
Farmer Compensation: राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मे महिन्याच्या सुरुवातीलाच उष्ण लाटांचा कालावधी अधिक राहण्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्याचबरोबर राज्याच्या बहुतांश भागांत या महिन्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची शक्यताही वर्तविली होती. महिन्याच्या सुरुवातीचे दोन दिवस उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होत होती. एप्रिल तसेच मेमधील तापमानवाढीचा फटका संत्रा, मोसंबी, केळी, आंबा आदी फळपिकांना तर बसलाच, शिवाय उन्हाळी हंगामी पिकांचीही यात चांगलीच होरपळ झाली.
या दरम्यानच ईशान्य राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आणि मागील चार-पाच दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा, उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपीटही होत आहे. या मॉन्सूनपूर्व पावसाने उन्हाचा चटका काही प्रमाणात कमी झाला असला, तरी पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
उन्हाळी भुईमूग, ज्वारी, बाजरी, भात, तीळ ही पिके काढणीच्या अवस्थेत असल्याने त्यांचे अधिक नुकसान झाले आहे. हळदीचीही काढणीपश्चात कामे शेतातच चालत असल्याने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली आहे. वादळी वारे आणि गारपिटीने पिकांबरोबर शेतातील घर, गोठे, शेडनेट, पॉलिहाउस, कृषी पंपांचे सोलर पॅनेल उद्ध्वस्त करण्याचे काम केले आहे. वीज पडून तीन-चार शेतकऱ्यांना प्राणास मुकावे लागले तर काही जनावरेही दगावली आहेत.
मॉन्सूनपूर्व पाऊस ही काही नवी घटना नाही. एप्रिल-मे महिन्यांत दुपारचे तापमान चांगलेच वाढते. त्याचबरोबर हवेतील बाष्पही वाढलेले असेल तर वादळी पाऊस अथवा वळवाच्या सरी पडतात. मेघगर्जनेसह विजा चमकून गारपीटही होते. मागील दशकभरात वादळी पाऊस आणि गारपिटीचे प्रमाण राज्यात खूपच वाढले आहे. या वर्षी तर राज्यात सरासरीपेक्षा २१ टक्के उन्हाळी पीक पेरणी अधिक झाली आहे.
त्यामुळे सध्याच्या वादळी पाऊस आणि गारपिटीने नुकसानही अधिक झाले आहे. सर्वसाधारणपणे खरीप हंगामातील आपत्तीचा नुकसान भरपाई अथवा आर्थिक मदतीसाठी विचार केला जातो. त्यानंतरच्या रब्बी आणि उन्हाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले तर याबाबत शासन-प्रशासन पातळीवर दुर्लक्ष होते आणि शेतकरी मदतीपासून वंचित राहतो. या मानसिकतेत बदल झाला पाहिजे.
मुळात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती फारच बिकट आहे. वाढता उत्पादन खर्च आणि कमी मिळकत हे त्याचे कारण आहे. अशावेळी अचानक आलेल्या आपत्तीत हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाले तर तो आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या देखील खचून जातो. रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील पिकांवर शेतकऱ्यांचे खरीप हंगामाचे नियोजन असते.
रब्बी तसेच उन्हाळी या दोन्ही हंगामात नैसर्गिक आपत्तींचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. या वर्षी तर थकित कर्जामुळे बहुतांश शेतकरी पीककर्जापासून देखील वंचित राहणार आहेत. या सर्व परिस्थितीचा विचार करून सध्याच्या वादळी पाऊस आणि गारपिटीत नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला हवी. या वर्षी पाऊस चांगला बरसणार आहे आणि त्याचे आगमनही लवकरच होणार असल्याचा अंदाज आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना मदतही लवकरच मिळायला हवी. खरीप, रब्बीच्या तुलनेत उन्हाळी पीक पेरा खूप कमी असल्याने पाहणी-पंचनाम्यास फारसा वेळ लागणार नाही. अशावेळी ही सर्व प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी. असे झाले तरच चांगल्या पाऊसमान काळात खरीपातील पीक पेराही वाढेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.