॉ. किरण गायकवाडGlobal Warming Response: पृथ्वी बदलत आहे, पण मानवही त्या बदलाशी जुळवून घेत आहे. तंत्रज्ञान, संशोधन आणि धोरणांच्या मदतीने आपण हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत..गेल्या काही दशकांपासून हवामान बदल हा जागतिक चिंतेचा विषय बनला आहे. असे असले तरी या परिवर्तनामध्ये केवळ संकटांचेच चित्र नाही, तर काही सकारात्मक घडामोडीही दिसून येत आहेत. विशेषतः ऊर्जा क्षेत्रात झालेली प्रगती ही या बदलाचा आशादायी भाग ठरते. गेल्या १५ वर्षांत नवीकरणीय ऊर्जेचा वापर झपाट्याने वाढला आहे. पवनऊर्जा सुमारे ५.४ पट वाढली असून सौरऊर्जा तब्बल ४१.४ पट वाढली आहे. .Climate Change Farming: हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीसाठी आत्मसात करणे आवश्यक.२०२५ मध्ये एकट्या सौर ऊर्जेने जागतिक नव्या ऊर्जा क्षमतेपैकी ७५ टक्क्यांहून अधिक वाटा उचलला आहे. एकूणच, २०२५ पर्यंत जगभरातील नवीकरणीय ऊर्जा क्षमता ५१४९ गिगावॅटपर्यंत पोहोचली, ज्यात एका वर्षातच ६९२ गिगावॅटची भर पडली. या वाढीमुळे अनेक देशांमध्ये सौरऊर्जा ही सर्वात स्वस्त आणि सहज उपलब्ध ऊर्जा स्रोत बनली आहे. ग्रामीण भागात सौर पॅनेल्समुळे वीज उपलब्ध होऊ लागली आहे, तर शहरांमध्ये स्वच्छ ऊर्जेकडे झुकाव वाढत आहे..ऊर्जा क्षेत्रातील या बदलांबरोबरच वाहतूक क्षेत्रातही सकारात्मक परिवर्तन दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढत असून, अनेक देश पारंपरिक इंधनांपासून दूर जात आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही हरित पर्यायांचा समावेश होत आहे. त्यामुळे प्रदूषणात घट होत असून शहरी भागातील हवेची गुणवत्ता सुधारत आहे. याशिवाय, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे उद्योग क्षेत्रातही कार्बन उत्सर्जन कमी करण्याचे प्रयत्न अधिक प्रभावी झाले आहेत..हवामान बदलामुळे शेती क्षेत्रातही काही सकारात्मक आणि आशादायी बदल घडत आहेत. विशेषतः हवामान-प्रतिरोधक पिकांच्या जाती विकसित करण्यावर भर दिला जात आहे. राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणाली, ज्यामध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्थांबरोबरच राज्य आणि केंद्रीय कृषी विद्यापीठांचा समावेश आहे, यांनी २०१४ ते २०२४ या कालावधीत विविध पिकांच्या सुमारे २९०० सुधारित जाती विकसित केल्या आहेत. यापैकी तब्बल २६६१ जाती या हवामान-प्रतिरोधक असून, त्यातील अनेक गेल्या पाच वर्षांत विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, २०२४-२५ या कालावधीतच ३२ पिकांच्या १०९ उच्च उत्पादक आणि हवामान-प्रतिरोधक जाती विकसित करण्यात आल्या आहेत. या प्रगतीमुळे भारतीय शेती अधिक टिकाऊ, लवचिक आणि भविष्यासाठी सक्षम बनत आहे..याच संदर्भात, कार्बन फर्टिलायझेशन ही एक महत्त्वाची वैज्ञानिक प्रक्रिया लक्षात घेण्यासारखी आहे. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड हे वनस्पतींसाठी प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेत अत्यावश्यक घटक आहे. वैज्ञानिक अभ्यास दर्शवितात की कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढल्यास विशेषतः C3 प्रकारच्या पिकांमध्ये (जसे तांदूळ आणि गहू) प्रकाशसंश्लेषणाचा वेग वाढतो, ज्यामुळे वनस्पतींची वाढ जलद होते आणि जैवभार वाढतो..Global Warming Impact : शेती आणखी संकटात येणार; बदलत्या वातावरणामुळे पाणीटंचाई भीषण होऊन पिकांची उत्पादकता कमी होणार.यामुळे पानांवरील रंध्रे कमी वेळ उघडी राहतात आणि पाण्याचा वापर अधिक कार्यक्षम होतो. उपग्रह-आधारित संशोधनानुसार १९८० नंतर पृथ्वीवरील हरित क्षेत्रात वाढ झाली असून त्यात वाढलेल्या कार्बन डायऑक्साइडचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र या प्रक्रियेचा एक नकारात्मक पैलू असा आहे की पिकांचे उत्पादन वाढले तरी त्यातील सूक्ष्म पोषणतत्त्वांचे विशेषतः लोह आणि जस्त यांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पोषणाच्या दृष्टीने नवीन आव्हाने निर्माण होऊ शकतात..‘नेट झीरो’ उद्दिष्टभारतामध्ये हवामान अंदाजावर आधारित शेतीसाठी अनेक स्मार्ट मोबाइल ॲप्स विकसित करण्यात आले आहेत, जे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहेत. ‘मेघदूत’, ‘किसान सुविधा’, ‘मौसम’, ‘स्कायमेट’ आणि ‘फार्मवेडर’ यांसारखी ॲप्स स्थानिक हवामान अंदाज, पर्जन्यमान, तापमान आणि पीक विषयक सल्ला देतात. या ॲप्समुळे शेतकऱ्यांना योग्य वेळी पेरणी, सिंचन, खत व्यवस्थापन आणि कापणीचे निर्णय घेता येतात. हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या अनिश्चिततेचा परिणाम कमी करण्यास मोठी मदत होत आहे. .जगभरात हवामानाशी संबंधित धोरणे आणि कायद्यांमध्येही मोठी वाढ झाली आहे. १,८३९ हून अधिक हवामान लक्ष्ये जाहीर करण्यात आली असून अनेक देश, शहरे आणि कंपन्या ‘नेट-झीरो’ उत्सर्जनाचे उद्दिष्ट ठेवत आहेत. हरित तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढत असून कार्बन कॅप्चर, ऊर्जा साठवण आणि हरित हायड्रोजन यांसारख्या नव्या उपाययोजना विकसित होत आहेत. यामुळे भविष्यातील ऊर्जा व्यवस्था अधिक शाश्वत आणि सुरक्षित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..या परिवर्तनाचा आणखी एक प्रेरणादायी पैलू म्हणजे ओझोन थरातील सुधारणा. अंटार्क्टिकामधील ओझोन छिद्र सुमारे ६ दशलक्ष चौ. कि.मी.ने कमी झाले आहे. हे क्षेत्रफळ जवळपास ऑस्ट्रेलिया देशाच्या आकाराएवढे आहे. २०२५ मध्ये हे छिद्र १९९२ नंतरचे पाचवे सर्वांत लहान होते आणि ते नेहमीपेक्षा तीन आठवडे आधी बंद झाले. मॉन्ट्रियल प्रोटोकॉलसारख्या जागतिक प्रयत्नांमुळे ओझोन थर हळूहळू पूर्ववत होत आहे आणि २०६६ पर्यंत तो १९८० च्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे..वाटचाल हरित अर्थव्यवस्थेकडेहवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जंगल संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि हरित पायाभूत सुविधांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. शहरांमध्ये ग्रीन रूफ्स, शहरी बागा आणि जलसंधारण प्रकल्प वाढत आहेत, ज्यामुळे पर्यावरण आणि आरोग्य दोन्ही सुधारत आहेत. याशिवाय, लोकांमध्ये शाश्वत जीवनशैलीबाबत जागरूकता वाढत असून, पुनर्वापर, स्थानिक उत्पादनांचा वापर आणि पर्यावरणपूरक सवयींचा स्वीकार वाढत आहे. .तसेच हरित अर्थव्यवस्थेकडे होणारी वाटचाल हीही एक महत्त्वाची सकारात्मक घडामोड आहे. हरित नोकऱ्यांची निर्मिती, पर्यावरणपूरक उद्योग आणि स्टार्टअप्सचा वाढता सहभाग यामुळे आर्थिक विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न होत आहे. कार्बन क्रेडिट्स आणि हरित वित्तीय प्रणालीमुळे उद्योगांना स्वच्छ तंत्रज्ञान स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळत आहे. तसेच स्मार्ट सिटीज, ऊर्जा कार्यक्षम इमारती आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये हरित उपायांचा वापर वाढत आहे..तथापि, या सर्व सकारात्मक घडामोडींनंतरही आव्हाने पूर्णपणे संपलेली नाहीत. हवामान बदलाची गती अजूनही चिंताजनक आहे आणि त्याचा परिणाम अनेक भागांमध्ये तीव्रतेने जाणवत आहे. आज २०२६ मध्ये उभे राहून, हे परिवर्तन आपल्याला एक स्पष्ट संदेश देते - पृथ्वी बदलत आहे, पण मानवही त्या बदलाशी जुळवून घेत आहे. .तंत्रज्ञान, संशोधन आणि धोरणांच्या मदतीने आपण या आव्हानांवर मात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. ही केवळ पृथ्वीची कथा नाही, तर आपल्या अस्तित्वाची कथा आहे आणि तिचा शेवट अजूनही आपल्या सामूहिक प्रयत्नांवर अवलंबून आहे.९९५३२५८२३४(लेखक भारतीय कृषी संशोधन संस्थेत वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.