Importance of Water : सामूहिक उन्नतीसाठी पाण्याचे महत्त्व...

Water Forum Meeting : १८ ते २५ मे या कालावधीमध्ये इंडोनेशियातील बालीमधील बाली इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर या ठिकाणी जागतिक जलमंचाची बैठक होते आहे. या वर्षीचा दहावा जागतिक जलमंचाच्या परिषदेचा विषय आहे ‘सामूहिक उन्नतीसाठी पाणी‘.
Water Importance
Water ImportanceAgrowon

डॉ. सुमंत पांडे

World Water Forum Conference : जगातील पाण्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणारे सगळ्यात मोठे व्यासपीठ म्हणजे जागतिक जलमंच (वर्ड वॉटर फोरम). गेल्या काही वर्षांत पाण्याची मागणी आणि उपलब्धता यामध्ये कमालीची तफावत जाणवते आहे आणि ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी जगभरातील विविध देशांतील पाण्याच्या समस्यांबाबत एकत्रपणे येऊन चर्चा करून त्यावर निर्णय घेण्यासाठी हा जलमंच स्थापन करण्यात आलेला आहे.

यामध्ये पाण्यावर काम करणारी समाज माध्यमे, धोरण ठरवणारे, निर्णय घेणारे लोक एकत्र येतात. जगभरातील पाणीटंचाईवर कशी मात करता येईल, कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत सविस्तर चर्चा करतात.

जागतिक पाणी प्रश्‍नांवर चर्चा :

जागतिक जलमंच (वर्ल्ड वॉटर फोरम) याची सुरुवात १९९७ पासून झाली. परंतु त्यापूर्वी जागतिक जलपरिषद ही याच उद्देशासाठी स्थापन झालेली होती. जागतिक जलपरिषद आणि जागतिक जलमंचातील तज्ज्ञ मंडळी दर तीन वर्षांनी एकत्र येतात. ज्या देशामध्ये ही चर्चा होणार आहे, त्या देशाला पाहुणे देश म्हणून संबोधतात. १९९७ पासून आजपर्यंत सुमारे दहा वेळा जागतिक जलमंच एकत्र आलेला आहे.

प्रत्येक तीन वर्षांनी जगभरामध्ये पाण्यावर काम करणारी व्यक्ती, संस्था त्या ठिकाणचे शासन, धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या व्यक्ती संस्था, सरकारी अधिकारी एकत्र येतात. एक आठवडाभर ही चर्चा विविध पातळीवर सुरू असते. आतापर्यंत मोरोक्को, हेग, क्योटो, मेक्सिको, इस्तंबूल, मार्सली, देगु, ब्राझीलिया, डकार येथे जागतिक जलमंच बैठक संपन्न झाली. यंदा इंडोनेशिया देशातील बाली येथे जगभरातील पाणी प्रश्‍नावर काम करणारे तज्ज्ञ बैठकीसाठी एकत्र आले आहेत.

Water Importance
Water Importance : भारतीय परंपरेमध्ये पाण्याला सर्वोच्च स्थान

प्रत्येक जलमंचाच्या बैठकीसाठी एक निश्‍चित विषय निर्धारित करण्यात येतो. त्या विषयावर आधारित चर्चा होते. या वर्षीचा विषय आहे सामूहिक उन्नतीसाठी पाणी. २०२२ मध्ये जागतिक जलमंचातील बैठकीचा विषय होता शांती आणि विकासासाठी पाणी. १९९७ मध्ये झालेल्या पहिल्या बैठकीचा विषय होता पाणी जीवन आणि पर्यावरण.

म्हणजेच या मंचावरून एका निश्‍चित उद्देशासाठी जगभरातील धोरण कर्ते आणि विविध संस्था एकत्र येतात. वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी आपापल्या खंडातील समस्या मांडतात. चांगल्या कामाची देवाणघेवाण होते. या समस्यांवर आधारित काही विषयावर संश्लेषण होते, त्याच्यावर आधारित पुढे कसे काम करावे किंवा धोरणात्मक निर्णय काय घ्यावे यावर चर्चा होत असते.

यंदाच्या जलमंच परिषदेतील घडामोडी :

या वर्षीचा दहावा जागतिक जलमंचाच्या परिषदेचा विषय आहे ‘सामूहिक उन्नतीसाठी पाणी’. १८ ते २५ मे या कालावधीमध्ये इंडोनेशिया देशातील बालीमधील बाली इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर या ठिकाणी जागतिक जलमंचाची बैठक होते आहे. जागतिक जलपरिषद आणि इंडोनेशियन सरकारच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको बिडोडो आणि जागतिक जल परिषदेचे अध्यक्ष लॉक फ्युचॉन यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न होते आहे.

बाली या बेटावर प्रामुख्याने हिंदू लोकसंख्या सुमारे ८० टक्के आहे. त्यामुळे भारतात पाण्याबाबत जो आदर व्यक्त केला जातो त्याच पद्धतीने येथे देखील पाण्याबाबत आदर व्यक्त केला जातो. १८ मे २०२४ रोजी बाली येथील रीतिरिवाजाप्रमाणे जलपूजन करण्यात आले. २० मे रोजी मान्यवरांच्या हस्ते विधिवत या परिषदेला सुरुवात झाली. यामध्ये इंडोनेशिया देशाचे अध्यक्ष, मंत्री तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे जागतिक जल
परिषदेचे अध्यक्ष आणि विविध देशांचे प्रतिनिधी व्यासपीठावर उपस्थित होते.

Water Importance
World Water Day : जागतिक जल दिन फक्त औपचारिक नको!

जागतिक जलमंचाच्या बैठकीची धोरणे :

जागतिक जलमंचाच्या बैठकीमध्ये सर्वसाधारणपणे राजकीय स्थिती, विषयनिहाय घटना आणि विभागनिहाय घटनांवर चर्चा होते. राजकीय घटनेवरील चर्चेमध्ये संबंधित देश किंवा राज्याचे प्रमुख यांच्या भूमिका यांना खूप महत्त्व असते. त्यांच्या देशाची राजकीय इच्छाशक्ती तसेच समस्त जगासाठी काय धोरण असावे याबाबत चर्चा होते.

जागतिक जल परिषदेचा एक पार्लमेंटरी विभाग आहे ज्यामध्ये सर्व देशांचे सदस्य राष्ट्रांचे प्रमुख एकत्र येतात आणि यामध्ये दिशानिर्देश ठरतो. मंत्री परिषदेवरील घटनेमध्ये मुख्य सरकारची जी रचना आहे त्यांचे विचार ऐकले जातात. देशाच्या जल संकटावर मात करण्यासाठी धोरणात्मक काय निर्णय घ्यावेत याबाबत चर्चा होते. त्यानंतर नदी-खोरेनिहाय चर्चा होत असते. नवव्या जागतिक जलमंचाच्या परिषदेमध्ये या विषयांवर चर्चा झाली. संबंधित देशातील नदी-खोरेनिहाय चर्चा होणे अपेक्षित आहे, असेही सांगण्यात आले.

विषयनिहाय घटना :

१) जलसुरक्षा आणि संपन्नता.
२) निसर्ग आणि मानवासाठी पाणी.
३) आपत्ती व्यवस्थापन आणि त्याची तीव्रता कमी करणे.
४) सुशासन सहकार्य आणि पाणी वाटप.
५) पाण्यासाठी शाश्‍वत वित्तपुरवठा. या क्षेत्रातील ज्ञान आणि सर्जनशीलता.

जगभरातील समस्यांवर चर्चा :

सर्वसाधारणपणे या जागतिक जलमंचामध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रांमध्ये भूमध्यसागराच्या प्रदेशात असणारे देश, अमेरिका खंड, आशिया खंड आणि प्रशांत महासागराच्या प्रदेशात असलेले देश आणि आफ्रिका खंडातील देश अशी सर्वसाधारणपणे विभागीय वर्गवारी करण्यात आली आहे. जागतिक जल परिषद ही जगभरातील जल संकटावर चर्चा, विचारमंथन आणि त्यावर निश्‍चित मार्ग काय काढावे याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करत असते. ही जगातील पाण्यावर काम करणारी सगळ्यात मोठी परिषद आहे.

