पीक नियोजनातून शेती झाली किफायतशीर

भाकरवाडी (ता. कोरेगाव,जि. सातारा) येथील बिजली राजेंद्र जाधव. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गेल्या आठ वर्षांपासून झेंडू, ऊस, आले, टोमॅटो आणि हंगामी भाजीपाला पिकांच्या लागवडीवर त्यांनी भर दिला आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांना त्यांनी शेती नियोजनाची नवी दिशा दाखविली आहे.
पीक व्यवस्थापनात रमलेल्या बिजलीताई
पीक व्यवस्थापनात रमलेल्या बिजलीताई

गेल्या काही वर्षांत कृषी क्षेत्रामध्ये प्रयोगशील महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. यापैकीच एक आहेत, भाकरवाडी (ता. कोरेगाव,जि. सातारा) येथील बिजली राजेंद्र जाधव. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन गेल्या आठ वर्षांपासून झेंडू, ऊस, आले, टोमॅटो आणि हंगामी भाजीपाला पिकांच्या लागवडीवर त्यांनी भर दिला आहे. बचत गटाच्या माध्यमातून गावातील महिलांना त्यांनी शेती नियोजनाची नवी दिशा दाखविली आहे. भाकरवाडी हे कोरेगाव तालुक्यातील (जि. सातारा) सुमारे एक हजार लोकसंख्येचे गाव. या गावातील बिजली राजेंद्र जाधव या प्रयोगशील महिला शेतकरी. पूर्वी जाधव कुटुंबाची अवघी दीड एकर कोरडवाहू शेती होती. बिजलीताईंनी शेतीमधून उत्पन्न वाढविण्यासाठी पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने बागायती शेती करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षांत विहीर तसेच पाइपलाइन करून बागायती शेतीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले.  स्वतःची शेती क्षेत्र कमी असल्याने त्यांनी क्षेत्र आणि पीक उत्पादन वाढविण्यासाठी खंडाने शेती करण्यास सुरुवात केली. सध्याच्या परिस्थितीत त्यांच्याकडे आठ एकर खंडाने शेती असून, घरचे दीड एकर क्षेत्र लागवडीखाली आहे. शेतीतून मिळालेल्या उत्पन्न तसेच कर्ज काढून त्यांनी शेतीकामासाठी २००८ मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला. यामधूनही त्यांना आर्थिक मिळकत सुरू झाली. ट्रॅक्टर चालविण्यात पारंगत  मजूरटंचाई आणि शेतीकामात वेळेची बचत साधण्यासाठी बिजलीताईंनी पूरक व्यवसाय म्हणून ट्रॅक्टर विकत घेतला. त्या स्वतः ट्रॅक्टर चालवण्यास शिकल्या. टप्प्याटप्प्याने ट्रॅक्टरच्या साह्याने करावयाच्या मशागतीची कामांमध्येदेखील त्या पारंगत झाल्या आहेत. सध्या बिजलीताई नांगरट, फणणी, रोटर तसेच वाहतुकीची सर्व कामे स्वतः करतात. २०१३ मध्ये पहिला ट्रॅक्टर कर्जमुक्त झाल्यावर मोठ्या क्षमतेच्या मोठ्या ट्रॅक्टरची त्यांनी खरेदी केली आहे. यातूनही रोजगार वाढविला आहे.        शेतीचे नियोजन  बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन बिजलीताई दरवर्षी झेंडू लागवड करतात. साधारणपणे एक एकर क्षेत्रावर दसरा सणाच्या अगोदर ७० दिवस झेंडूची लागवड केली जाते. चार फूट सरीवर दोन रोपांतील अडीच फूट ठेवून लागवड केली जाते. गेली सात वर्षे झेंडू लागवड असल्यामुळे विक्रीसाठी कायमस्वरूपी व्यापारी तयार झाले आहेत. त्यामुळे किफायतशीर दर मिळविण्यात त्या यशस्वी झाल्या. दसरा आणि दिवाळीसाठी झेंडूचे तोडे होतात. लागवड आणि बाजारपेठेच्या योग्य नियोजनामुळे गेल्या सात वर्षांत एकदाही झेंडू पिकात आर्थिक नुकसान झाले नसल्याचे त्या सांगतात. गतवर्षी लॉकडाउनमध्ये दसरा व दिवाळीमध्ये त्यांनी साडेचार टन झेंडू सरासरी ६० रुपये दराने व्यापाऱ्यांना विकला आणि दीड टन झेंडूची  ९० ते १०० रुपये दराने हातविक्री केली. योग्य व्यवस्थापनातून जास्तीत जास्त नफा मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. झेंडू पिकाच्या बरोबरीने साधारणपणे दरवर्षी पाच एकरावर सुरू हंगामात ऊस लागवड असते. एकरी ७० टनांचे सातत्य त्यांनी ठेवले आहे. उसाबरोबर प्रत्येक वर्षी एक एकरावर आले पिकाची लागवड असते. एकरी २५ ते २८ गाडी (एक गाडी ५०० किलो) आले उत्पादन मिळते. आले पिकाचे उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये सातत्य ठेवल्याने व्यापारी शेतावर येऊन खरेदी करतात. तसेच बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वर्षातून एका हंगामात टोमॅटोची लागवड करतात. याचबरोबरीने २५ गुंठे क्षेत्रावर वाघ्या घेवडा, मूग, उडीद पिकाची लागवड असते. विविध पिकांतून आर्थिक नफा वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. कृषी विभागाचे दिलीप जाधव यांचेही त्यांना शेती प्रयोगात चांगले मार्गदर्शन मिळत असते. बिजलीताईंनी कुटुंबीयांच्या मदतीने शेतीमध्ये आश्‍वासक प्रगती केली आहे. शेती उत्पन्नातून त्यांनी दोन ट्रॅक्टर खरेदी केले तसेच दोन एकर शेतजमीन खरेदी केली आहे. त्यांचा मुलगा ऋतुराज हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. बिजलीताईंना शेती नियोजनामध्ये त्यांना १४ जणांच्या एकत्रित कुटुंबाचे चांगले पाठबळ मिळाले आहे.   शेती व्यवस्थापनाची सूत्रे 

