1. राज्यातील बाजारात सोयाबीनची भावपातळी आज काहिशी वाढलेली दिसते. बाजारात येणाऱ्या सोयाबीनमधील ओलावा कमी येत आहे. तसेच सोयातेलाला काहीसा आधार मिळाला. यामुळे सोयाबीनची भावपातळी सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान झाली. सोयातेलाला आणखी आधार मिळाल्यास सोयाबीनच्या दरातही सुधारणा दिसू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. कापूस दरातील चढ उतार कायम आहेत. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाद्यांमध्ये चढ उतार सुरु आहेत. बाजार समित्यांमधील भावपातळी ६ हजार ३०० रुपयांपासून सुरु होत आहे. तर सरासरी भाव ६ हजार ५०० ते ७ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत. पुढील काळात कापसातील ओलावा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाचे भाव स्थिरावू शकतात, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
3. नवरात्रीमुळे केळीला चांगलीच मागणी आहे. त्यातच राज्यात सध्या निर्यातक्षम केळीची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे केळीला चांगला भाव मिळत आहे. केळाला सध्या सरासरी प्रतिक्विंटल १ हजार ५०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. यंदा केळी पिकाला दुष्काळी स्थितीचा फटका बसत आहे. त्यामुळे केळीची भावपातळी पुढील काळातही वाढलेलीच राहू शकते, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला.
4. पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे कोथिंबीर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे बाजारात कोथिंबीरची आवक काही प्रमाणात घटली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कोथिंबीरीचे भाव वाढलेत. सध्या बाजारात कोथिंबीरीला सरासरी शेकडा १ हजार ५०० ते १ हजार ८०० रुपयांचा भाव मिळतोय. कोथिंबीरचे भाव आणखी काही दिवस टिकून राहू शकतात, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
5. सणांच्या तोंडावर गव्हाचे भाव वाढत आहेत. सणांमुळे गव्हाला मागणी आहे. पण बाजारात सध्या पुरवठा मर्यादीत दिसतोय. त्यामुळे गव्हाचे भाव काहिसे वाढले. सरकारने यापुर्वीच गहू निर्यातीवर बंदी घातली आहे. तर स्टाॅक लिमिटही लावले. नुकतेच गहू स्टाॅकची मर्यादाही कमी केली. देशातील मागणी आणि पुरवठ्यातील गणित तूट दाखवत असल्याने बाजारात नफावसुली होत असल्याची सरकारला शंका होती. त्यामुळे सरकारने भाव कमी करण्यासाठी पावले उचलली. पण बाजारात गव्हाची उपलब्धता कमी असल्यानेच गव्हाच्या भावाला आधार आहे. देशातील बहुतांशी बाजारांमध्ये गव्हाचे भाव प्रतिक्विंटल सरासरी २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहेत.
ऐन दिवाळी सणाच्या काळात गव्हाला आणखी मागणी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गहू आणखी भाव खाण्याची शक्यता आहे. मागील हंगामात वाढलेल्या उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन कमी होऊन भावही वाढले होते. यंदा पाऊसच कमी आहे. धरणांमधील पाणीसाठी कमी राहीला. त्यातच यंदा उनही तापण्याचा अंदाज आहे. त्यामुळे गहू उत्पादनवाढीवर आतापासूनच शंका उपस्थित केली जात आहे. या सर्व कारणांमुळे गव्हाचे भाव वाढत आहेत. यापुढील काळातही गव्हाचे भाव वाढू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.