Hailstorm Agrowon
संपादकीय

Hailstorm : गारपिटीचा करा अभ्यास

विजय सुकळकर

Hailstorm Condition : एप्रिल महिन्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असतानाच वाऱ्याची चक्राकार स्थिती निर्माण झाली आहे. हा कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्र, उत्तर गुजरात, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूपर्यंत विस्तारत गेला. त्यामुळे या भागात पावसाळा पोषक वातावरण निर्माण होऊन कुठे वादळी पाऊस, तर कुठे गारपीट होत आहे.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी, उन्हाळी पिके तसेच फळे-भाजीपाल्याचे मोठे नुकसान केले आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक होत असलेल्या गारपिटीने शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाळी आहे.

नुकसान केवळ शेतीपिकांचेच नाही तर अनेक शेतकऱ्यांचे घर-गोठ्यावरील पत्रे उडाली. वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत शेडनेटचे प्रचंड नुकसान झाले. काही ठिकाणी वीज पडून जनावरेही दगावली आहेत. गारपिटीमुळे शेत जमिनीचेही नुकसान होत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून आले आहे. गारपीट झालेली जमीन कडक होते. अशा जमिनीत उन्हाळ मशागत करण्यास शेतकऱ्यांना अडचणीचे ठरते.

नैसर्गिक आपत्तीत पाहणी-पंचनामे नेहमीच दुर्लक्षित राहतात. आता तर राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणाच्याही आदेशाची वाट न बघता पाहणी-पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत पोहोचवायला हवी. नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांना आर्थिक मदत करताना आचार संहिता आड यायला नको. खरीप हंगाम तोंडावर आहे. निसर्गाचा कहर सातत्याने सुरू असताना सध्याच्या वादळी पावसासह गारपिटीची वेळेत दखल घेऊन खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून उभे करावे लागेल, हे लक्षात घेतले पाहिजे.

खरे तर २०१४ मध्ये राज्यात दीडदोन महिने गारपिटीने धुमाकूळ घातला होता. त्या वेळेस एवढ्या मोठ्या आपत्तीचा अंदाज कसा वर्तविला गेला नाही? असे पूर्वानुमान इतर देशांत केले जाते, मग आपल्याकडे का नाही? गारपीट पूर्वानुमानासाठीचे तंत्रज्ञान आपल्याकडे उपलब्ध नाही का? हवामान बदलाच्या काळात अशाप्रकारची गारपीट नियमित होत राहणार का?

असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले. परंतु यांच्या उत्तराच्या दिशेने काहीही पावले उचलली गेली नाहीत. त्यामुळे दशकभरानंतर हेच प्रश्‍न आज पुन्हा उपस्थित होतात. २०१४ पासून दरवर्षी राज्याला गारपीट झोडपून काढत असताना याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही, ही मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.

महाराष्‍ट्रात मॉन्सून दाखल व्हायच्या आधी म्हणजे एप्रिल-मे या उन्हाळी महिन्यांत दुपारचे तापमान वाढलेले असते. त्यासोबतच हवेतील बाष्पाचे प्रमाणही वाढले की वादळी अथवा वळवाच्या सरी पडतात. वळवाच्या पावसासोबतच विजा चमकून आधी क्वचित प्रसंगी गारपीट होत होती.

परंतु मागील दशकभरापासून पावसाळ्याचे चार महिने सोडले, तर ऑक्टोबर ते मे या काळात कधीही गारपीट होत आहे. मागील वर्षी तर हिवाळ्यात गारपिटीचा अनुभव शेतकऱ्यांना आला आहे. गारपिटीचा ढग विशिष्ट प्रकारचा असतो. हवामान तज्ज्ञांना असा ढग सहज ओळखता येतो.

अशा ढगांचा सखोल अभ्यास करून गारपिटीचे अचूक अंदाज वर्तविले जाऊ शकतात. असे अंदाज संबंधित शेतकऱ्यांसह नागरिकांपर्यंत तत्काळ पोहोचवून नुकसान टाळता येऊ शकते. एवढेच नव्हे तर मोठ्या गारांचे रूपांतर छोट्या गारांत आणि छोट्या गारांचे रुपांतर पावसात करून शेतीच्या नुकसानीसह इतर जीवित, वित्तहानी कमी केली जाऊ शकते. परंतु याबाबतही आपल्याकडे काहीही घडताना दिसत नाही आणि त्याचेच गंभीर परिणाम राज्यातील शेतकरी आज भोगत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT