यशोगाथा

कापूस, दादर ज्वारीसह भादलीची दुग्धोत्पादनात ओळख

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

भादली बुद्रुक (ता.जि. जळगाव) गावचे शिवार कापूस (Cotton), उडीद (Black Gram), मूग, तूर, दादर ज्वारी (Dadar Jowar), हरभरा (Chana) आदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. काळी कसदार मध्यम जमीन भागात असून काही भागांत जलसाठे बऱ्यापैकी आहेत. इतरत्र पाण्याची समस्या आहे. एकूण सुमारे ११०० हेक्टर क्षेत्र असून कमाल क्षेत्र कोरडवाहू आहे. सुमारे १२ हजार गावची लोकसंख्या आहे.

पीक पद्धती

कापूस हे गावचे मुख्य पीक आहे. सुमारे ६०० हेक्टर त्याचे क्षेत्र असून, सुमारे ४०० हेक्टरवर उडीद व उर्वरित क्षेत्रात मूग, तूर असते. कापसात मूग, तूर ही आंतरपीक पद्धती वापरली जाते. यातून नत्र व्यवस्थापनाबरोबरच उत्पादन खर्च कमी करण्याचा हेतू असतो. सघन पद्धतीनेही कापूस घेण्यात येतो. बहुतांश शेतकरी बीटी वाणांना पसंती देतात. गुलाबी बोंड अळीचा प्रकोप कापूस पिकात अलीकडील वर्षांत दिसत आहे. अळीचे जीवनचक्र थांबवण्यासाठी शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवडीवर भर देतात. कामगंध सापळ्यांचा वापर, निंबोळी अर्काची फवारणी असे उपाय नियमित असतात. त्यामुळे अळीवर नियंत्रण मिळवून पहिल्या तीन वेचण्या व्यवस्थित करणे शक्य होते. शाश्‍वत जलसाठा असलेले शेतकरी पीक फेरपालटीवर भर देतात.

उत्पादन

मागील तीन वर्षे अति पावसाने कापूस पिकाची उत्पादकता धोक्यात आली. परंतु अशातही भादली बुद्रुकचे शेतकरी उत्तम व्यवस्थापन करून एकरी किमान आठ क्विंटल उत्पादन साध्य करीत आहेत. कोरडवाहू, काळ्या कसदार जमिनीत दर्जेदार लांब धाग्याचा कापूस उत्पादित केला जातो. त्याला चांगला उठाव असतो. थेट किंवा खेडा खरेदी पद्धत असते. मागील तीन वर्षे अनुक्रमे ४८०० ते ५००० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. यंदा (२०२१-२२) सरासरी आठ हजार रुपये दर गावातील शेतकरी मिळवू शकले. अपवादाने हा दर नऊ ते १० हजार रुपयांपर्यंतही पोहोचला.

घरातील बियाणे वापरात

गावातील अनेक शेतकऱ्यांनी उडीद, मूग, तूर आदींच्या बियाण्यांचे संवर्धन केले आहे. अति पाऊस तसेच हवामान बदलामुळे देशी बियाण्यांची बँकही काही प्रमाणात नामशेष होत चालली आहे. हवामान व अन्य बाबी अनुकूल राहिल्यास उडदाचे एकरी पाच क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकरी साध्य करतात. गावातील उडीद, मुगाला जळगावसह अन्य शहरांतून मागणी असते.

डाळी व दादर प्रसिद्ध

भादली येथील उडीद, मूग, तूर डाळ व दादर ज्वारीही प्रसिद्ध आहे. शेतकरी मुंबई, पुणे भागांत त्याची थेट विक्री करतात. शेतकरी योगेश झांबरे दरवर्षी तुरीची डाळ पारंपरिक पद्धतीने तयार करतात. दरवर्षी सुमारे ३२ टन धान्य फेब्रुवारीमध्ये ते मुंबईत नेतात. तेथे त्यांनी ग्राहक तयार केले आहेत. खपली गव्हाचीही ते अशीच विक्री करतात. अन्य शेतकरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून थेट विक्रीसाठी प्रयत्नशील आहेत. शिवारात रब्बीमध्ये दरवर्षी ५०० ते ६०० हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारी असते. घरगुती बियाण्याचाच वापर होतो. बहुतांश उत्पादन सेंद्रियच असते. जळगावमधील अनेक ग्राहक थेट भादलीत येऊन शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. खायला गोड, रुचकर व पचायला हलकी असल्याने या ज्वारीला चांगला उठाव आहे.

उत्पादन व दर

ज्वारीचे एकरी आठ क्विंटलपर्यंत उत्पादन तर एकरी १२५ पेंढ्या कसदार चारा मिळतो. त्यास प्रति शेकडा ३००० ते ४००० रुपये दर मागील दोन वर्षे मिळाले आहेत. धान्याला प्रति क्विंटल २७०० पर्यंतचा दर यंदा मिळाला. कोविड काळात हाच दर ११०० ते १२०० रुपये होता.

हरभराही जोमात

शिवारात हरभऱ्याच्या विविध वाणांचाही पेरणी ४०० हेक्टरवर होते. घरी जतन केलेल्या वाणाला पसंती असते. एकरी पाच ते सहा क्विंटल उत्पादन मिळते. सन २०२१ मध्ये ३३०० व यंदा साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. कापूस किंवा उडीद, तसेच कापसात मूग, तुरीचे आंतरपीक आणि त्यावर रब्बीत हरभरा किंवा दादर ज्वारी किंवा गहू यामुळे शिवारातील जमिनीचा पोत टिकून आहे. हा ‘पॅटर्न’ बऱ्यापैकी शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरतो. कारण खरीप हातचा गेल्यास रब्बीत भर काढण्याची संधी असते.

दुग्धोत्पादनात प्रगती

भादलीत दुग्धोत्पादनातही आश्‍वासक चित्र आहे. तीन हजारांपर्यंत पशुधन असून, दररोज अडीच हजार लिटरपर्यंत दूध संकलन होते. दोन सहकारी डेअऱ्या आहेत. महिलांनीही डेअरी सुरू केली आहे. जागृती मिलिंद चौधरी या महिला सहकारी दूध सोसायटीच्या अध्यक्ष आहेत.

शंभर वर्षे जुनी सोसायटी

गावात १०० वर्षे जुनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. तिचे गोदामही आहे.
सोसायटीने भरीव काम या शतकात केले आहे. हर्षल नारखेडे सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

शैक्षणिक व धार्मिक वातावरण

शिक्षण क्षेत्रातही गाव पुढारले असून जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा व महात्मा गांधी विद्यालय आहे. गावात २०० वर्षे जुने विठ्ठल मंदिर, राम मंदिर व किमान ४०० वर्षांपूर्वीचे महादेव मंदिर आहे. याशिवाय ज्ञानेश्‍वर मंदिर, निमजाय देवी मंदिर, महानुभव पंथीयांचे दत्त मंदिर आहे. दरवर्षी कीर्तन सप्ताह, महाशिवरात्री, हनुमान जयंतीला कार्यक्रम होतात.

विकासकामे

सरपंच मिलिंद दत्तात्रेय चौधरी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या पुढाकाराने विकासकामांना वेग आला. जलशुद्धीकरण यंत्रणा बसवून विविध भागांत थेट नळांद्वारे जलपुरवठा, शेतरस्त्यांचे डांबरीकरण
अनेक रस्त्यांचे काँक्रिटीकरण झाले. समाज मंदिर, व्यायाम शाळांची उभारणी अलीकडे झाली आहे.

संपर्क ः मिलिंद चौधरी, ९०९६६७५७७७, ९०९६४३७९९९
प्रवीण कोल्हे, ९८३४७५२७५४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्ण लाटेचा इशारा

Soybean Rate : हिंगोली, परभणी बाजार समित्यांत सोयाबीन दर कमी

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

SCROLL FOR NEXT