
Pune News: देशात मागील वर्षभरापासून कडधान्य आयात वाढत आहे. पिवळा वाटाणा, तूर, हरभरा आणि मसूर आयात वाढत आहे. त्यामुळे यंदा देशात कडधान्य आयात ५५ ते ५८ लाख टनांवर पोहचू शकते असा अंदाज आहे. यापुर्वी २०२६-१७ मध्ये विक्रमी ६३ लाख टन कडधान्य आयात झाली होती. यंदा कडधान्य आयात वाढत असल्याने शेतकरी मात्र अडचणीत येत आहेत.
मागील हंगामात देशात पाऊस कमी पडला होता. त्यामुळे कडधान्याची लागवड आणि उत्पादनात घट झाली होती. परिणामी देशात कडधान्याची आयात वाढत आहे. त्यातच सरकारने पिवळा वाटाणा आयात मोकळी केली. तूर आयातीलाही मोकळीक दिली. हरभरा आणि मसूर आयातवाढीसाठीही पायघड्या घातल्या. त्यामुळे देशात विक्रमी कडधान्य आयात झाली. याचा परिणाम देशातील बाजारभावावर झाला.
भारताने २०२६-१७ या वर्षात विक्रमी ६३ लाख टन कडधान्य आयात केली होती. त्यानंतर यंदा आयात वाढणार आहे. भारताने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांमध्येच ४८ लाख टन कडधान्य आयात केली. मागील संपूर्ण आर्थिक वर्षात ४४ लाख टनांची आयात झाली होती. चालू वर्षातील उरलेल्या ३ महिन्यांमध्ये आणखी ७ ते १० लाख टन कडधान्य आयात होऊ शकते, असा अंदाज आयातदारांनी व्यक्त केला.
भारताने हरभरा आणि इतर कडधान्याचे भाव कमी करण्यासाठी पिवळा वाटाणा आयात खुली केली. म्हणजेच पिवळा वाटाणा आयातीवर कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. आयात शुल्क किंवा आयातकोटा नाही. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात आयात वाढली. देशात यंदा विक्रमी मागील १० महिन्यांमध्ये वाटाणा आयात विक्रमी २४ लाख टनांवर पोचली. याचा दबाव हरभरा भावावर आला आहे. पिवळा वाटाणा आयात २८ फेब्रुवारीपर्यंत खुली असणार आहे. तोपर्यंत आयात ३० लाख टनांपर्यंत होण्याची शक्यता असल्याचे आयातदारांनी सांगितले.
हरभरा आयात
देशात गेले वर्षभरा हरभरा आयातही वाढली होती. २०२३-२४ च्या हंगामात एकूण १ लाख ६४ हजार टन हरभरा आयात झाली होती. मात्र यंदा पहिल्या ८ महिन्यांमध्येच १ लाख ९७ हजार टन आयात झाली होती. भारताला सर्वाधिक निर्यात ऑस्ट्रेलियातून होते. चालू हंगामात सव्वा लाख टनांची आयात ऑस्ट्रेलियातून झाली तर टंझानियातून ५९ हजार टनांची आयात झाली. ऑस्ट्रेलियात यंदा उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात जास्त आयात होईल, असाही अंदाज आहे. ऑस्ट्रेलियातून १० लाख टन हरभरा निर्यातीची खेप निघाली आहे. त्यापैकी बहुतांशी हरभरा भारतात येण्याची शक्यता आहे.
तूर आयात
सरकारने तुरीची आयातही शुल्कमुक्त केली. चालू आर्थिक २०२४-२५ वर्षात एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांमध्येच देशात जवळपास १० लाख ८५ हजार टन तुरीची आयात झाली. २०२३-२४ च्या संपूर्ण आर्थिक वर्षात ७ लाख ७१ हजार टन आयात झाली होती. म्हणजेच गेल्या वर्षात जेवढी तूर आयात झाली होती त्यापेक्षा अधिक आयात ९ महिन्यांमध्येच झाली. पुढील ३ महिन्यात तुरीची आणखी आयात होण्याची शक्यता आहे.
दरावर दबाव
सरकारच्या धोरणामुळे देशात तूर, हरभरा, पिवळा वाटाणा आणि मसूरची आयात वाढत आहे. याचा देशातील बाजारावर परिणाम दिसत असून बाजारभाव दबावात येत आहेत. देशातही गेल्यावर्षीपेक्षा यंदा तूर आणि हरभरा उत्पादन वाढीची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने आयातीवर मर्यादा घालावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.