
डॉ. संजय भालेराव, डॉ. विकास सरदार
जनावरांचे खाद्य (Animal Feed) ज्या ठिकाणी साठवून ठेवले आहे, तेथे पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी, कारण खाद्य ओले झाल्यास बुरशी (Fungal to Fodder) लागते. असा सदोष चारा (Animal Fodder) खाल्यामुळे जनावरांमध्ये चयापचयाचे आजार (Animal Disease) दिसून येतात. त्याचा जनावरांच्या दूध उत्पादनावर (Milk Production) विपरीत परिणाम होतो. पावसाळ्यामध्ये गवतात पाण्याचे प्रमाण जास्त व तंतुमय पदार्थांचे प्रमाण कमी असते. त्यामुळे जनावरांची अन्न पचनाची प्रक्रिया बिघडते. म्हणून पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याबरोबर वाळलेला चारा व खुराक जनावरांना देणे महत्त्वाचे आहे.
ग्रास टेटॅनी
जनावरे कुरणामध्ये चरायला गेल्यावर जास्त प्रमाणात कोवळे हिरवे गवत मोठ्या प्रमाणावर खातात, त्या वेळी हा आजार उद्भवतो.
रक्तातील मॅग्नेशियम क्षाराच्या कमतरतेमुळे हा आजार होतो. अतिरिक्त पोटॅशियम आणि सायट्रिक ॲसिड यामुळे हा आजार होतो.
लक्षणे
लक्षणे लवकर दिसून येत नाहीत, परंतु ग्रास टेटॅनीमुळे जनावराच्या शरीराचा तोल जातो, जनावर अस्वस्थ असते. २) शरीराला आकडी येते, जनावर डोके खाली पाडते. जनावर कोमात जाऊन मृत्यू होतो.
उपाय
पावसाळ्यात जनावरांच्या आहाराची योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळता येतो.
जठराचा दाह
पावसाला सुरवात झाली की कुरणावर चरणाऱ्या जनावरांना हिरवे गवत भरपूर प्रमाणात उपलब्ध होते, ते अधाशीपणाने चारा खातात, चाऱ्यात असणारे काही विषाणू आणि कृमी पोटात संसर्ग करून जठराचा दाह निर्माण करतात.
एकदम जास्त धान्य, पीठ अथवा मऊ खाद्य खाल्ल्यामुळे अपचन होते. त्यामुळे जठरात निर्माण होणाऱ्या पाचक रसात अनैसर्गिक बदल होतात.
नेहमीच्या चारा पाण्यात अचानक केलेला फेरबदल हे या आजाराचे प्रमुख कारण आहे.
रासायनिक खते, फवारणी केलेला चारा सेवन केल्यामुळे पोटाच्या आतील स्लेश्म आवरणास इजा, जखमा होतात. बाधित चारा खाल्ल्यामुळे जिवाणूंचा संसर्ग होतो.
जनावरांना कॅल्शिअम, फॉस्फरससारख्या सूक्ष्म घटकांची, जीवनसत्त्वांची कमतरता असेल, तर ते दगड, माती, विटा, मेलेल्या जनावरांची हाडे, प्लॅस्टिक व कागद गिळतात.
अपचनामुळे बद्धकोष्ठता होते, पोटात चारा घट्ट होऊन पोटाची हालचाल थांबते, जनावर रवंथ करायचे थांबते, जनावरांना बद्धकोष्ठता झाल्यामुळे चारा खात नाहीत, पोटदुखीची लक्षणे दाखवितात. आंत्राविषार आजाराचे जिवाणू या जनावरांच्या पोटात वाढतात, त्यामुळे त्यांना हगवण लागते.
उपाय
जठराचा दाह होऊ नये, तसेच अपचन झालेले असल्यास जनावरांचा चारा, पाण्यातील केले जाणारे फेरबदल टाळावेत. जनावरे अखाद्य वस्तू खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
अपचनात रेचक देऊन पचनसंस्थेतील अडसर दूर करावा.
पचन पूर्ववत होईपर्यंत जनावरांना पचनास हलके आणि काहीसे कमी आणि भरड खाद्य द्यावे.
पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
नायट्रेट्सची विषबाधा
ज्या चारा पिकांच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर नत्रयुक्त खतांचा वापर केला जातो, अशा चाऱ्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. अतिरिक्त नायट्रेट खाण्यात आल्यास कोठीपोटातील जिवाणू नायट्रेटचे रूपांतर नायट्राइटमध्ये करतात, पुढे नायट्राइटचे रूपांतर अमोनिया वायूत होऊन जनावरांना विषबाधा होते.
नायट्राइट व अमोनिया वायू रक्तात शोषला जाऊन रक्तातील हिमोग्लोबिनसोबत संयोग पावतो, त्यातून मेटहिमोग्लोबिन तयार होते.
लाल रंगाचे रक्त गडद तपकिरी रंगाचे होते, त्यामुळे ते ऑक्सिजन वाहण्याची क्षमता गमावून बसते.
रक्तातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक हिमोग्लोबिनचे रूपांतर मेटहिमोग्लोबिनमध्ये झाल्यास जनावर ऑक्सिजन प्राणवायू अभावी दगावते.
लक्षणे
नायट्रेट विषबाधा झाल्यास नाडीचा वेग वाढतो, श्वासोच्छ्वास वेगाने होण्यास सुरुवात होते.
वारंवार मूत्रविसर्जन, अतिसार, थरथर कापणे, चक्कर आल्यासारखे जनावर चालते.
जनावरांच्या तोंडातून फेस येतो.
उपचार
जास्त प्रमाणात धान्याचा भरडा आणि जीवनसत्त्व खाऊ घातल्यास नायट्रेटची विषबाधा टाळता येते.
जनावरांना पुरेशा प्रमाणात खुराक दिल्यास नायट्रेट विषबाधा सहन करण्याची क्षमता चांगल्या प्रमाणात असते. लक्षणे दिसताच तातडीने पशुतज्ज्ञांकडून उपचार करावेत.
चारा व्यवस्थापन
जास्त नायट्रेट असलेल्या चारा पिकांपासून मुरघास बनविल्यास नायट्रेटचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते.
- डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५
( पशुपोषणशास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय,
शिरवळ, जि.सातारा)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.