Hailstorm In Vidarbh : विदर्भातील वादळी पाऊस गारपिटीचा पिकांना फटका

Crop Damage : वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा तालुक्‍यांत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्‍यातील बोरव्हा (खु), कवळठ, शेलूबाजार, वनोजा परिसरात गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले
Crop Damage
Crop DamageAgrowon

Nagpur / Akola News : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा एकदा अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका बसला आहे. तसेच वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरात वादळी पाऊस, सोसाट्याचा वारा यामुळे रविवारी (ता. १७) रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण व पंचनामे करुन आर्थिक मदतीची मागणी शेतकरी स्तरावरुन होत आहे.

विदर्भातील गोंदिया, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वाशीम या जिल्ह्यांमध्ये रविवारी सायंकाळी पाऊस, गारपीट व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील पीक आडवे झाले. यवतमाळ जिल्ह्याच्या दारव्हा, आर्णी, यवतमाळ, उमरखेड, कळंब, पुसद, महागाव तालुक्‍यांत उन्हाळी तीळ, ज्वारी, बाजरी लागवडीखालील क्षेत्र मोठे आहे.

त्यासोबतच काही शेतकऱ्यांनी गहू तसेच हरभरा काढणी करुन ठेवला आहे. या पिकांचे सर्वाधीक नुकसान झाले. काढणी करुन ठेवलेला शेतमाल भिजल्याने त्याची प्रत खालावली आहे तर उभे पीक आडवे झाल्याने त्याचाही परिणाम उत्पादकतेवर होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.

Crop Damage
Unseasonal Rain : नांदेड जिल्ह्याला अवकाळीने झोडपले

वाशीम जिल्ह्यातील कारंजा, मानोरा तालुक्‍यांत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्‍यातील बोरव्हा (खु), कवळठ, शेलूबाजार, वनोजा परिसरात गारपीट झाल्याने संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले. गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस बरसला. त्याच्या परिणामी झाडे कोसळली सोबतच उभ्या पिकालाही फटका बसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्याच्या काही भागात देखील संत्रा बागांना अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नागपूरच्या सावनेर तालुक्‍यातील पाटणसावंगी व खापरखेडा परिसरात बोर आणि आवळ्याच्या आकाराची गार पडली.

त्यामुळे शिवारात वेचणीला आलेला कापूस भिजला. वादळी वाऱ्यामुळे गव्हाचे पीक आडवे झाले. काही शिवारात मृग बहाराचा संत्रा असून फळे गळून पडली. भाजीपाला उत्पादकांचेही यामुळे नुकसान झाले. कुही तालुक्‍यात देखील पाऊस, गारपीट झाली.

Crop Damage
Unseasonal Rain : गोंदियाला अवकाळी पावसानं झोडपलं, धान पिकांना फायदा ?

वादळी पावसामुळे कांदा बीजोत्पादन क्षेत्राचे नुकसान

मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरातील काही गावात रविवारी (ता. १७) सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस व सोसाट्याचा वारा वाहिला. यामुळे कांदा बीजोत्पादन क्षेत्रात नुकसान झाले आहे.

शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.शेलूबाजारपासून जवळ असलेल्या वनोजा, तपोवन, शेंदुर्जना मोरे, नांदखेडा, लाठी, नागी, ईचा या परिसरात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाच्या सरीही कोसळल्या.

या भागात अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळालेले आहेत. वनोजा व इतर गावात नवीन लागवड केलेल्या संत्रा बागात शेतकऱ्यांनी कांदा बीजोत्पादनाच्या दृष्टीने लागवड केलेली आहे. पीक यावर्षी चांगले जुळून आलेले आहे.

बरेच शेतकरी योग्य व्यवस्थापनातून या पिकाचे चांगले उत्पादनही घेत आहेत. रविवारी झालेल्या नैसर्गिक आपत्तीत अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकरी गोरख येवले, रोशन येवले तसेच अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com