Jaggery Production
Jaggery Production Agrowon
यशोगाथा

Jaggery Production : गूळ, काकवी, कॅण्डी निर्मितीतून तयार केली ओळख

सुर्यकांत नेटके

बेलपिंपळगाव (ता. नेवासा, जि. नगर) (Belpimpalgaon) येथील शिवाजीराव हरिभाऊ कांगुणे यांनी उच्चशिक्षित मुलांच्या प्रोत्साहनातून गुऱ्हाळ सुरु केले. ऊस रसापासून गूळ,(Jaggery) काकवी, कॅण्डी इत्यादी उत्पादनांची निर्मिती करतात. तयार उत्पादनांच्या थेट विक्री करण्यावर भर दिला जातो. सध्या नवीन तंत्रज्ञानाचे गुऱ्हाळ उभारणीचे काम सुरु आहे.

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव व परिसरात पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने उसाचे पीक अधिक प्रमाणात घेतले जाते. येथील शिवाजीराव कांगुणे व दत्तात्रेय कांगुणे हे दोघे बंधू. दोन्ही बंधूचे संसार वेगवेगळे विस्तारले असले तरी त्यांनी एकत्रितपणे शेतीत सुधारणा केली आहे. वडिलोपार्जित फक्त तीन एकर शेती. मात्र, शेती उत्पादन, पिठाची गिरणी, किराणा दुकान व इतर व्यवसायांच्या माध्यमातून त्यांनी टप्प्याटप्प्याने सुमारे ३५ एकर जमीन खरेदी केली. आता शिवाजीराव यांच्याकडे १८ एकर शेती असून त्यात उसासह कापूस, सोयाबीन, कांदा, गहू इत्यादी पिके असतात. परिसरातील प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उसाच्या रसापासून प्रक्रिया उत्पादने तयार करण्यासाठी त्यांनी गुऱ्हाळ सुरु करत शेतकरी म्हणून आदर्श निर्माण केला आहे.

गुऱ्हाळाची उभारणी

शिवाजीराव कांगुणे यांचे लहान चिरंजीव प्रशांत यांचे गावातीलच विलास शेरकर हे मावसभाऊ आहेत. विलास यांचे अभियांत्रिकीचे शिक्षण झालेले असून ते व्यवसाय करतात. मात्र, प्रशांत व विलास यांनी शेतीला पूरक असा व्यवसाय करण्याच्या निश्चय केला. त्यातून गुऱ्हाळाच्या माध्यमातून उसावर प्रक्रिया करून उद्योग उभारणीचा निश्चय केला.

दोघा भावांनी पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत जाऊन गुऱ्हाळांची पाहणी केली. त्यानंतर २०२० मध्ये आठ लाख रुपये खर्च करून जुने गुऱ्हाळ खरेदी केले. शिवाय इतर बाबींसाठी मिळून एकूण २५ लाखांचा खर्च करून उसापासून रसायनमुक्त गूळ, काकवी, कॅण्डी, गूळ पावडर इत्यादी उत्पादने तयार करण्यास सुरुवात केली.

गुऱ्हाळासाठी नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावर २० गुंठे जागा भाड्याने घेतली होती. तेथे दोन वर्ष गुऱ्हाळ सुरु ठेवले. सध्या स्वतःच्या शेतामध्ये अत्याधुनिक, नवीन तंत्रज्ञानयुक्त गुऱ्हाळ उभारणीचे काम सुरु आहे.

गुऱ्हाळाची प्रतिदिन ४० टन ऊस गाळपाची क्षमता आहे. सध्या साधारण १० ते १२ टन ऊस गाळप होत असून एक टन उसापासून ८० ते ११० किलो गूळ तयार होतो.

पहिल्या वर्षी दीड हजार टन तर दुसऱ्या वर्षी २ हजार टनांपर्यत उसाचे गाळप केले. स्वतःच्या शेतातील १५ एकर व नातेवाईक वसंतराव शेरकर यांच्या शेतातील १५-१६ एकर उसाचे गाळप केले. शिवाय इतर शेतकऱ्यांकडून ही ऊस खरेदी केला.

गूळ तयार करण्याचा पहिला घाणा अडीच तासात आणि त्यानंतर दर चाळीस मिनिटांनी दुसरा घाणा निघतो. एका घाण्यापासून ७० ते ८० किलो गूळ उत्पादन मिळते. ऊस रसापासून गूळ व इतर मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी रसायनांऐवजी भेंडीच्या झाडांच्या रसाचा वापर केला जातो.

शेतीतही जपली प्रयोगशीलता

शिवाजीराव कांगुणे हे परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित आहेत. शेतीकामांमध्ये यंत्राच्या वापरावर अधिक भर दिला जातो. दहा वर्षांपासून ते वेगवेगळ्या शेती औजाराचा वापर करत आहेत. यामुळे मजुरी खर्चात बचत होऊन उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

कांदा लागवडीमध्ये रोपांच्या पूनर्लागवडीऐवजी यंत्राद्वारे बियाणांची पेरणी करण्याचा प्रयोग त्यांनी केला आहे. गव्हाची पेरणी २ ओळींत सहा इंच अंतर राखून करण्याचा प्रयोग केला आहे. त्यामुळे उत्पादनात एकरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली. सोयाबीनची दोन ओळीत १२ इंच अंतर ठेवून टोकण यंत्राने पेरणी केली. कापूस लागवडीतही साडेचार बाय २ फूट अंतरावर लागवडीचा प्रयोग केला आहे. दोन एकरावर सीताफळ लागवड केली आहे. त्यात आंतरपीक म्हणून मिरची लागवड केली आहे.

कुटुंब झाले उच्चशिक्षित ः

शिवाजीराव कांगुणे यांनी शेतीतील उत्पन्नाच्या जोरावर मुलांना उच्चशिक्षण दिले आहे. लहान मुलगा प्रशांतचे बी.टेक (ॲग्री) झाले असून ते बॅंकेत वरिष्ठ पदावर तर मोठा मुलगा आनंद यांचे एम.टेक (ॲग्री) झाले असून ते बीड जिल्ह्यात सहाय्यक पोलिस निरिक्षक आहेत. मुलगी स्वाती पायघन यांचे डी.फार्म झाले असून दुसरी मुलगी वैशाली टेकाळे प्रगतिशील कुटुंबात शेतकरी आहे. परिसरातील एक आदर्श कुटुंब म्हणून कांगुणे कुटुंबाकडे पाहिले जाते. आत्मा अंतर्गत दिल्या जाणाऱ्या ‘उत्कृष्ट शेतकरी’ या पुरस्काराने शिवाजीराव यांचा नगर येथे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या हस्ते गौरव झाला आहे.

थेट विक्रीवर भर

गुळाची १ किलो, ५ किलो आणि १० किलोपर्यंत पॅकिंग, काकवी अर्धा ते १ किलो, गूळ पावडर अर्धा किलो तसेच कॅण्डी आणि गूळ वडीची ५ व १० ग्रॅम वजनाप्रमाणे अर्धा किलो पॅकिंग करून थेट विक्रीवर अधिक भर असतो.

गूळ, कॅण्डी, पावडर, काकवी तयार करताना कोणत्याही रसायनाचा वापर केला जात नाही. त्यामुळे उत्पादनांना मागणीही अधिक असते. गावपरिसरासह शेजारील जिल्ह्यातील ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पादनांचा पुरवठा केला जातो.

थेट विक्रीसाठी नेवासा-श्रीरामपूर रस्त्यालगत स्टॉलची उभारणी करून उत्पादनांची विक्री केली जाते.

गूळ व इतर उत्पादनांच्या विक्रीसाठी मुलगा प्रशांत यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून बरेच ग्राहक जोडले आहेत.

- शिवाजीराव कांगुणे ९८२२०८४३३६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT