Farmers Collective Purchase Of Agriculture Inputs  Agrowon
संपादकीय

Cost Saving Agri Inputs : एकीचे बळ

Farmers Collective Inputs Purchase : गट, समूह उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आले तर निविष्ठांसह यंत्रे-अवजारे यांची खरेदीच नाही तर शेतीची मशागत ते शेतीमालाची काढणी, विक्री, प्रक्रिया अशी सर्व कामे एकत्रित करू शकतात.

विजय सुकळकर

Farmers Collective Purchase Of Agriculture Inputs : निविष्ठा खरेदी म्हटले की शेतकऱ्यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहतो. पेरणीच्या हंगामात बहुतांश शेतकऱ्यांकडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदीसाठी पैसा नसतो. त्यात मागील काही वर्षांपासून बियाणे, रासायनिक खते यांचे दर सातत्याने वाढत आहेत. अलीकडे बियाणे, खते खरेदीत लिंकींगचे प्रकारही वाढले आहे. लिंकिंगद्वारे अनावश्यक निविष्ठा शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात. याचा शेतकऱ्यांवर नाहक आर्थिक भुर्दंड बसतो.

बियाणे, रासायनिक खते, कीडनाशके यांच्यातील बनावटगिरी देखील अलीकडे प्रचंड वाढली आहे. खरीप हंगामात पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवणे, शिवाय रासायनिक, जैविक खते म्हणून माती विक्री करण्याचे प्रकार गावोगाव उघडकीस येत आहेत. असे प्रकार वेळ निघून गेल्यावर उशिरा उघडकीस आल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झालेली असते.

बियाणे खरेदीतील अशा प्रकारची फसवणूक टाळली जावी, शिवाय त्यातून पैशाचीही बचत व्हावी, यासाठी उत्तर सोलापूर तालुक्यातील सात गावांतील १२ शेतकरी गटांनी सोयाबीनची एकत्रित खरेदी केल्याने त्यांचे चार लाख तीस हजार रुपये वाचले आहेत.

पीक उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना खर्चातील बचतीच्या या प्रयोगाचे अनुकरण राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी संपूर्ण निविष्ठा खरेदीत केले तर त्यातून शेतकऱ्यांच्या बचत झालेल्या पैशाचा आपल्याला अंदाज यायला हवा.

राज्यात अनेक शेतकरी गट निष्क्रिय असल्याने ते केवळ कागदावर शोभून दिसत आहेत. अशा शेतकरी गटांनी उत्तर सोलापूर मधील १२ गटांचा आदर्श घेऊन कामाला लागायला हवे.

महाराष्ट्रात अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. अशा शेतकऱ्यांना निविष्ठा कमी लागतात. अशावेळी गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन निविष्ठा खरेदी केली तर त्यांची सौदा शक्ती वाढते. यातून त्यांना निविष्ठांचे दर कमी पडतात. सर्व शेतकऱ्यांच्या निविष्ठांची एकत्रित वाहतूक करता येत असल्याने वाहतूक खर्चातही बचत होते. शेतकऱ्यांच्या एकत्रित निविष्ठा खरेदीत लिंकींगचा तर विषयच येत नाही, त्यात फसवणूकही होत नाही. गट, समूह, उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे यशिवाय अनेक फायदे आहेत.

सध्या मजूर टंचाईने शेतीला ग्रासले आहे. मजुरीचे दर वाढलेले असताना पेरणी, निंदणी, पिकांची काढणी अशा महत्त्वाच्या कामांसाठी वेळेवर मजूर न मिळाल्याने ही कामे खोळंबून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पूर्वी निविष्ठांत फारसे फसवणुकीचे प्रकार नव्हते. शिवाय गावांत मजूरटंचाई देखील नव्हती. अशा काळात खरेदी-विक्री संघ गावोगाव होते. गावासाठी लागणाऱ्या बियाण्याची खरेदी, शेतीमाल विक्री, एवढेच नाही तर शेतकरी सदस्यांना असे संघ आर्थिक साह्य देखील करीत होते.

शिवाय पूर्वी मजूरटंचाई नसताना पेरणीच्या हंगामात इर्जिक, सावड यांच्या माध्यमातून शेतकरी एकत्र येऊन काम करीत होते. आता बहुतांश खरेदी-विक्री संघ नामशेष झाले असताना, मजूरटंचाईने कामे खोळंबत असताना गावचे शेतकरी गट, समूह उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून एकत्र आले तर निविष्ठांसह यंत्रे-अवजारे यांची खरेदीच नाही तर शेतीची मशागत ते शेतीमालाची काढणी, विक्री, प्रक्रिया अशी सर्व कामे एकत्रित करू शकतात.

शेतीमालाच्या एकत्रित विक्री, प्रक्रियेने त्यांची बाजार जोखीम कमी होऊन शेतीमालासह प्रक्रियायुक्त उत्पादनांना चांगला दर मिळू शकतो. जिथे शेतकऱ्यांचे गट एकत्र आले, शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन होऊन योग्य दिशेने ज्यांची वाटचाल सुरू आहे, अशा गट, उत्पादक कंपनीतील शेतकऱ्यांना त्याचे चांगले फायदे होत आहेत. शेतकऱ्यांनी एकत्र येणे ही काळाचीच गरज आहे.'

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT