Pune News : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे उत्तरेकडील शीत वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यात हुडहुडी वाढली आहे. मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. जेऊर येथे यंदाच्या हंगामात प्रथमच नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आजपासून (ता. ३०) किमान तापमानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. तरीही राज्यात गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका तीव्र होऊ लागला आहे. शुक्रवारी (ता. २९) पंजाबमधील ‘आदमपूर’ येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जेऊर येथेही तापमानाचा पारा ६ अंशांवर घसरला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ येथे नीचांकी ८ अंश तापमानाची नोंदले गेले. अहिल्यानगर, पुणे, जळगाव येथे १० अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, शुक्रवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी, सांताक्रूझ येथे उच्चांकी ३३.५ अंश तापमानाची नोंद झाली. आजपासून (ता. ३०) राज्यात किमान तापमानात २ ते ४ अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. किमान तापमानात वाढ होणार असली, तरी गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :
पुणे २८.३ (९.५), अहिल्यानगर २७.९ (८.३), धुळे २९ (८), जळगाव ३० (१०), जेऊर २९ (६), कोल्हापूर २८.७ (१५), महाबळेश्वर २१.३ (१०.५), मालेगाव २६.८ (१०.५), नाशिक २७.४ (१०.६), निफाड २६ (१०.१), सांगली २९.४ (१२.७), सातारा २७.७ (१२.२), सोलापूर ३१.४ (१२.८), सांताक्रूझ ३३.५ (१६.५), डहाणू ३२.८ (१८.१),
रत्नागिरी ३३.५ (१७.३), छत्रपती संभाजीनगर २८ (१०.६), धाराशिव २७.१ (१२.२), परभणी २८.२(१०), परभणी कृषी विद्यापीठ २७.८ (८), अकोला २९.९ (१४.६), अमरावती २९.६ (१४.५), भंडारा २७.६ (१२.६), बुलडाणा २७.६ (१२.६), ब्रह्मपुरी ३२.८ (११.६), चंद्रपूर २८.४ (१४.२), गडचिरोली २८.२(१४), गोंदिया २७.८ (१०.९), नागपूर २९.१ (१३.२), वर्धा २८ (१२.९), वाशीम २८.४ (१३), यवतमाळ २७.६ (-).
चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी, तमिळनाडूला इशारा
नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीची (डीप डिप्रेशन) तीव्रता हळूहळू वाढत आहे. शुक्रवारी (ता. २९) ही प्रणाली नागापट्टणमपासून ३०० किलोमीटर पूर्वेकडे, पुद्दुचेरीपासून ३४० किलोमीटर, चेन्नईपासून ३८० किलोमीटर आग्नेयेकडे होती. शुक्रवारी (ता. २९) रात्री उशिरापर्यंत बंगालच्या उपसागरात ‘फेंगल’ चक्रीवादळ घोंघावण्याची शक्यता आहे.
ही चक्रीवादळी प्रणाली आज (ता. ३०) दुपारपर्यंत तमिळनाडू आणि पुद्दुचेरीदरम्यान असलेल्या कराईकल आणि महाबलीपूरम जवळ किनाऱ्याला धडकण्याचा अंदाज आहे. या वेळी पूर्व किनाऱ्यावर ताशी ७० ते ९० किलोमीटर वेगाने वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
१० अंशांपेक्षा कमी तापमान असलेली ठिकाणे :
जेऊर ६, धुळे ८, परभणी (कृषी) ८, अहिल्यानगर ८.३, पुणे ९.५, जळगाव १०.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.