
पुणेः देशात सध्या उडदाचे दर (Urad Rate) स्थिर आहेत. मात्र उडदाच्या डाळीचे दर (Urad Dal Rate) वाढले. तसंच देशात उडीद लागवड (Urad Cultivation) सध्या पिछाडीवर आहे. पाऊस आणि कीड-रोगानं पिकाचं नुकसानही (Urad Crop Damage) होतंय. त्यामुळं उडदाच्या दर टिकून राहण्याची शक्यता आहे.
देशात घटलेला पेरा आणि पीक नुकसान होत असल्यानं बाजारात उडदाचे दर चांगले आहेत. देशातील महत्वाच्या बाजारांमध्ये उडदाला ६ हजार ७०० ते ८ हजार रुपये दर मिळतोय. म्यानमार महत्वाचा उडीद पुरवठादार आहे. सध्या म्यानमारमध्ये उडदाचे दर काहीसे नरमले. देशातही म्यानमारमधील दरानुसार बाजार बदलला. त्यामुळं देशात मागील काही दिवसांत दर स्थिर आहेत.
सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात उडीद लागवड गेल्यावर्षीपेक्षा ५ टक्क्यांनी पिछाडीवर आहे. आत्तापर्यंत देशात ३५ लाख २१ हजार हेक्टरवर उडदाची लागवड झाली. देशातील महत्वाच्या उडीद उत्पादक मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात उडीद पेरणी काहिशी वाढली. यो दोन्ही राज्यांतील बुंदेलखंड भागात पिकाची स्थिती चांगली आहे. येथे यंदा चांगला पाऊस झाल्यानं पोषक वातावरण बनलंय. तर महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात आणि झारखंडमध्ये पेरा घटलाय.
यंदा उडदाची लागवड घाटली. शिवाय पावसामुळं पिकाचं नुकसानही वाढलंय. सध्या मध्य प्रदेशातील उडदाचं पीक फुलोऱ्यात आहे. मात्र विदिशासह लगतच्या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसानं पिकाला फटका बसतोय. तर मागील काही दिवस ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं पिकावर किड-रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय. त्यामुळं उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.
तिकडं बाजारात उडदाचा भाव मागील दोन आठवड्यांपासून स्थिर आहे. पण उडीद डाळीचा दरही वाढलाय. उडीद डाळीचे दर मागील आठवडाभरात ५ रुपयांपर्यंत सुधारले. केंद्र सरकारच्या केंद्रीय भांडारनेही उडदाच्या डाळीचा भाव १०० रुपयांवरून ११३ रुपयांपर्यंत वाढवलाय. तर देशाच्या विविध भागांमध्ये उडदाची डाळ ११० ते १२० रुपये प्रतिकिलोने विकली जातेय.
देशात मागील हंगामात २७ लाख ६० हजार टन उडीद उत्पादन झालं होतं. मागील काही वर्षांत खरिपात पीक नुकसान होत असल्यानं उडीद उत्पादन मर्यादीत राहतंय. त्यामुळं रब्बी हंगामात उडीदाखालील क्षेत्र वाढीचा सरकार प्रयत्न करतंय. ओडिशासारख्या राज्यात खरिपाच्या तुलनेत रब्बीत वातावरण स्थिर असतं. त्यामुळं अशा भागांमध्ये उडीद लागवडीला प्रोत्साहन देण्यात येतंय.
यंदा देशात लागवड कमी असल्यानं बाजारभाव सध्या वाढले आहेत. मात्र उत्पादन कितीने कमी होईल? पिकाचं किती नुकसान झाले? याचा अंदाज लगेच लावता येणार नाही. मात्र उत्पादन घट होण्याचा अंदाज गृहित धरूनच बाजार बदलतोय, असं जाणकारांनी सांगितलं.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.