
Nashik News: ‘एक जिल्हा एक उत्पादन - २०२४’अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला ‘अ’ श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. यासह रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक आणि अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि बिगर-कृषी क्षेत्रातील विशिष्ट उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेख पुरस्कार पटकावले आहेत.
नवी दिल्ली येथील भारत मंडपममध्ये सोमवारी (ता. १४) २०२४ या वर्षातील राष्ट्रीय ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याने कृषी उत्पादनांची नावीन्यपूर्णता, उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीयस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. हे पुरस्कार जिल्हा, राज्य आणि परदेशातील भारतीय दूतावास या तीन गटांमध्ये वितरित करण्यात आले.
परदेशातील भारतीय दूतावासांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्यांच्या ‘अ’ श्रेणीत महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, पंजाब आणि उत्तर प्रदेश राज्यांनीही सुवर्णपदक मिळवले. राज्याच्या वतीने उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंग कुशवाह यांनी पुरस्कार स्वीकारला.
‘कृषी’तील महाराष्ट्राचे यश
महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात आघाडी कायम राखत विविध जिल्ह्यांच्या उत्पादनांना मान्यता मिळवली आहे. नाशिकची द्राक्षे आणि मनुका (ग्रेप्स अँड रेझिन्स) यांना कृषी क्षेत्रातील श्रेणी ‘अ’अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळाल्याने नाशिकच्या कृषी क्षेत्रातील योगदानाला मान्यता मिळाली. हा पुरस्कार नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी स्वीकारला. जागतिक स्तरावर ‘आंब्यांचा राजा’ म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा यंदाही अव्वल ठरला. कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत प्रथम स्थान मिळवले असून त्यास सुवर्णपदक मिळाले.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नागपूरच्या प्रसिद्ध संत्र्यांनी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. या यशामुळे नागपूर जिल्ह्याचा कृषी वारसा आणखी समृद्ध झाला आहे. रौप्यपदकाचा पुरस्कार नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी स्वीकारला. अमरावती जिल्ह्याने ‘मंदारिन’ संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील ‘अ’ श्रेणीअंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता यामुळे फलोत्पादनात अमरावतीने हे यश संपादन केले. अमरावती जिल्हा उद्योग केंद्रांचे महाव्यवस्थापक नीलेश निकम यांनी कांस्य पदकाचा पुरस्कार स्वीकारला.
बिगर-कृषी क्षेत्रातील यश
अकोला जिल्ह्याने बिगर-कृषी क्षेत्रातील श्रेणी ‘ब’अंतर्गत कापूस जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेख पुरस्कार प्राप्त केला. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी स्वीकारला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.