Summer Season
Summer Season Agrowon
संपादकीय

Summer Season : झळा उन्हाच्या, चिंता पावसाची

Team Agrowon

Summer Season : होळी हा सण (Holi Festival) जसजसा जवळ येऊ लागला, तसा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. फेब्रुवारी महिना हा पहाटेची थंडी (Clod Weather) व दुपारी कडक ऊन असा गेला. मात्र मार्च सुरू झाल्यापासून पहाटेची थंडी गायब होऊन उष्णतामान (Temperature) वाढत आहे.

त्यातच यंदाच्या उन्हाळ्यातील, अर्थात मार्च ते मे दरम्यानचा तापमानाचा अंदाज हवामान विभागाने (Weather Department) वर्तविला आहे. पूर्व-मध्य-ईशान्य भारतात कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर देशाच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीइतकेच राहणार आहे.

मध्य व वायव्य भारतात उष्णतेच्या लाटेची (Heat Wave) शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्याचा विचार करता कोकण आणि पूर्व विदर्भात कमाल तापमान सरासरीच्या थोडे वर तर उर्वरित राज्यात ते सरासरीइतके असणार आहे. हा अंदाज वर्तविताना हवामान विभागाने ला-निना (La-Nina) स्थिती निवळत असल्याचे सांगून मॉन्सूनच्या पावसावर बोलण्याचे मात्र टाळले आहे.

आठवडाभरापूर्वी विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सलग तीन वर्षे असलेली ला-निना स्थिती निवळत असून, मॉन्सून हंगामात एल-निनो उद्‍भविण्याची शक्यता अमेरिकेतील ओशिनिक ॲण्ड ॲटमोस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन (नोआ) या संस्थेने व्यक्त केली होती.

एल-निनो असला म्हणजे भारतात पाऊस कमी पडतो. त्यामुळे आपल्यासाठी हा चिंतेचा विषय मानला जातो. परंतु एल-निनो स्थिती पाच-सात वर्षांत एकदा, तर मॉन्सून दरवेळी न चुकता येतो. त्यामुळे एल-निनोचा आणि मॉन्सूनचा सरळ संबंध लावणे योग्य ठरत नाही.

तसेच फेब्रुवारी-मार्चमध्ये एल-निनो प्रभावाचा अंदाज वर्तविणे फारच घाईचे असून, या काळातील अंदाज सहसा चुकीचे ठरतात. मागील काही वर्षांपासून दूरवरील एल-निनो, ला-निनापेक्षा स्थानिक हवामान घटक मॉन्सूनवर अधिक प्रभाव टाकत असल्याचेही दिसून येते.

त्यामुळे मॉन्सूनच्या पावसाची चिंता आत्ताच नको. राज्यात २०१९ पासून मागील चार वर्षे चांगला पाऊस पडतोय. असे असले तरी मार्चपासूनच पाणीटंचाईच्या झळा सुरू झाल्या आहेत.

कोकणामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर फिरताहेत, तर पुढे विदर्भ, मराठवाड्यातही टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागेल, अशी परिस्थिती आहे.

भूगर्भातील पाणीपातळीही खालावली असून, त्याचा रब्बी तसेच उन्हाळी पिकांच्या सिंचनावर प्रतिकूल परिणाम दिसून येतोय, ही खरेच चिंतेची बाब म्हणावी लागेल.

सध्या पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागातच (कोकण, विदर्भ) पुढे उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने याचे चांगलेच चटके शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतात. पाऊस असो की उष्णतेच्या लाटा, हे सर्व वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून असते.

राज्यात पश्‍चिमेकडून वारे वाहत राहिले, तर तापमानाची तीव्रता कमी असते. परंतु वाऱ्याची दिशा उत्तरेकडून असली तर तापमानात लक्षणीय वाढ होते. हे वारे शुष्क असतात अन् रखरखीत उन्हाळा आपल्याला जाणवू लागतो.

असे शुष्क गरम वारे सतत वाहत राहिले आणि दुपारचे तापमान ४ ते ५ अंश सेल्सिअसने तर उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते. अशा उष्णतेच्या लाटा राज्यात मागील काही वर्षांपासून वाढल्या आहेत, या लाटा असह्य असतात.

एकंदरीतच काय तर सध्याच्या वाढलेल्या उन्हाच्या चटक्यात, तसेच पुढील संभाव्य उष्णतेच्या लाटांत शेतकऱ्यांसह सर्वांनीच सावध राहायला पाहिजेत. उन्हाळ्याचा काळ असला आगामी पावसाळ्यातील पाणी अधिकाधिक जमिनीत कसे मुरेल, भूपृष्ठावरही ते जास्तीत जास्त कसे साठविले जाईल, याकरिता सर्वांनीच कामाला लागायला हवे.

आपल्या शेतशिवारातील पाणी जागीच अडवून जमिनीत मुरविण्यासाठीचे सर्व उपचार शेतकऱ्यांनी करायला हवेत. शासनाने देखील सार्वजनिक ठिकाणी मृद्‍-जलसंधारणाची कामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यायला हवा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT