
डॉ. संदीप ढेंगे, डॉ. प्रकाश घुले
जनावरे आणि पक्षी वातावरणातील तापमानाशी स्वत:चे शारीरिक तापमान स्वनियंत्रित करीत असल्याने, विविध शारिरीकक्रियांद्वारे तयार होणारी उष्णता विविध मार्गाने शरीराबाहेर उत्सर्जित करतात. यातून स्वत:चे शारीरिक तापमान बाह्य वातावरणातील तापमानाशी स्वनियंत्रित करू शकतात. परंतु, उन्हाळ्यात जास्त तापमानामुळे जनावरांना शारीरिक उष्णता बाहेर उत्सर्जित करताना विविध शरिरक्रियात्मक अडचणी येतात. याचा जनावरांच्यावर ताण येतो. उष्णतेच्या तणावामुळे पशूंच्या शारिरीकक्रियांचे नैसर्गिक कार्य हळूहळू कमी होते.
उष्णतेच्या ताणाची लक्षणे
जास्त तापमानामुळे गाई,म्हशींचे शारीरिक तापमान वाढते. शारीरिक तापमान नियंत्रित करण्यासाठी वेगाने श्वास घेतात, जीभ बाहेर काढून तोंडावाटे श्वास घेतात, हृदयाची स्पंदने वाढतात आणि चालताना धापतात.
उष्णतेच्या तणावामुळे शारीरिक द्रव्यांचे प्रमाण असमतोल होते. शारीरिक आम्लता वाढल्याने दुधाळ गायी-म्हशींतील कॅल्शिअमची पातळी कमी झाल्याने दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते.
दुधाळ गायी-म्हशी शारीरिक तापमान स्वनियंत्रित करताना शारीरिक ऊर्जा खर्च होते. त्यामुळे दुधाळ गायी-म्हशींचे दैनंदिन दुग्ध उत्पादन कमी होण्यास सुरवात होते. काही कालावधीनंतर एकूण दुग्ध उत्पादनात लक्षणीय घट होते.
उष्णतेच्या ताणामुळे गायी-म्हशींचे प्रजनन चक्र विस्कळीत होते. उन्हाळ्यात गायी-म्हशी भाकड राहण्याची शक्यता खूप जास्त असते. कालवडींची शारीरिक वाढ खुंटते. गाभण कालवडींची उन्हाळ्यात योग्य काळजी घेतली गेली नाहीतर कालवडींचा गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते.
म्हशींचा रंग काळा आणि घाम ग्रंथी कमी असल्यामुळे शरीरातील उष्णता उत्सर्जित करता येत नाही. शारीरिक तापमान म्हशी स्वनियंत्रित करू शकत नाहीत. म्हशींना उष्णतेचा ताणाचा अधिकच त्रास होत राहिल्याने म्हशींचे ऋतुचक्र बदलते. म्हशी साधारणपणे उन्हाळ्यात माजावर येत नाहीत.
मुबलक प्रमाणात हिरवा चारा मिळत नसल्याने आरोग्य ढासळते. रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने सांसर्गिक आणि असांसर्गिक आजार होतात.
दैनंदिन आहार व्यवस्थापन
दुधाळ गायी-म्हशींना पुरेसा हिरवा चारा आणि स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा. म्हशींच्या शरीरावर काही वेळांच्या फरकाने थंड पाणी शिंपडावे.
गायींच्या गोठ्यात थंड हवेसाठी पंखे, फॉगर्सची व्यवस्था करावी. उन्हाळ्यात नियमित हिरवा चारा पुरविल्याने शारीरिक पाण्याची पातळी कायम राखली जाते.दैनंदिन दुग्ध उत्पादनात घट होत नाही, शरीरक्रिया उत्तम राहते.
शरीरक्रिया उत्तम राहण्यासाठी नियमितपणे खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणे पुरवावीत. जीवनसत्वे आणि खनिजांमुळे रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते. उष्माघात होत नाही.
कालवडींना शारीरिक वाढीकरिता ऊर्जा अपुरी पडते. कालवडींची वाढ योग्य रितीने होत नाही. गाभण कालवडींना उन्हाळ्यात अतिरिक्त मात्रेत खनिज मिश्रणे आणि जीवनसत्वे नियमीत खाद्यात पुरवावीत.
कालवडींना थंड आणि शांत ठिकाणी बांधावेत, थंड पाणी पाजावे आणि शरीरावर थंड पाणी शिंपडावे. उष्माघातग्रस्त कालवडींकडे लक्ष ठेवावे, पशुवैद्यकीय उपचार करावेत.
शेळ्या, मेंढ्यांमधील ताणाची लक्षणे आणि उपाययोजना
बाह्य वातावरणातील तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसच्यावर गेल्यावर उष्णतेचा त्रास जाणवायला सुरवात होते.वातावरणातील किमान व कमाल तापमान सहन करण्याची शेळ्यांची क्षमता इतर पशुधनापेक्षा अधिक आहे. मोठ्या तापमान बदलामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
शेळ्या, मेंढ्या मोकळ्या कुरणावर चरताना सावली शोधत फिरतात. पाणी पिण्याचे प्रमाण वाढते. त्या धापायला लागतात, तोंडाला फेस येतो.
शारीरिक तापमान वाढते, श्वसन क्रियेचा वेग वाढतो. प्रखर ऊन असल्यास तडफडून खाली जमिनीवर कोसळतात.
वाढीव तापमानामुळे शेळ्या-मेंढ्यांची प्रजोत्पादन क्रिया खोळंबते.
करडांची वाढ मंदावते आणि अशक्त दिसतात.
खाद्य व्यवस्थापनातील बदल
उन्हाळ्यात शेळ्या,मेंढ्यांच्या गोठ्यात नेहमी हवा खेळती आणि थंड राहणे गरजेचे आहे आणि गोठा अशा ठिकाणी असावा की, जिथे झाडांची सावली सतत पडत राहील.
गोठ्यावरील छत सहसा टिन पत्राचे नसावे कारण, उन्हाने छत तापून आणखी उकाडा निर्माण होतो. जर छत टिन पत्राचे असेल तर वरील भागास पांढरा रंग किंवा चुना लावून घ्यावा त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होऊन शेळ्यांना काही प्रमाणात उष्णतेचा त्रास कमी होतो. टिन पत्राच्या आतील भागाला हिरवा रंग द्यावा.
गोठ्याच्या बाहेरील भागाला पोती किंवा गोणपाट बांधावे.
उन्हाळ्यात शेळ्या-मेंढ्यांकरिता कोरड्या चारा प्रमाण कमी करून हिरवा अधिक चारा प्रमाणात द्यावा.
खाद्यात सोयाबीन अवशेष, गहू, तांदूळ यांचा भरडा आणि खनिज मिश्रणांचा समावेश करावा.
वैरणीची पौष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर २ टक्के मिठाचे पाणी शिंपडावे आणि यामुळे चाऱ्याची चव वाढते, पोटात थंडावा निर्माण होतो. याचा फायदा असा आहे की, शेळ्या-मेंढ्या पाणी जास्त पितात, खाल्लेल्या खाद्याची पाचकता वाढते, जास्त पाणी पिल्याने शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात जास्त प्रमाणात शारीरिक ऊर्जा खर्च झाल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित असण्यासाठी शेळ्या-मेंढ्यांना गुळाचे पाणी पाजावे. गुळाच्या पाण्याने पोटात गारवा तयार होते आणि शरीरातील साखरेची गरज भागविली जाते.
- डॉ. संदीप ढेंगे, ९९६०८६७५३६
(सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, पशू शरिरक्रियाशास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.