सर्वसाधारणपणे मागील तीन दिवसांमधील चर्चेमध्ये जगातील सर्वांत खंडांमध्ये विशिष्ट भूमध्य सागरी प्रदेशांमध्ये असणारे देश, आफ्रिका खंडातील देश, अमेरिकेतील देश या सर्व देशांना पाण्याची खूप मोठी अडचण भासते आहे. त्याचप्रमाणे उपलब्ध पाणी आणि पाण्याची मागणी यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे, हे सर्व देशातील प्रतिनिधींनी सांगितलेले आहे.


दक्षिण पूर्व आशिया म्हणजेच भारतीय उपखंडाच्या पूर्वेला असलेली आशिया खंडातील देश आहेत. ज्यामध्ये विशेषतः कंबोडिया, व्हिएतनाम, लावोस, इंडोनेशिया, थायलंड, जावा, सुमात्रा ही बेटे येतात. यांचे प्रश्‍न अधिक गंभीर आणि तीव्र आहेत. कारण हे सर्व देश प्रशांत महासागर आणि भूमध्यसागर यांच्या परिघांमध्ये येतात. वादळ, सुनामी, पूर यांसारख्या घटनांना सामोरे जावे लागते. तेथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही अत्यंत गंभीर आहेत. हे देशात भात हे प्रमुख पीक आहे. या देशातील लोकांच्या आहारामध्ये भात हा प्रमुख घटक असतो. त्याशिवाय मासे आणि मांसाहार हे दोन त्यांचे प्रमुख खाद्यपदार्थ आहेत. पाण्याच्या संकटामुळे भात उत्पादनावर परिणाम झाला आहे. पण सर्वांत अधिक पाणी हे भात पिकासाठी लागते. इतर देशांप्रमाणे याही ठिकाणी लोकसंख्येची मोठी वाढ झालेली आहे. विशेषतः इंडोनेशिया हा जगातील सर्वांत जास्त घनता असलेला देश आहे.

दक्षिण आशिया उपखंडामध्ये भारत, पाकिस्तान, म्यानमार, भूतान, श्रीलंका, बांगलादेशातील पाणी प्रश्‍न गंभीर झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काम करणे अत्यंत गरजेचे आहे. तथापि, यासाठी राजकीय इच्छाशक्तीची खूप महत्त्वाची गरज आहे. पाण्याचा वापर वाढल्यामुळे भूगर्भातून पाण्याचा प्रचंड उपसा झाला आहे. तसेच जलप्रदूषणातही वाढ झाली आहे. लोकसहभागाच्या बरोबरीने लोकशिक्षण महत्त्वाचे आहे, तथापि राजकीय इच्छाशक्ती, कायद्यामधील बदल, धोरणातील बदल, नदी नीती इत्यादी बाबी प्रत्येक देशाने स्पष्टपणे अधोरेखित केल्या पाहिजेत. त्यासाठीच ही जागतिक जलपरिषद आहे.

येता काळ हा संगणकीय काळ आहे. येत्या काळात कृत्रिम बुद्धिमता आणि डेटा सायन्स या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. यामध्ये संपूर्ण जलचक्रामधील पाण्याची उपलब्धतेची गणना करता येते. भारतामध्ये पूर आणि दुष्काळ या दोन मोठ्या समस्या आहेत, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे या समस्यांच्या आधारे पूर्वअनुमान करणे शक्य आहे.
६) जागतिक जल परिषदेमध्ये उभारण्यात आलेल्या दालनामध्ये जगभरातील विविध कंपन्या सहभागी झाल्या आहेत. यामध्ये विशेषतः पाण्यावर काम करणाऱ्या संस्था आणि कंपन्यांनी पाणी शुद्ध करण्याची उत्पादने मांडली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com