  • जमीन सुपीकतेसाठी शेणखत, शेण स्लरीचा अधिकाधिक वापर.
  • बाजारपेठेचा अभ्यास करून पीक नियोजन, यांत्रिकीकरणावर भर.
  • ऊस, आले पिकाच्या बरोबरीने टोमॅटो, झेंडूचे नियोजन.
  • तणनियंत्रणासाठी आच्छादन आणि शिफारशीत तणनाशकाच्या फवारणीचे नियोजन. 
  • पीकवाढीचे सातत्याने निरीक्षण करून कीड, रोग नियंत्रणाच्या योग्य उपाययोजना. 
  • शेतीमालाची योग्य विक्री व्यवस्था तसेच हातविक्रीवर भर.
  • तीन म्हशी, चार शेळ्या व एका देशी गाईचे संगोपन.
  • बिजलीताई ठरल्या प्रेरणास्रोत बिजलीताई स्वतः ट्रॅक्टरच्या साह्याने शेती मशागत आणि वाहतुकीची कामे करतात. त्यांच्या शेतीमधील पीक प्रयोग पाहून परिसरातील शेतकरी त्यांच्याकडून माहिती घेतात. विशेषतः गावातील मुली आवर्जून त्यांच्या बरोबरीने शेतीमधील पीक उत्पादन वाढ, नियोजनाबाबत चर्चा करतात. हा आश्‍वासक बदल गावामध्ये दिसू लागला आहे. दररोज शेतावर दुचाकी, चारचाकीने जातात. त्यांच्या प्रयत्नातून गावातील मुली आता दुचाकी तसेच ट्रॅक्टर चालवायला शिकू लागल्या आहेत. महिलांना आर्थिक हातभार लागावा यादृष्टीने त्यांनी आठ वर्षांपूर्वी लक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना केली. यातून महिलांना कर्जपुरवठा केला जात असल्याने शेतीकामासाठी लागणाऱ्या आर्थिक भांडवलाची गरज पूर्ण होऊ लागली आहे. गावातील महिलांनी शेतीमध्ये नवीन पीक प्रयोग करतावेत यासाठी बिजलीताई प्रोत्साहन देतात. प्रयोगशीलतेचा गौरव 

  • २०१४ मध्ये प्रभात कृषिवाणीतर्फे सन्मानपत्र.
  • खासदार श्रीनिवास पाटील चॅरिटेबल फाउंडेशन प्रगतिशील महिला शेतकरी गुणगौरव पुरस्कार.
  • सातारा आकाशवाणीवर शेती प्रयोगाबाबत मार्गदर्शन. गावातील सार्वजनिक उपक्रमात सहभाग.
  • २०१५ मध्ये बिनविरोध उपसरपंच म्हणून निवड.
  • - बिजली जाधव,  ९७६३००५९२९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com