
शेतकरी : पद्माकर जगन्नाथ पाटील
गाव : तरडी, ता. शिरपूर, जि. धुळे
एकूण क्षेत्र : ४० एकर
केळीखालील क्षेत्र : १० एकर (१५ हजार झाडे)
पद्माकर पाटील यांची तरडी (ता. शिरपूर, जि. धुळे) येथे अनेर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात ४० एकर मध्यम पोताची व पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे. सिंचनासाठी चार कूपनलिकांची सोय केलेली आहे. त्यांचे प्रमुख पीक केळी असून, त्यात नवती किंवा मृग बहर केळी घेतली जाते.
मे महिन्याच्या अखेरीस दरवर्षी केळीची लागवड केली जाते. त्यासाठी ग्रॅण्ड नैन या जातीच्या १०० टक्के उतिसंवर्धित रोपांचा उपयोग केला जातो. ही लागवड दीड फूट उंच व तीन फूट रुंद गादीवाफ्यावर दर पाच फुटांवर एक या प्रमाणे करतात.
सिंचनासाठी एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल असतात. पिकांची फेरपालट करण्यावर त्यांचा भर असतो. सामान्यतः दरवर्षी बेवड म्हणून पपई पीकही ते घेतात. जमिनीचा पोत, स्थिती लक्षात घेऊन निर्यातक्षम केळीचे उत्पादन ते घेत आहेत.
मागील हंगामात सुमारे १८ एकरांमध्ये ३१ हजार केळी रोपांची लागवड केली होती. त्यातील केळीची १०० टक्के निर्यात एका कंपनीच्या मदतीने करण्यात आली. आवश्यकतेनुसार केळी पिकातील तज्ज्ञ के. बी. पाटील यांचे मार्गदर्शन घेतले जाते.
केळी व्यवस्थापन...
- या वर्षी केळी लागवड २५ मेनंतर करण्याचे नियोजन असून, त्यासाठी तयारी सुरू केली आहे.
- केळीसाठी पपई काढणीनंतर रिकाम्या झालेल्या मध्यम व पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्राची निवड केली आहे.
- त्यात ३० मार्च रोजी खोल नांगरणी करून घेतली आहे. नांगरणीनंतर शेत उन्हामध्ये तापण्यासाठी सोडले आहे. सततच्या सिंचनामुळे ढासळलेला जमिनीचा पोत रूळावर आणण्यासाठी शेत तापू देणे महत्त्वाचे असते.
- नियोजित क्षेत्रात एकरी पाच ट्रॉली शेणखत दिले आहे.
- उतिसंवर्धित रोपांची आगाऊ नोंदणी केलेली आहे. ही नोंदणी प्रथम करून घेतल्यामुळे रोपांची नेमकी संख्या, ती केव्हा उपलब्ध होणार यांचा अंदाज मिळतो. त्यानुसार पुढील लागवड व अन्य नियोजन करणे सोपे जाते.
- उष्णता वाढत असतानाच मे महिन्याच्या मध्यावर लागवड करणे धोकादायक ठरू शकते. कारण मे महिन्याच्या सुरुवातीला आमच्या येथील कमाल तापमान अनेकदा ४५ अंश सेल्सिअसवर जाते. अशा स्थितीत रोपे जगविणे अवघड जाते. हे लक्षात घेता लागवडीचा काळ मेअखेरीस निश्चित केला आहे.
- शेणखत दिल्यानंतर, शेत भुसभुशीत करून घेतले आहे. त्यामुळे पुढे उंच गादी वाफे तयार करणे सोपे जाते.
- लागवडीनंतर सुरुवातीपासूनच जिवामृत व जिवाणू खतांचा वापर केला जातो. त्याच्या निर्मिती व साठवणुकीसाठी शेतात स्वतंत्र एक हजार लिटर क्षमतेच्या टाकीची व्यवस्था केलेली आहे. ही टाकी मजबूत असून, पुढील आठ ते १० महिने तिचा नियमित उपयोग केला जाईल.
पुढील १५ दिवसांतील नियोजन
- केळी लागवडीसंबंधी तयार केलेल्या गादीवाफ्यावर प्रति एक हजार झाडांसाठी पाच गोण्या (एक गोणी ५० किलो) सिंगल सुपर फॉस्फेट आणि प्रति १ हजार झाडांसाठी एक टन जिप्सम गादीवाफ्यावर टाकले जाईल.
- यानंतर गादीवाफे व्यवस्थित करून घेतले जातील.
- गादीवाफ्यावर वखर किंवा बैलजोडीचलित कोळपे उलटे ठेवून ओढून घेतले जाईल. यामुळे खते व्यवस्थित मिसळून वाफे एकसारखे सपाट होतील.
- एका गादीवाफ्यावर दोन लॅटरल टाकून गादीवाफे व्यवस्थितपणे भिजवून घेतले जातील. कारण रोपे लागवडीसंबंधीची जागा व्यवस्थित भिजलेली असावी. कोरडेपणा राहिल्यास रोपांची मर होण्याची शक्यता असते.
- प्रति तास दोन लिटर उत्सर्जनाची ठिबक वापरणार आहे. सिंचनासाठी मिनी ऑटोमेशन असल्यामुळे सिंचनाचे नियोजन काटेकोरपणे करणे सोपे ठरते.
--गादीवाफे व्यवस्थित भिजल्यानंतर पाच बाय सहा फूट लागवडीसाठी निशाणी गादीवाफ्यावर तयार केली जाईल.
- लागवडीपूर्वी तीन ते चार दिवस शेतात रोपे एका झाडाखाली किंवा हिरव्या नेटखाली ठेवून शेतातील वातावरणाशी सुसंगत करून घेणार आहे. रोपे प्रयोगशाळेत असताना तापमान बऱ्यापैकी थंड असते. त्याचे हार्डनिंग काही प्रमाणात केले जात असले तरी आपल्या शेतामध्ये रोपे रुळवून घेतल्यास वातावरणाच्या ताणामुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि मर रोगांचा प्रादुर्भाव कमी राहत असल्याचा माझा अनुभव आहे.
- लागवडीनंतर कमाल तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक राहिल्यास केळी रोपांचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी क्रॉप कव्हरचा उपयोग केला जाईल.
संपर्क - पद्माकर पाटील, ९३७१७२२१००, (शब्दांकन : चंद्रकांत जाधव)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.