Weekly Weather : कमाल, किमान तापमानात वाढ; उष्णतेच्या लाटेची शक्यता

Weather Update : बुधवारपर्यंत (ता.२८ एप्रिल ते १ मे) महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल तर गुरुवार (ता.२ मे) पासून पुढे १००४ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील.
Agriculture Weather
Agriculture WeatherAgrowon

डॉ. रामचंद्र साबळे

Agriculture Weather : महाराष्ट्रावर उद्या (ता. २८) पासून शनिवार (ता.४ मे) या कालावधीत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. उद्यापासून बुधवारपर्यंत (ता.२८ एप्रिल ते १ मे) महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल तर गुरुवार (ता.२ मे) पासून पुढे १००४ हेप्टापास्कल इतके कमी हवेचे दाब राहतील. कमाल व किमान तापमानात वाढ होते, तेव्हा हवेचे दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते.

ज्यावेळी वारे हवेच्या जास्त दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने वाहतात. तेथे मोठ्या प्रमाणात ढग जमा होऊन पाऊस पडतो. या काळातील पावसाला पूर्वमोसमी पाऊस असे संबोधले जाते.
कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होईल. हवामान उष्ण व कोरडे राहील. बहुतांशी भागांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. काही भागांत अल्पशा पावसाची शक्यता राहील. जेथे हवेचे कमी दाब राहतील तेथे विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल.

अरबी समुद्र, हिंदी महासागर बंगालचा उपसागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. त्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढेल. ढगनिर्मिती होऊन पश्चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहील. प्रशांत महासागराच्या पेरूजवळ पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान १८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरल्याने ‘ला-निना’चा प्रभाव सुरू झाला आहे. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात पावसाची शक्यता निर्माण होईल.

कोकण :
कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमानात वाढ होऊन ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान पालघर जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ७१ ते ८४ टक्के, तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ५२ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ४१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५० टक्के, रत्नागिरी जिल्ह्यात ३० टक्के तर रायगड, पालघर व ठाणे जिल्ह्यांत २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्य व वायव्येकडून राहील.

Agriculture Weather
Maharashtra Rain : राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता ; तर काही भागात वादळी पावसाचा अंदाज कायम

उत्तर महाराष्ट्र :
कमाल तापमान धुळे जिल्ह्यात ४१ अंश सेल्सिअस तर नाशिक, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २६ ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ३२ ते ३९ टक्के, तर धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत २२ ते २६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १४ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात अल्पशा म्हणजेच ०.६ मिमी ते १.२ मिमी पावसाची शक्यता आहे.

मराठवाडा :
आज व उद्या (ता.२८,२९) परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३.५ ते ४.५ मिमी तर धाराशिव, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत २.१ मिमी इतक्या अत्यल्प पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान धाराशिव, बीड व परभणी जिल्ह्यांत ४१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. तर लातूर, नांदेड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस तर छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस आणि लातूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४२ ते ४३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता
१८ ते २२ टक्के राहील. बीड व धाराशिव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १६ किमी तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ताशी १० ते १२ किमी राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

पश्चिम विदर्भ :
आज व उद्या (ता.२८,२९) अमरावती जिल्ह्यात ८.८ मिमी, वाशीम जिल्ह्यात ७.६ मिमी, अकोला जिल्ह्यात ६.० मिमी व बुलडाणा जिल्ह्यात ४ मिमी पावसाची शक्यता राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४६ ते ५० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते २३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्य व ईशान्येकडून राहील.

मध्य विदर्भ :
आज व उद्या (ता.२८,२९) यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २.४ ते ५.६ मिमी पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तपमान ४० अंश सेल्सिअस तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४० ते ४६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० किमी राहील. वाऱ्याची दिशा नैऋत्येकडून राहील.

Agriculture Weather
Weather Update : उन्हाचा पारा पुन्हा चाळीशीपार; वादळी पावसाचा इशारा

पूर्व विदर्भ :
आज (ता.२८) गोंदिया जिल्ह्यात व भंडारा जिल्ह्यात ४ मिमी, चंद्रपूर जिल्ह्यात ३.२ मिमी व गडचिरोली जिल्ह्यात २ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३८ अंश सेल्सिअस, गडचिरोली जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस तर भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत ४० ते ४१ अंश सेल्सिअस राहील.

किमान तापमान चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३८ टक्के, तर गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांत ४४ ते ४९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १६ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ९ किमी राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

पश्चिम महाराष्ट्र :
आज व उद्या (ता.२८,२९) सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ०.३ ते ०.६ मिमी पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत ३९ अंश सेल्सिअस, पुणे व नगर जिल्ह्यांत ४० अंश, तर सांगली व सोलापूर जिल्ह्यांत ४१ ते ४२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील.

आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १६ ते २० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १५ किमी राहील. सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ ते १८ किमी राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील.

कृषी सल्ला :
- उन्हाळी मूग, तीळ, सूर्यफूल, भुईमूग या पिकांना दर १० दिवसांनी पाणी द्यावे.
- फळबागांमध्ये सूक्ष्म सिंचन पद्धती, आच्छादन, बाष्परोधकांचा वापर करावा.
- आंबा फळांची काढणी सकाळी सहा ते नऊ किंवा संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत करावी. फळे काढताना चार ते सहा सेंमी देठ ठेवून काढावीत.
- गोठ्यातील जनावरे व कुक्कुटपक्ष्यांना स्वच्छ व मुबलक पाणी २४ तास उपलब्ध करावे.
- कुक्कुटपालन शेडमधील तापमान कमी राखण्यासाठी शेडवर गवत टाकावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com