Retreating Monsoon Agrowon
हवामान

Retreating Monsoon : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता

Team Agrowon

Pune News : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. दोन दिवसांत मोसमी वारे वायव्य भारतातून आपला परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे. मॉन्सून परतीच्या काळात राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्याच्या विविध भागांत पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. सप्टेंबर महिन्यातच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा बसू लागला आहे. यातच पोषक हवामान झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. १० ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज असून, त्यानंतरही दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाची शक्यता कायम आहे.

पुढील दोन आठवड्यांत सोलापूर, सांगली, धाराशिव जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक तर नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, लातूर जिल्ह्यांच्या काही भागांत सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता असून, दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतरही आठवडाभर (३ ते १० ऑक्टोबर) राज्यात सर्वदूर पावसाचे संकेत आहेत.

नवरात्रोत्सवात पावसाचा जोर वाढणार

मॉन्सूनचा परतीचा प्रवास यंदाही लांबला असून, देशाच्या प्रमुख भागांमधून मॉन्सूनची माघार उशिरा होण्याची शक्यता आहे. सध्या उत्तर-पश्‍चिम भारतात थोडी कमी पावसाची स्थिती असल्याने पश्‍चिम राजस्थान आणि कच्छ भागातून दक्षिण-पश्‍चिम मॉन्सूनची माघार २३ सप्टेंबरपर्यंत सुरू होऊ शकते. मात्र हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजानुसार २३ सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या प्रणालीच्या निर्माणामुळे मध्य भारत (मध्य प्रदेश, छत्तीसगड) आणि महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे निवृत्त हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

कमी दाब प्रणालीच्या संभाव्य हालचालींमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात (२७ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर) मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते. पश्‍चिम-उत्तर-पश्‍चिम दिशेने प्रणालीच्या हालचालींमुळे पावसाचा जोर अधिक असू शकेल. चौथ्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी आणि त्यानुसार नियोजन करावे, असेही डॉ. कश्यपी यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weekly Weather : राज्यात ईशान्य मॉन्सून दाखल

Farmer Issue : शेतकऱ्यांना तातडीने मदत करा

Hurricane : आग्नेय आशियानंतर भारतावर ‘यागी’चे ढग

Fruit Crop Insurance : आंबा, काजूचा ७८ कोटी विमा मंजूर

Marathwada Rain : मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT