Solar farming
Solar farming Agrowon
संपादकीय

Solar farming : सौर शेती ठरेल किफायतशीर

Team Agrowon

- डॉ भास्कर गायकवाड

(पूर्वार्ध)

शेतकऱ्‍याकडे शेती आहे. परंतु शेती पिकविण्यासाठी पाणी नाही; काही वेळा योग्य वातावरणाच्या अभावामुळे अथवा जमीन खराब असल्यामुळे शेती किफायतशीर होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सोलर फार्मिंग (सौर शेती) (Solar farming) ही संकल्पना राबविणे निश्‍चितच किफायतशीर होणार आहे.

आजकाल सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चर्चेचा विषय म्हणजे वीज - लाइट. लाइट आली तर सर्वत्र उजेड, नाही तर लाइटविना अंधार. मग ते घर असो, व्यवसाय असो, उद्योग असो की शेती! आता तर विजेवर चालणाऱ्‍या गाड्याही मार्केटला आलेल्या आहेत. म्हणजेच विजेशिवाय काहीच चालू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ही बाब सत्य असली तरीही विजेची निर्मिती करणे आणि तिचा सर्वांसाठी पुरवठा करणे ही बाब अवघड होत आहे. कोळसा, पाणी आणि अणुजन्य ऊर्जा या माध्यमातून वीज तयार केली जाते. पूर्वीच्या काळी कोळशापासून वीज तयार केली जात होती. नंतरच्या काळात पाण्याच्या प्रवाहापासून वीज तयार करण्यात आली. नंतर औष्णिक म्हणजे अणुऊर्जा तयार केली गेली.

प्रत्येक ऊर्जा स्रोतांमध्ये काहीतरी कमतरता किंवा तोटे आहेत. कोळशाचा साठा कमी होत गेला, कोळसा महाग झाला तशी त्यापासून तयार होणारी ऊर्जा महाग झाली. पाण्याच्या प्रवाहापासून ऊर्जा निर्माण करण्यात येते. परंतु दिवसेंदिवस पाण्याची उपलब्धता कमी होत गेल्यामुळे पाण्याच्या वापरावर निर्बंध येऊ लागले. त्यामुळे पाण्यापासूनच्या ऊर्जानिर्मितीवरही काही प्रमाणात बंधने आली. त्यानंतर सर्वांत स्वस्त ऊर्जा म्हणजे अणुऊर्जा. त्यासाठी मोठे प्रकल्प उभारले. परंतु ही ऊर्जा तयार होत असताना त्यापासून निघणारे अणुकण मानवी आरोग्याला धोकादायक; तसेच अणुऊर्जा प्रकल्पामध्ये काही दुर्घटना झाली तर तेथील समाज आणि एकूणच देशाच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला! म्हणून जास्तीत जास्त अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यावरही बंधने येऊ लागली.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ऊर्जानिर्मिती करून तिची वाहतूक करण्यासाठीचे जाळे यावरही मोठ्या प्रमाणात ताण येऊ लागला. एकाच ठिकाणावरून जास्तीत जास्त ठिकाणी ऊर्जा पाठविण्यासाठीची आवश्यक यंत्रणा आणि त्याचे जाळे (ग्रीड) यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत होत असल्यामुळे अनेकदा वीज तयार होऊनही ती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे अवघड होत आहे. या सर्व वीज वितरण जाळ्यांचे विस्तारीकरण करण्यासाठी देशपातळीवर लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. म्हणजे ऊर्जानिर्मिती महाग, वितरण महाग आणि त्यामुळे दरवाढ! परिणामी, महाग वीज विकत घ्यावी लागते. त्यामुळे उद्योगधंदे, शेती आणि घरगुती ग्राहक यांना या सर्व समस्यांना सामोरे जावे लागते.

याचाच विचार करून सौरऊर्जा म्हणजे सोलर एनर्जीचा वापर करून हे सर्व प्रश्‍न कमी करता येतील काय, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. आज ६० टक्के समाज ग्रामीण भागामध्ये राहत असून, त्याचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. शेती उत्पादन घेत असताना विजेचा पुरवठा व्यवस्थित झाला तर पिकाला पाण्याचा योग्य प्रकारे वापर करून उत्पादन घेता येते. परंतु अनेक वर्षांपासून शेतीला विजेचा पुरवठा करताना सततच दुय्यम दर्जा दिला जातो. शेतीसाठी अवेळी, अपूर्ण दाबाने आणि कमी कालावधीसाठी विजेचा पुरवठा होतो. रात्रीच्या वेळी विजेचा पुरवठा होत असल्यामुळे अनेकदा पिकांना पाणी देता येत नाही किंवा शेतकऱ्याला जीव धोक्यात घालून पाणी द्यावे लागते. याचा परिणाम पीक उत्पादनावर होतो.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ८० टक्के शेतकरी हे कमी
पाण्याच्या प्रदेशात राहत असल्यामुळे त्यांना एक किंवा दोन पिकांवरच समाधान मानावे लागते. अर्थात, निसर्गाने साथ दिली तरच पीक उत्पादन मिळण्याची हमी; अन्यथा उत्पादन मिळत नाही! अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्‍याला त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कर्जबाजारी व्हावे लागते आणि दुर्दैवी वेळ आली तर आत्महत्या करावी लागते. अनेकदा शेतकरी या परिस्थितीला सामोरे जाण्यापेक्षा जमीन पडीक ठेवतात आणि दुसऱ्‍याकडे मोलमजुरी करतात. अशा या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी सतत नवनवीन तंत्रज्ञान किंवा व्यवसायाचा मार्ग शोधत असतो. सोलर फार्मिंग म्हणजे सौरऊर्जा तयार करण्यासाठी शेती हा एक मार्ग आहे.

ज्यातून शेतकरी त्याच्या शेतातून उत्पादन घेऊ शकतो. यासाठी शेतकऱ्‍याला जमिनीची मशागत, बी-बियाणे, खते कीटकनाशके यांसारख्या निविष्ठांची गरज नाही. शेतकऱ्‍याकडे शेती आहे. परंतु शेती पिकविण्यासाठी पाणी नाही; काही वेळा योग्य वातावरणाच्या अभावामुळे अथवा जमीन खराब असल्यामुळे शेती किफायतशीर होत नाही. अशा परिस्थितीमध्ये सोलर फार्मिंग ही संकल्पना राबविणे निश्‍चितच किफायतशीर होणार आहे. दिवसेंदिवस विजेच्या मागणीनुसार पारंपरिक पद्धतीने विजेचे उत्पादन घेणे शक्य होणार नाही.

आपला देश- राज्य भाग्यवान आहे, की आपल्याकडे वर्षभर कमी- अधिक प्रमाणात सूर्यप्रकाश पडतो. या सूर्यप्रकाशाचे रूपांतर विजेमध्ये करण्यासाठी सौरऊर्जा पॅनेल शेतामध्ये बसविणे आणि त्यापासून वीज तयार करणे हे एक तंत्रज्ञान काही प्रमाणात राबविले जाते. अर्थात, यासाठी या विषयाकडे सर्वांनी गांभीयाने विचार करणे गरजेचे आहे. शेतीसाठी वीज द्या, दिवसा द्या, कमी दरात द्या, वीजबिल माफी करा यातून मागण्या पूर्ण होणार नाहीत. मात्र राजकीय पक्ष आपल्या पोळ्या अनेक वर्षांपासून शेकवत आहे आणि हे घोगडं जास्तीत जास्त भिजत ठेवतील. म्हणून शेतकऱ्यांची मागणी बदलून तात्पुरता प्रश्‍न सोडविण्याऐवजी शाश्‍वत उत्तर शोधणे आणि त्याचा अवलंब करणे या सारख्या बाबीवर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे. मागील काही वर्षांत शेतीतून मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती झाल्यामुळे आज पेट्रोल आयातीसाठी वापरले जाणारे हजारो कोटी रुपयांचे परकीय चलनात बचत झाली आहे. त्यामुळे काही वर्षांत आपण इंधनात काही अंशी स्वयंपूर्ण होऊ, असे आशादायक चित्र तयार झाले आहे. विजेच्या बाबतीत सर्व पातळ्यांवर प्रामाणिकपणे प्रयत्न झाले, तर आताची विजेची समस्या सहजपणे सोडवू शकतो. यासाठी सोलर ऊर्जा आणि शेती या विषयावर प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. शेतीला पूरक व्यवसाय सोलर फार्मिंग होऊ शकतो ज्यासाठी जनरेटा वाढणे गरजेचे आहे.

(लेखक शेती प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health : शेतीतून शाश्वत उत्पादन मिळण्यासाठी मृदा आरोग्य जपा

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Goat Rearing : शेळीपालनात अभ्यासपूर्ण व्यवस्थापनाला प्राधान्य

Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

Poultry Chicken Management : कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल आवश्यक

SCROLL FOR NEXT