
दुग्ध व्यवसायामध्ये सध्याच्या ठाणबंद पद्धतीमध्ये जनावरांचे व्यवस्थापन (Animal Management) करताना अधिकाधिक वेळ गोठ्याची स्वच्छता व जनावरांच्या स्वच्छतेमध्ये जातो. ठाणबंद पद्धतीमध्ये गाई, म्हशींना एकाच जागी बांधल्यामुळे काही समस्या उद्भवत असल्याचे लक्षात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पायांच्या सांध्याचे, खुरांचे आजार, कासेचे आजार, गर्भाशयाचे आजार इत्यादी मोठे आजार संभवतात. वरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पशुपालकांचा अधिक पैसा व वेळ वाया जातो. यावर खात्रीशीर उपाय म्हणजे मुक्त संचार पद्धतीने जनावरांचे संगोपन करणे. यामध्ये मोकळ्या जागेत कुंपण करून जनावरांना बांधून न ठेवता मुक्त ठेवण्यात येते. या मुक्त संचार गोठ्यात वैरण, पाणी व स्वच्छ हवा २४ तास पुरवली जाते. मुक्त संचार गोठ्याचे फायदे काय आहेत? याविषयी महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाने दिलेली माहिती पाहुया.
मुक्त संचार गोठा पद्धतीचे फायदे काय आहेत ?
शेण उचलावे लागत नाही.
जनावरांना फिरण्याचे स्वातंत्र्य असल्याने पाय व खुरांचे आजार होत नाहीत.
कासदाह आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प असते.
जनावरांना उन्हात अथवा सावलीत बसण्याचे स्वातंत्र्य असल्याने गरजेनुसार नैसर्गिक वातावरणाचा लाभ होतो.
पिण्यासाठी पाणी २४ तास उपलब्ध ठेवल्यास तहान लागल्यानंतर पाणी पिणे जनावरांना शक्य होते. याचा फायदा उत्पादन वाढीतून दिसून येतो.
नैसर्गिक सर्व सुविधा मिळाल्यामुळे गायी, म्हशी आनंदी वातावरणात राहतात. त्यामुळे म्हशींमधील पान्हा सोडण्याची समस्या सुद्धा कमी होते.
मुक्त संचार गोठ्यात कोंबड्या सोडल्यास त्या जनावरांच्या अंगावरील व गोठ्यातील गोचीड, कीटक खातात त्यामुळे जैवीक नियंत्रण होते.
दुग्धव्यवसायात वेळ, मनुष्यबळ व पैशांची बचत करण्याच्या दृष्टीने पशुपालकांनी मुक्त संचार गोठा पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.