
Pune News : नव्या हंगामात पहिल्या दोन महिन्यांमध्ये कापसाची आयात यंदा तीनपट झाली. निर्यातीची गती मात्र धिमी आहे. तर देशात यंदा कापूस आयात ६७ टक्क्यांनी वाढेल आणि कापूस निर्यात ३६ टक्क्यांनी कमी होईल. देशातील उत्पादन ३०२ लाख गाठींवर स्थिरावेल मात्र वापर ३१३ लाख गाठींचा होईल, असा सुधारित अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिला आहे.
देशात यंदा कापूस उत्पादन घटूनही बाजार दबावात आहे. मात्र दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने कापसाची विदेशातून आयात वाढली. देशातील उद्योग आयात करत आहेत. त्यामुळे चालू हंगामाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्येच म्हणजेच, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ९ लाख गाठी कापूस आयात झाला. देशातील शेतकऱ्यांना मात्र उत्पादन कमी राहूनही भाव कमी मिळत आहे.
काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थात सीएआयने आपला डिसेंबर महिन्याचा देशातील कापूस उत्पादन आणि वापराचा अंदाज जाहीर केला. डिसेंबरच्या अंदाजातही सीएआयने देशातील कापूस उत्पादन गेल्यावर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी कमीच राहील, असा अंदाज कायम ठेवला. देशात ३०२ लाख गाठी उत्पादन होणार आहे, असे सीएआयने काल जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांमध्ये ६९ लाख गाठी कापूस बाजारात आला. तर ९ लाख गाठी कापूस आयात झाला. हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यातील आयात ही गेल्यावर्षीच्या तुलनेत तीनपटीने अधिक आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव कमी होते. त्यावेळी देशातील उद्योगांनी आयातीचे सौदे केले होते. हा कापूस ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देशात आला. सप्टेंबर महिन्यात ४.५ लाख गाठी आयातीचे सौदे झालेला कापूस ऑक्टोबर महिन्यात देशात आला. त्यामुळे आयातीचा आकडा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये जास्त दिसत आहे.
पहिल्या दोन महिन्यांमध्ये भारतातून ४ लाख गाठींची निर्यात झाली. गेल्या हंगामातील निर्यात ३ लाख गाठी होती. म्हणजेच यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत १ लाख गाठीने कापसाची निर्यात अधिक झाली आहे. देशात यंदा कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा ७ टक्क्यांनी कमी राहणार आहे. गेल्यावर्षी देशात ३२५ लाख गाठी कापूस उत्पादन झाले होते. ते यंदा ३०२ लाख गाठींवरच स्थिरावण्याची शक्यता आहे. तर देशात ३१३ लाख गाठी कापसाचा वापर होईल, असेही सीएआयने आपल्या अंदाजात म्हटले आहे. त्यामुळे यंदा भारताची आयात निर्यातीपेक्षा जास्त राहणार आहे.
पहिल्या दोन महिन्यातील स्थिती
- आयात तीनपट होऊन ९ लाख गाठींवर पोचली
- निर्यात गेल्यावर्षीच्या ३ लाख गाठींवरून ४ लाख गाठींवर पोचली
- बाजारात ६९ लाख गाठी कापूस आला
- बाजारात आलेल्या कापसापैकी ५४ लाख गाठींचा वापर झाला
- देशातील कापसाचे भाव ६ हजार ८०० ते ७ हजार २०० रुपयांच्या दरम्यान राहीले
- आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव भारतापेक्षा कमी. त्यामुळे आयात वाढून निर्यात कमी झाली
आयात-निर्यातीचा अंदाज
भारत यंदा २५ लाख गाठी कापूस आयात करेल. गेल्या हंगामातली आयात १५ लाख गाठी होती. यंदाच्या हंगामात मात्र १८ लाख गाठी कापूस निर्यात करण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी भारताने २८ लाख गाठी कापूस निर्यात केला होता म्हणजेच यंदा निर्यात ३६ टक्क्यांनी कमी होणार आहे तर आयात जवळपास ६७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असे सीएआयने म्हटले आहे.
सीसीआयचा आधार
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव भारताच्या भावापेक्षा कमी आहेत. मात्र आयातीवर जवळपास ११ टक्के शुल्क कायम आहे. त्यामुळे देशातील कापूस बाजारात स्थिर आहे. त्यातच सीसीआय कापूस खरेदी करत आहे. खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा ५०० ते ७०० रुपयांनी कमी आहेत. त्यामुळे सीसीआयला यंदा चांगला कापूस मिळत आहे. सीसीआयने डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशभरात ३४ लाख गाठी कापूस खरेदी केला होता. यंदा सीसीआयची खरेदी चांगली होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.