
Sangli News: यंदाच्या हंगामात द्राक्ष पिकाला निसर्गाची साथ मिळाली नसल्याने द्राक्षाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बेदाण्याला द्राक्षाची टंचाई भासली असल्याने याचा थेट फटका बेदाणा उत्पादनावर झाला आहे. यंदाचा हंगाम अवघा दोन महिनेच सुरू राहणार असून हंगाम अंतिम टप्प्याकडे आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात बेदाण्याचे २५ टक्क्यांनी उत्पादन घटण्याचा प्राथमिक अंदाज बेदाणा उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, आणि नाशिक जिल्ह्यांत तसेच कर्नाटक या राज्यातील विजापूर आणि बेळगाव जिल्ह्यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. नाशिकमध्ये बेदाण्याचे उत्पादन कमी अधिक प्रमाणात होते. सर्वाधिक उत्पादन सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून राज्यात बेदाण्याचे उत्पादनात वाढ होत आहे.
गेल्या तीन ते चार वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांसमोर नैसर्गिक संकटाचे शुक्लकाष्ठ संपण्यास तयार नव्हते. परिणामी द्राक्ष आणि बेदाण्याला अपेक्षित दरही मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या निव्वळ नफ्यातही घट झाली होती. यंदाही द्राक्ष पिकाला निसर्गाची साथ मिळाली नाही. या संकटाचा फटका थेट उत्पादनावर झाला. त्यामुळे हंगाम लांबणीवर पडला. गेल्या तीन ते चार वर्षांत यंदा पहिल्यांदाच द्राक्षाला बाजारपेठेत ‘फिल गुड’ वातावरण तयार झाले असल्याने द्राक्षाला दरही चांगले मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष विक्रीस प्राधान्य दिले आहे.
राज्यात गतवर्षी २ लाख ४६ हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते. सध्या बेदाणा निर्मितीचा हंगाम सुरू होऊन सव्वा महिन्यापेक्षा अधिक काळ झाला. सांगली, सोलापर यासह विजापूर आणि बेळगाव या ठिकाणच्या भागात सुमारे दीड ते दोन हजार शेडवर बेदाणा सुरू आहे. परंतु शेडवर बेदाणा निर्मितीला फारशी गती नसल्याचे चित्र आहे. परिणामी, बेदाण्याच्या द्राक्षाची विक्रीही सुरु झाली. त्यामुळे बेदाण्याला द्राक्षाची टंचाई भासू लागली आहे. यामुळे बेदाण्याच्या उत्पादनात २५ टक्क्यांनी घट होईल, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
हंगाम अवघा दोन महिनेच
दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम डिसेंबरच्या शेवटच्या किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतो. फेब्रुवारीपासून हंगामाला गती येते. अर्थात एप्रिल महिन्याअखेर बेदाणा निर्मिती सुरू राहते. मात्र, यंदा द्राक्ष पिकावर अभूतपूर्व नैसर्गिक संकट ओढावल्याने द्राक्षाची टंचाईची झळ बेदाणा उत्पादनाला बसली आहे. सद्यःस्थितीला यंदाचा हंगाम अंतिम पट्ट्यात आला असून हंगाम अवघ्या दोन महिन्यांतच संपणार असल्याची चिन्हे आहेत.
गेल्या सात वर्षांपूर्वीपासून प्रत्येक वर्षी १० हजार टनांनी बेदाण्याच्या उत्पादन वाढ झाली असल्याचे चित्र आहे. चार वर्षांपूर्वी ६२ हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन वाढले होते. अर्थात त्यानंतर बेदाण्याचे उत्पादन दोन लाख टनांहून अधिक उत्पादनाचा आलेख सुरू आहे. मात्र सन २०२२-२३ पेक्षा गतवर्षी २६ हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन घटले होते. यंदा २५ टक्के म्हणजे ६१ हजार टनांनी बेदाण्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे.
बेदाणा उत्पादन दृष्टीक्षेप
सन... उत्पादन (टनात)
२०१७-१८...१ लाख ६० हजार
२०१८-१९...१ लाख ७० हजार
२०१९-२०...१ लाख ८० हजार
२०२०-२१...१ लाख ९५ हजार
२०२१-२२...२ लाख ५७ हजार
२०२२-२३...२ लाख ७२ हजार
२०२३-२४...२ लाख ४६ हजार
(आकडेवारी तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.