
Market Bulletin:
टोमॅटो तेजीत
बाजारातील घटती आवक आणि वाढलेला उठाव यामुळे सध्या टोमॅटोच्या दरात चांगली तेजी आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै आणि ऑगस्ट महिन्यात टोमॅटोची बाजारातील आवक कमी झाली आहे. उन्हाळ्यात वाढलेली उष्णता आणि मे महिन्यातील पावसाचा देशातील अनेक भागात टोमॅटो पिकाला फटका बसला. त्यामुळे दरात सुधारणा झाली आहे. राज्यात सर्वात मोठ्या नारायणगाव बाजारात टोमॅटो सरासरी ४ हजाराने विकला जात आहे. तर उचांकी भाव ५ हजारांवर आहे. तर बाजारांमध्ये मात्र दरपातळी काहीशी कमीच आहे. पुढील काही आठवडे बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरातील तेजी टिकून राहू शकते, असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
हिरवी मिरची टिकून
बाजारातील हिरव्या मिरचीची आवक कमीच आहेत. त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळत आहे. हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळत आहे. सध्या राज्यात पुणे, नागपूर, नाशिक आणि मुंबई बाजारातच मिरचीची आवक काहीशी अधिक दिसत आहे. तर मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर आहे. सरासरी ५ हजारांच्या दरम्यान विकली जात असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजारातील हिरव्या मिरचीची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
केळीला उठाव
राज्यात श्रावण महिन्यामुळे केळीला चांगला उठाव मिळत आहे. त्यातच राज्यात दर्जेदार केळईचा पुरवठा कमी आहे. त्यामुळे दर टिकून आहेत. परंतु श्रावण महिन्यातील वाढलेली मागणी आणि कमी पुरवठा याचा अपेक्षेप्रमाणे दराला आधार मिळाला नाही, असे शेतकरी सांगत आहेत. सध्या राज्यात केळीला सरासरी १ हजार ५०० ते २ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे. तर किरकोळ दर ४० रुपये ते ७० रुपये प्रतिडझन आहेत. पुढील काळात श्रावण आणि गणपतीमुळे केळीला उठाव राहणार आहे. त्यामुळे केळीचे दरही टिकून राहू शकतात, असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
कोथिंबीर नरमली
राज्यातील बाजारात मागील आठवडाभरापासून कोथिंबरीची आवक काहीशी वाढली आहे. त्यामुळे दरातही काहीशी नरमाई दिसून आली. घाऊक बाजारात कोथिंबीर १० ते १२ रुपये प्रतिजुडीने विकली जात आहे. आज हा दर ५ ते ७ रुपये प्रतिजुडीवर आला. दर चांगले असल्यामुळे अनेक भागात लागवडी वाढल्या होत्या. त्यामुळे आवक वाढली आहे. यापुढील काळात बाजारातील कोथिंबीरची आवक वाढत जाणार आहे. त्यामुळे दरावर याचा दबाव वाढू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
तुरीचा बाजार दबावातच
देशात २०२४ मध्ये तुरीचे उत्पादन कमीच राहीले. मात्र आयात वाढली. परिणामी तुरीचे भाव दबावात आहेत. तुरीला देशातील बाजारात मागील २ महिन्यांपासून हमीभावापेक्षा किमान १ हजार रुपये कमी भाव मिळत आहे. सध्या देशातील बाजारात तुरीला सरासरी ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांचा दर मिळत आहे. यंदा देशातील लागवड काहीशी पिछाडीवर आहे. त्यामुळे यंदाही देशातील तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, आयात मालाचा दबाव बाजारावर राहील. सरकारने खुले आयात धोरण स्विकारले आहे. त्यामुळे आयातीनुसार बाजारात बदल होताना दिसतील, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.