Dairy Product
Dairy Product Agrowon
संपादकीय

Import Of Dairy Products : दुग्धजन्य पदार्थ आयातीबाबत केवढी ही तत्परता

Team Agrowon

Milk Demand : उन्हाळ्यात दुधाला मागणी वाढते आणि पुरवठा कमी असतो. त्यातच सध्या दुधाला प्रतिलिटर ३८ रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. दुधाचा पुरवठा अजूनही कमी होऊन दर वाढतील, अशी चिंता केंद्र सरकारला लागली आहे. त्यामुळे त्यांनी दुग्धजन्य पदार्थ तूप, लोणी आयातीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

हे कळतात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांना पत्र पाठवून लोणी, तूप हे बाहेरून आयात केले तर त्याचा अत्यंत प्रतिकूल परिणाम देशातील दुग्ध व्यवसायावर होईल, असे पत्रात नमूद केल्यावर तत्काळ केंद्र सरकारने तसा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र, पुढे गरज भासली तर आयात प्रक्रियेला जास्त वेळ जाऊ नये म्हणून आयात कुठून कशी करावी, याबाबतचा शोध चालू असल्याचेही केंद्र सरकारनं सांगितले आहे. शेतीमाल आयातीबाबत केवढी ही तत्परता म्हणावी लागेल.

यापूर्वी तूर, कांदा, कापूस, सोयाबीन गरज नसताना आयात करून देशातील उत्पादकांची माती केली आहे. आता केंद्र सरकारच्या डोळ्यात दुधाचे वाढलेले दर खुपत आहेत.

आयातीचा निर्णय झाला तरी आयात एनडीडीबी च्या माध्यमातून केली जाईल, आणि दूध संस्थांना एनडीडीबीकडून बाजारभावाने या उत्पादनांची खरेदी करावी लागेल.

त्यामुळे बाजारात दूध अथवा दुग्धजन्य पदार्थाचे दर पडणार नाहीत, अशी काळजी घेतली जाईल असेही केंद्राकडून सांगण्यात येत आहे. परंतु दुग्धजन्य पदार्थ असो की इतर कुठलाही शेतीमाल यांच्या आयातीच्या केवळ निर्णय झाल्याबरोबर या देशात शेतीमालाचे दर पडलेले आहेत.

त्यामुळे आयातीचा निर्णय झाला तरी सध्याचे दर पडणार नाहीत या केंद्राच्या तर्कात काहीही तथ्य दिसत नाही. लोणी, तूप आयातीचा निर्णय झाल्यास देशात दुधाचे दर कोसळणारच, यात शंका नाही.

मागील दशकभरापासून दूध उत्पादकांवर अनेक आघात झाले आहेत. दुष्काळ आणि अतिवृष्टीने देशातील पशुधन कमी झाले आहे. दोन वर्षे कोरोना काळात प्रतिलिटर दहा ते पंधरा रुपयांच्यावर दुधाला दर मिळाला नाही.

कोरोना आपत्तीनंतर लम्पी स्कीन या आजाराने दूध उत्पादकांना चांगलेच मेटाकुटीस आणले आहे. यातून देभरातील दूध उत्पादक सावरत असताना केंद्राची वक्रदृष्टी त्यावर पडली आहे. सध्या दुधाला अधिक दर मिळत असला तरी दूध उत्पादन खर्च प्रचंड वाढला आहे.

चारा, पशुखाद्य, मजुरीचे दर वाढल्याने अजूनही दूध उत्पादकांची खर्च मिळकतीची तोंडमिळवणी होताना दिसत नाही. परंतु सरकारला दूध उत्पादकांपेक्षा सर्वसामान्य नागरिकांची चिंता पडली आहे. भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश आहे.

परंतु हा मान आपली दुधाळ जनावरांची उत्पादकता अधिक असल्याने नव्हे तर त्यांची संख्या अधिक असल्याने मिळाला आहे. सर्वाधिक पशुधन आणि दूध उत्पादन करणाऱ्या या देशातील पशुपालक मात्र अत्यंत हलाखीचे जीवन जगतोय.

या देशातील दुग्ध व्यवसाय शाश्वत आणि किफायतशीर करायचा असेल तर दुधाळ जनावरांची उत्पादकता वाढवावी लागेल. पशुखाद्य दर नियंत्रणात ठेवावे लागतील. दुधाळ जनावरांच्या वर्षभर चाऱ्याचे (ओला, सुका)नियोजन करावे लागेल.

दुधाचे दर सारखेच वर-खाली होऊन त्याचा फटका उत्पादकांना बसत असताना एकूण उत्पादन खर्चावर आधारित दुधाला ‘एफआरपी’ची तसेच रेव्हेन्यू शेअरिंगची मागणी होते. उत्पादक आणि ग्राहक यातील दूध दरात दुपटीने फरक असतो. हा नफा कमी करणे शक्य आहे.

काही व्यापारी दुधात भेसळ करून दूध उत्पादकांचे नुकसान करीत आहेत त्याचबरोबर ग्राहकांच्या आरोग्याशीही खेळत आहेत. या समस्या सोडविण्यासाठी मात्र केंद्र-राज्य सरकार पातळीवर कोणतीही तत्परता दाखविली जात नाही, हे या देशातील दूध उत्पादकांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT