Agriculture Weather Agrowon
हवामान

Weekly Weather : मॉन्सूनच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली

Weather Update : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता. ५ आणि ६) हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी राहील. तसेच उत्तर भारतावर त्याहून कमी म्हणजे राजस्थानवर १००२ हेप्टापास्कल व काश्मीरच्या पायथ्यास १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील.

 डॉ. रामचंद्र साबळे 

Agriculture Weather : महाराष्ट्रावर आज आणि उद्या (ता. ५ आणि ६) हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका कमी राहील. तसेच उत्तर भारतावर त्याहून कमी म्हणजे राजस्थानवर १००२ हेप्टापास्कल व काश्मीरच्या पायथ्यास १००० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. मात्र हिंदी महासागरावर हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतका अधिक राहील. त्यामुळे वारे दक्षिणेकडील जास्त हवेच्या दाबाकडून उत्तरेकडील कमी हवेच्या दाबाकडे वाहण्यास सुरुवात होईल. सद्यःस्थितीत कोकणात वारे नैर्ऋत्येकडून वाहण्यास सुरुवात झाली आहे.

दक्षिण गोलार्धातील विषववृत्तापासून दक्षिणेस २० अंशांवर चक्राकार वारे वाहण्यास सुरुवात झाली असून, तेच मॉन्सूनचे उगमस्थान आहे. वाऱ्याचे ताशी वेग वाढत आहेत. हवेत बाष्पाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळेच मॉन्सून आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. दक्षिण अंदमान समुद्रात मॉन्सूनचे आगमन २ ते ३ दिवस निर्धारित वेळेपूर्वी म्हणजे १७ किंवा १८ मे रोजी होईल, अशी सद्यःस्थिती आहे. तसेच यापुढे तापमानवाढही रोखली जाईल.

अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचे पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस इतके वाढले आहे. तर याविरुद्ध प्रशांत महासागराचे पेरूजवळील विषववृत्तीय समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे.

यावरून ‘ला निना’चा प्रभाव सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे. तेथे हवेचे दाब वाढल्याने हिंदी महासागरावरील वारे वेगाने भारताच्या दिशेने आगेकूच करतील व अंदमानात व केरळला मॉन्सून निर्धारित वेळेपूर्वी २ ते ३ दिवस आधीच दाखल होईल अशी सद्यःस्थिती आहे.

कोकण :

कमाल तापमान सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, ठाणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के राहील. मात्र ठाणे जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ४८ टक्के इतकी कमी राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात २० टक्के, पालघर जिल्ह्यात ३५ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ४१ ते ५० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ठाणे व पालघर जिल्ह्यांत ११ ते १२ कि.मी., तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ७ ते ९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैर्ऋत्येकडून राहील.

उत्तर महाराष्ट्र :

कमाल तापमान नंदुरबार जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस, तर नाशिक व धुळे जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस, जळगाव जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस व नंदुरबार जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता नंदुरबार जिल्ह्यात ५१ टक्के, नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३७ टक्के, तर धुळे जिल्ह्यात २९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १५ टक्के इतकी कमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होऊन ते ताशी १८ ते २२ कि.मी. इतके राहतील. वाऱ्याची दिशा नंदुरबार जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून व इतर जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

मराठवाडा :

आज (ता.५) धाराशिव, लातूर व नांदेड जिल्ह्यांत ०.४ ते ०.६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याची दिशा थोड्याच दिवसांत बदलेल व ती नैर्ऋत्येकडून सुरू होईल. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील.

जालना, नांदेड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे १६ ते २५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे सकाळी हवामान अत्यंत कोरडे राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे १० ते १५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग लातूर व नांदेड जिल्ह्यांत ८ ते ११ कि.मी., तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत १५ ते २१ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्‍चिम विदर्भ :

कमाल तापमान अकोला व वाशीम जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. बुलडाणा जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १० ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेगात वाढ होईल. वारे ताशी १८ ते २० कि.मी. वेगाने वाहतील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

मध्य विदर्भ :

यवतमाळ, नागपूर व वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता १० ते २० टक्के इतकी कमी राहील. तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६ ते १३ टक्के इतकी कमी राहील. हवामान उष्ण व कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत ११ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पूर्व विदर्भ :

कमाल तापमान भंडारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता गडचिरोली जिल्ह्यात ४४ टक्के, तर चंद्रपूर जिल्ह्यात २९ टक्के राहील आणि भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत १८ ते २० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत अत्यंत कमी म्हणजे ६ ते ११ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते ९ कि.मी. सर्वच जिल्ह्यांत राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र :

कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, सांगली व पुणे जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस, तर सोलापूर व नगर जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर पुणे, नगर व कोल्हापूर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सांगली व सातारा जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील.

सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ९० टक्के, सांगली व सातारा जिल्ह्यांत ६५ टक्के, तर पुणे जिल्ह्यात ५४ टक्के आणि सोलापूर व नगर जिल्ह्यांत २६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात २७ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यांत १३ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १४ ते २० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील.

कृषी सल्ला

खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून जमिनीची नांगरट करावी. वखरणी करून आधी पिकाची धस्कटे वेचून जमीन स्वच्छ करावी.
आले व हळद लागवड करण्यासाठी आडवी व उभी नांगराची फळी देऊन जमीन भुसभुशीत करावी. हेक्टरी २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत विस्कटून कुळवाची पाळी देऊन ते जमिनीत मिसळावे.
नवीन लावलेल्या नारळाच्या रोपांना मंडपावर किलतान टाकून सावली करावी.
जनावरांतील उष्णतेचा ताण टाळण्यासाठी जनावरांना सावली, योग्य वायुविजन आणि भरपूर स्वच्छ पाणी पुरवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT